Cotton Seed Sale : कापूस बियाण्याबाबत कृषी विभागाचे ढिसाळ नियोजन

Agriculture Department : बियाणेच नव्हते तर १६ मे पासून विक्रीस परवानगी दिली कशी
Cotton Seeds
Cotton Seeds Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Jalgaon News : जळगाव ः खानदेशात कापूस बियाणे पुरवठादार व वितरकांचे लाड कृषी विभाग पुरवीत आहे. खरीप हंगाम तोंडावर असतानादेखील ३० टक्केही कापूस बियाण्याचा पुरवठा झालेला नाही. बियाणे येईल, अशी बतावणी कृषी विभाग करीत आहे. दुसरीकडे काळाबाजार, शेतकऱ्यांची लूट सुरूच आहे.

जळगाव जिल्ह्यात २७ लाख, धुळ्यात ११ लाख आणि नंदुरबारात सुमारे सहा लाख कापूस बियाणे पाकिटांचा पुरवठा होईल. त्यास वरिष्ठ कार्यालयाने लक्ष्यांक मंजुरी दिली आहे. बियाण्याचा तुटवडा राहणार नाही, अशी बतावणी मात्र कृषी विभाग सर्वत्र करीत आहे. ९९ टक्के कापूस बियाणे बीटी प्रकारचे (बोलगार्ड २) आहे. या सर्व बियाण्यासाठी कृषी विभाग खासगी कंपन्या, पुरवठादार, वितरकांवर अवलंबून आहे.

खरीप आढावा बैठका खरिपापूर्वी सर्वत्र झाल्या. यंदा बैठका आचारसंहितेत असल्याने लोकप्रतिनिधी उपस्थित राहीले नाहीत. अजूनही लोकप्रतिनिधी यासंबंधी बैठका घेऊन हस्तक्षेप करीत नसल्याची स्थिती आहे. यात प्रशासन हावी झाले असून, सुरवातीपासून कृषी विभाग चुकीची माहिती देवून शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत. यंदा एक - दोन नव्हे तर सात कंपन्यांच्या कापूस बियाण्याचा तुटवडा व काळाबाजार सुरू आहे. ठरवून हा प्रकार यंदा सुरू आहे. कापूस बियाणेच नव्हते तर त्याची विक्री १६ मे पासून का सुरू केली व शेतकऱ्यांना का वेठीस धरले, असा मुद्दा जाणकार, जागरूक शेतकरी उपस्थित करीत आहेत.

Cotton Seeds
Cotton Seed Sale : कापूस बियाण्यांची ‘ऑन’मध्ये विक्री

दुसरीकडे कृषी विभाग एकाच वाणाची मागणी करू नका, लागवड जूनमध्ये करा, असे सांगत आहे. खते, बियाणे, किडनाशके विक्रेत्यांच्या दबावाला व चुकीच्या माहितीला बळी पडून कृषी विभागाने यंदा १६ मे पासून कापूस बियाणे विक्री सुरू करण्यास परवानगी दिली. परंतु याचा लाभ अनेक वितरक, बियाणे कंपन्यांनी घेतला असून, मोठी लूट शेतकऱ्यांची सुरू आहे. ८६४ रुपयाचे एक कापूस बियाणे पाकिट १२०० ते १५०० रुपयांत शेतकऱ्यांच्या माथी मारले जात आहे. कोट्यवधींची लूट यंदा कापूस बियाणे विक्रीतून झाली आहे. काही वितरकांनी तर आपणच बियाणे विकून गब्बर होवू, अशी भूमिका घेत किरकोळ व अन्य कृषी केंद्रांत बियाणेच दिलेले नाही. तुटवडा आहे, कंपन्यांकडे बियाणे नाही, अशी बतावणी वितरक सर्रास करीत आहेत. यामुळे शेतकऱ्यांची अधिकृत लूटच जणू सुरू असून, कृषी विभाग झोपेच्या सोंगेत आहे. भरारी पथके गावोगावी फिरत असल्याची छायाचित्रे पाठविली जातात, पण कारवाई शून्य आहे. जळगाव जिल्ह्यात एकच कारवाई जादा दरात बियाणे विक्रीबाबत झाली आहे. असाच प्रकार धुळे, नंदुरबारात सुरू आहे.


पेरणीला कसे करणार
यंदा पाऊस वेळेत येईल, असे सांगितले जात आहे. राज्यात सर्वाधिक कापूस लागवड जळगाव जिल्हा करतो. यामुळे कापूस बियाण्याची मागणी मोठी असते. सध्या फक्त बागायतदार, पूर्वहंगामी कापूस लागवडीसाठी बियाणे खरेदी आहे, त्यातही लूट, कृत्रीम टंचाई, तक्रारी असा प्रकार आहे. पुढे पाऊस आल्यानंतर बियाणे खरेदीसाठी तालुका, जिल्हास्तरावर शेतकरी गर्दी करतील. या काळात काळाबाजार, लूट व गोंधळ थांबविण्यासाठी कृषी विभागाकडे काय योजना आहे, याबाबतही शंका आहे. शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून धूमधडाका सुरू आहे, अशी नाराजीदेखील शेतकरी व्यक्त करीत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com