Chas News : भाताचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात हळव्या प्रकारच्या भातपिकाच्या कापणीस सुरुवात झाली आहे. चालू वर्षी समाधानकारक पाऊस झाला असल्याने भातपिकापासून चांगले उत्पन्न मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा होती मात्र परतीच्या पावसाने नुकसान झाल्याने उत्पन्नात घटीची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यात चालू वर्षी खरीप हंगामात जवळपास ३ हजार १४० हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड केली होती. भातपिकामध्ये हळवा आणी गरवा अशा दोन प्रकारांत भात लागवड होत असून, हळवा भातपीक साधारण १०० ते १०५ दिवसांत कापणीस येत असून, गरवा भाताच्या पिकास सरासरी १२० ते १२५ दिवस कालावधी अपेक्षित असतो.
सद्यःस्थितीत हळवा प्रकारच्या भाताच्या पिकाची कापणी करण्यास सुरुवात असून, गरवा भाताची पिकेही ओंब्यांनी लगडली आहे. अगोदर परतीचा आणि त्यानंतर मॉन्सूनोत्तर पाऊस दमदारपणे बरसल्याने भात कापणी गेली आठ ते दहा दिवसांपासून खोळंबली होती. मात्र दोन दिवसांपासून पावसाने घेतलेली उसंत तसेच हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पाऊस थांबल्याने शेतकऱ्यांनी भात कापणीस सुरुवात केली आहे.
या बाबत बोलताना आव्हाट येथील शेतकरी राजेंद्र वाळुंज, वाडा येथील सुरेश पावडे तसेच अन्य शेतकऱ्यांनी सांगितले, की दहा ते बारा दिवसांपूर्वीच हळवा भाताची कापणी होणे गरजेचे होते, मात्र परतीच्या पावसाने भातखाचरात पाणी साचल्याने कापणी करता येत नव्हती, तसेच पावसाने तयार झालेल्या भाताच्या आंब्यांमधील दाणे जमिनीवर गळाल्याने उत्पन्नात काही प्रमाणात घट येणार आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.