Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Quality Control in Agriculture: ‘गुणनियंत्रण’चे सील जमा करण्याचे ‘टीएओं’ना आदेश

Government Order: निविष्ठा व गुणनियंत्रण कामकाजाची जबाबदारी आता पूर्णतः ‘तालुका गुणनियंत्रण निरीक्षका’वर देण्यात आली आहे. तसेच, राज्यातील सर्व तालुका कृषी अधिकाऱ्यांनी (टीएओ) स्वतःच्या ताब्यातील पितळी सील तत्काळ नव्या निरीक्षकांकडे हस्तांतर करावे.

मनोज कापडे

Pune News : निविष्ठा व गुणनियंत्रण कामकाजाची जबाबदारी आता पूर्णतः ‘तालुका गुणनियंत्रण निरीक्षका’वर देण्यात आली आहे. तसेच, राज्यातील सर्व तालुका कृषी अधिकाऱ्यांनी (टीएओ) स्वतःच्या ताब्यातील पितळी सील तत्काळ नव्या निरीक्षकांकडे हस्तांतर करावे, असे आदेश शासनाने दिले आहेत.

तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ‘महाराष्ट्र कृषी सेवा वर्ग-२ (कनिष्ठ-ब)’ या संवर्गातील अधिकारी आता गुणनियंत्रण निरीक्षक असतील. त्यांना निरीक्षकाचा पूर्णवेळ दर्जा देणारा आदेश कृषी विभागाने नुकताच जारी केला आहे. त्यामुळे संबंधित तालुक्यातील बियाणे, खते व कीटकनाशकांच्या सेवांबाबत सर्व मुद्दे आता या निरीक्षकाच्या कक्षेत आले आहेत.

पात्र निरीक्षक उपलब्ध नसलेल्या तालुक्यांमध्ये संबंधित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याने निवडलेल्या अधिकाऱ्याला निरीक्षक केले जाणार आहे. तालुक्याला केवळ एक निरीक्षक नेमल्याने गुणनियंत्रण कामातील क्षेत्रिय पातळीवरील गोंधळ संपुष्टात येणार आहे. तसेच, तालुका कृषी अधिकाऱ्यापेक्षाही गुणनियंत्रण निरीक्षक पदाला महत्त्व येण्याची शक्यता आहे.

तालुका कृषी अधिकारी कार्यालयात गुणनियंत्रण विभागाचा कृषी अधिकारी म्हणून राज्यभर आता नवे निरीक्षक कार्यरत होत आहेत. त्यासाठी तालुका कृषी अधिकाऱ्याचे (टीएओ) पूर्वीचे निरीक्षकाचे अधिकार काढून घेण्यात आले आहेत. त्यामुळे ‘टीएओ’कडे असलेला गुणनियंत्रक कोड क्रमांक व पितळी सील तत्काळ नव्या निरीक्षकाकडे हस्तांतर करावे, असेही आदेश शासनाने दिले आहेत.

राज्यातील नव्या तालुका गुणनियंत्रण निरीक्षकांसाठी सर्व विभागीय कृषी सहसंचालक लवकरच प्रशिक्षण वर्ग आयोजित करणार आहेत. तसेच, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ( एसएओ) यापुढे नव्या निरीक्षकांना निविष्ठांचे नमुने काढण्याचे तालुकानिहाय लक्षांक देणार आहेत.

दरम्यान, नव्या गुणनियंत्रण निरीक्षकांनी आपापले पदभार घ्यावेत व निविष्ठांचे नमुने काढणे तसेच इतर गुणनियंत्रणाची कामे तत्काळ सुरू करावीत, अशा सूचना गुणनियंत्रण विभागाने राज्यभर दिल्या आहेत.

कृषी विभागाचा आकृतिबंध अद्याप निश्चित झालेला नाही. त्यामुळे नव्या निरीक्षकांमध्ये व तालुका कृषी अधिकाऱ्यांमध्ये काही ठिकाणी मतभेद होऊ शकतात. यासाठी प्रत्येक तालुका कृषी अधिकाऱ्याने एसएओंच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा, अशाही सूचना आयुक्तालयाने दिल्या आहेत. मात्र, स्थानिक परिस्थितीनुसार नेमके काय निर्णय घ्यावेत, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही, असे एका निरीक्षकाने स्पष्ट केले.

‘निरीक्षकाला सहकार्य करू’

प्रत्येक तालुक्यात केवळ एक गुणनियंत्रण निरीक्षक ठेवून इतरांचे अधिकार काढण्याच्या निर्णयाचे निविष्ठा विक्रेते, वितरक तसेच जैव उत्तेजके क्षेत्रातील व्यावसायिकांनी जोरदार स्वागत केले आहे. ‘गुणनियंत्रण निरीक्षकांनी आमचा वर्षानुवर्षे आर्थिक छळ केला. खरे तर केवळ एक निरीक्षक जिल्ह्याच्या ठिकाणी हवा होता. अन्न व औषध प्रशासनाचा तालुक्यात कुठेही निरीक्षक नसतो. मात्र, तालुक्याच्या नव्या निरीक्षकाला एकत्रितपणे सहकार्य करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे,’ अशी माहिती एका निविष्ठा विक्रीशी संबंधित एका संघटनेच्या पदाधिकाऱ्याने दिली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Khandesh Fodder Crisis: खानदेशात यंदा चारापिके मुबलक

Mulberry Farming: अकोल्यात तुती लागवडीसाठी ६०० एकरांचे लक्ष्य निर्धारित

Mango Export: लंडनला समुद्रमार्गे आंबा पाठविण्याची तयारी

Indian Agriculture: कागदावरील करार, कुसातील हिशेब

Interview with Dada Lad: दादा लाड तंत्रज्ञानाचा देशभर प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT