Agriculture Export Conference  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Export : शेतकऱ्यांनाच निर्यातदार करण्यासाठी प्रयत्नशील

Team Agrowon

Pune News : ः जगात फळे, भाजीपाला उत्पादनामध्ये चीननंतर भारताचा समावेश आहे. मात्र निर्यातीमध्ये भारत पहिल्या १० देशांमध्ये देखील नाही. भारतापेक्षा लहान देश शेतीमाल निर्यातीमध्ये आघाडीवर आहेत. मात्र भारताचा विचार केला तर महाराष्ट्र फळे, भाजीपाला, फुले निर्यातीसाठी आघाडीवर असून, देशातील शेतीमालाच्या निर्यातीमध्ये महाराष्‍ट्राचा वाटा ४३ टक्के एवढा आहे.

हा टक्का वाढविण्यासाठी थेट शेतकरी निर्यातदार व्हावा, आणि यासाठी दक्षिण पूर्व आशिया देशांची पर्यायी बाजारपेठ शोधण्याची गरज आहे. यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन सहकार व पणन विभागाचे मुख्य सचिव अनूपकुमार यांनी केले.

महाराष्ट्र कृषी पणन मंडळ आणि महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पाच्या वतीने यशदामध्ये गुरुवारी (ता. २२) आयोजित फळे भाजीपाला व फुले निर्यात परिषदेमध्ये अनूपकुमार बोलत होते.

या वेळी उद्योग मंत्रालयातील निर्यात आयुक्त दीपेंद्र सिंह कुशावत, पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, ‘मॅग्नेट’चे प्रकल्प संचालक विनायक कोकरे, सहसंचालक अमोल यादव, कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे मुंबई क्लस्टर प्रमुख नर्मदेश्‍वर झा, ‘अपेडा’चे पश्‍चिम विभागाचे प्रादेशिक प्रमुख प्रशांत वाघमारे, ‘डीजीएफटी’चे उपमहासंचालक दिलीराज दाभोळे, ‘आरपीक्यूएस’चे सहसंचालक डॉ. ब्रिजेश मिश्रा इंडियन एक्स्पोर्ट संघटनेचे ऋषिकांत तिवारी, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे विश्‍वनाथ धारट आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री. अनूपकुमार म्हणाले, ‘‘कृषी मालाच्या निर्यातवाढीसाठी केंद्र सरकारच्या निर्यात धोरणानुसार शेतीमाल क्लस्टरनिहाय निर्यातक्षम उत्पादन आणि निर्यात सुविधा राज्य सरकारच्या माध्यमातून उभ्या केल्या जात आहेत. यामध्ये आशियायी बॅंक अर्थसाह्यित मॅग्नेट आणि जागतिक बॅंक अर्थसाह्यित ‘स्मार्ट’ प्रकल्प राबविण्यात येत आहे. मात्र तरीही महाराष्ट्रात अजूनही निर्यातीसाठीच्या पायाभूत सुविधांमध्ये काही त्रुटी आहेत.

काही निवडक १० प्रगत जिल्ह्यांमध्येच निर्यातक्षम फळे भाजीपाल्याचे उत्पादन होत आहे. यामध्ये पुणे, नाशिक, सांगली, सोलापूर यांसारख्या जिल्ह्यांमधून द्राक्षे, डाळिंब, केळींचा समावेश आहे. मात्र आता उर्वरित जिल्ह्यांमधून निर्यातक्षम भाजीपाला उत्पादनासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.’’ या वेळी विविध तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन पणन मंडळाच्या निर्यात विभागाचे उपसरव्यवस्थापक सतीश वराडे यांनी केले. विनायक कोकरे यांनी आभार मानले.

पणनमंत्री अनुपस्थित, शुभेच्छा संदेशाचे वाचन

पणनमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकारातून आयोजित केलेल्या निर्यात परिषदेला स्वतः पणनमंत्रीच अनुपस्थित होते. या परिषदेसाठी त्यांनी पाठविलेला शुभेच्छा संदेशात ते म्हणाले, ‘‘अतिरेकी आयातीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर ताण येत आहे. यामुळे भारताला निर्यातीसाठी स्पर्धा करावी लागत आहे.

या स्पर्धेचा अभ्यास करणे आवश्‍यक असून, जास्तीत जास्त शेतकरी निर्यातदार व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हॉलंड देशातील जागतिक फुलबाजाराची पाहणी केल्यानंतर भारतातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील फुलांची निर्यात वाढीसाठी तळेगाव दाभाडे येथे आंतरराष्ट्रीय फुलबाजार सुविधा उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे.’’

कांदा निर्यात धोरणात १० वर्षांत १२ वेळा बदल

कांद्याच्या निर्यात धोरणातील गेल्या १० वर्षांत १२ वेळा बदल करावा लागल्याने जागतिक पातळीवर कांदा निर्यातीत निराशाजनक चित्र राहिले आहे. मात्र जागतिक पातळीवर नाशिकसारख्या लाल कांद्याला चवीमुळे प्रचंड मागणी असून देखील कांदा निर्यात धोरणातील बदलांबाबत नाराजी पणन सचिव अनूपकुमार यांनी व्यक्त केली.

युद्धजन्य परिस्थिती; अशांतता निर्यातीस बाधक

जागतिक युद्धजन्य परिस्थिती आणि अशांततेचा फटका शेतीमाल निर्यातीस बसत आहे. युक्रेन आणि रशिया यांचे गेले अनेक दिवस सुरू असलेले युद्ध आणि बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेचा फटका भारतीय शेतीमाल निर्यातीला फटका बसला आहे.

युक्रेनच्या युद्धामुळे अनेक सागरी मार्ग बंद झाल्याने दुसऱ्या मार्गांचा अवलंब करावा लागला. यामुळे वाहतुकीचे दिवस आणि खर्च वाढल्याने आयातदार देशांना आणि खरेदीदारांना भारतीय शेतीमाल महागात पडू लागल्याने आपली निर्यात कमी झाल्याचेही अनूपकुमार यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goshala Anudan : गोशाळांच्या अनुदानाला राज्य सरकारची मान्यता; अनुदान बँक खात्यावर जमा होणार

Crop Damage : धाराशिव जिल्ह्यात सप्टेंबरमधील अतिवृष्टीची एक लाख हेक्टरला बाधा

Devna Water Project : जलसंजीवनीसाठी ममदापूर, देवना प्रकल्प महत्त्वपूर्ण

Crop Loan : पीककर्ज वाटपात ‘डीसीसी’सोबत स्टेट बँकेचेही आघाडी

Agriculture Science Center : कृषी विज्ञान संकुलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सेवा

SCROLL FOR NEXT