Solapur News : बार्शी तालुक्यातील वैराग, मुंगशी (वा), दहिटणे, सासुरे, वाळूज, तडवळे आदी परिसरात परतीच्या पावसाने सोयाबीनचे नुकसान झाले आहे. शेतात काढून पडलेल्या सोयाबीनचा चिखल होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास जाईल की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
वैराग परिसरात गेल्या ४ ते ५ दिवसांपासून पावसाची दररोज हजेरी आहे. विजांच्या कडकडाटासह मुसळधार सरी कोसळत आहेत. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी वीज कोसळून नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे. त्याबरोबरच मळणीसाठी काही ठिकाणी काढून ठेवलेले सोयाबीनचे बुचाड पाण्यात जाऊन तर सोयाबीनचे पीकच पाण्याखाली गेल्याने काही शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे.
सोयाबीनची बाजारामध्ये जशी आवक वाढेल, तशी दरात घसरण होऊ लागली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर या परिसरातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. खरीप हंगामातील सोयाबीन, कांदा आदी पिकांवर शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक गणित अवलंबून असते. त्याच पिकांचे आपल्या डोळ्यासमोर नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
बार्शी तालुक्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली तेथील पिकांचे नुकसान झाले आहे. पिकांचे पंचनामे देखील झाले. मात्र, गेली चार-पाच दिवस परतीचा पाऊस बरसत आहे. त्यामुळे शेतात उभे असलेले तसेच काढून ठेवलेले सोयाबीन संपूर्ण भिजले असून, त्याचा अक्षरशः चिखल होत आहे. याचा परिणाम पुढच्या रब्बीच्या पिकांवरही होणार आहे. खरिपातील नुकसानीची भऱपाई मिळण्याची मागणी होत आहे.
परिसरातील अनेक गावांमध्ये परतीच्या पावसाने शेतातील सोयाबीन पिकांचे फार मोठे नुकसान झाले आहे. शासनाने त्वरित पंचनामे करण्याची व्यवस्था करून आर्थिक मदत द्यावी. दिवाळीपूर्वी मदत देण्याची व्यवस्था करावी.-संदीप क्षीरसागर, शेतकरी, मुंगशी (वा)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.