Solar Pump Support Agrowon
ॲग्रो विशेष

Solar Pump Support: सौर कृषिपंपांच्या समस्यांवर महावितरणची ऑनलाइन सुविधा

Farmer Welfare: राज्यात सौर कृषिपंप बसवलेल्या लाखो शेतकऱ्यांना आता बिघाडाच्या समस्यांसाठी महावितरणकडून ऑनलाईन आणि फोनवर तक्रार नोंदविण्याची सुविधा मिळाली आहे. तक्रार केल्यानंतर तीन दिवसांत दुरुस्ती होणार आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Ahilyanagar News: राज्यात विविध योजनांमध्ये बसविण्यात आलेल्या एकूण सौर कृषिपंपांची संख्या ५ लाख ६५ हजारांवर पोहोचली असून महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. आणखी पाच लाख सौर कृषिपंप बसविण्यात येणार आहेत. सौर कृषिपंप बसविल्यानंतर त्यात काही बिघाड होण्याच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी महावितरणने पुढाकार घेतला आहे.

शेतकऱ्यांना घरबसल्या फोनवरून अथवा ऑनलाइन तक्रार करण्यासाठी सुविधा उपलब्ध केली आहे. शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.मे महिन्याच्या अखेरीस आलेल्या वादळी वाऱ्यांमुळे आणि मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी सौर ऊर्जानिर्मिती पॅनेल्स कोसळून नुकसान झाले.

अशा प्रकारच्या विविध समस्या सोडविण्यासाठी व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. सौर कृषिपंप बसविल्यानंतर पंप चालत नसणे, सौर पॅनेलची नासधूस होणे, सौर ऊर्जा संच काम करत नाही, सौर पॅनेल्सची किंवा पंपाची चोरी होणे अथवा पंपातून कमी दाबाने पाणी येणे, अशा विविध तक्रारी शेतकरी करू शकतील. सौर कृषिपंप संचाचा विमा उतरविण्यात आला आहे.

लाभार्थी शेतकऱ्यांना महावितरणच्या टोल फ्री नंबरवरून किंवा महावितरणच्या संबंधित वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणी करून किंवा थेट संबंधित पुरवठादार कंपनीच्या वेबसाइटवर नोंदणी करून तक्रार नोंदविता येईल. तक्रार नोंदविताना शेतकऱ्याने सौर कृषिपंपाचा लाभार्थी क्रमांक लिहिला तर पुरेसे आहे. शेतकरी आपला नोंदणीकृत मोबाइल क्रमांक लिहूनही तक्रार करू शकतात.

आपला जिल्हा, तालुका, गाव व स्वतःचे नाव अशी माहिती देऊनही तक्रार करता येईल.शेतात सौर कृषिपंप बसविल्यानंतर पाच वर्षे त्याची देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी संबंधित पुरवठादार कंपनीवर आहे. शेतकऱ्यांनी तक्रार नोंदविल्यानंतर तीन दिवसांत तक्रारीचे निवारण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. सर्व कंत्राटदारांना त्यांनी ज्या जिल्ह्यात पंप बसविले आहेत त्या जिल्ह्याच्या ठिकाणी सेवा केंद्र उभारणे बंधनकारक करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांच्या तक्रारीचे निराकरण झाल्यावर त्यांना मोबाइलवर संदेश मिळेल. शेतकऱ्यांच्या तक्रारी व त्यांचे निराकरण याबाबत कंत्राटदार कंपन्यांच्या कामावर महावितरणच्या प्रत्येक मंडलाच्या अधीक्षक अभियंत्यांची देखरेख राहील. याबाबत महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी आदेश दिले आहेत.

अशी करा तक्रार

महावितरणच्या माध्यमातून बसविलेल्या सौर कृषिपंपांविषयी काही तक्रार असल्यास महावितरणचा टोल फ्री क्रमांकावर (१८००-२३३-३४३५ व १८००-२१२-३४३५) तसेच मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेची वेबसाइट https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY आणि पुरवठादार कंपनीची वेबसाइट यावर थेट जाता येईल किंवा महावितरणच्या वेबसाइटवर एकत्रितपणे सर्व ४४ पुरवठादार कंपन्यांच्या लिंक उपलब्ध केल्या आहेत तेथे तक्रार करता येईल, असे महावितरणकडून सांगण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Scheme : कृषी स्वावलंबन, कृषिक्रांती योजनेकडे शेतकऱ्यांचा कल

Fertilizer Stock : युरिया, डीएपी खतांचा साठा शेतकऱ्यांसाठी खुला

Vidarbha Rain : पावसामुळे अनेक मार्गांवरील वाहतूक बंद

Desi Cow Conservation : सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये देशी गोवंश पालनास महत्त्व

Crop Insurance : मराठवाड्यात केवळ १२ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

SCROLL FOR NEXT