Nashik News : राज्यात विविध योजनांमध्ये बसविण्यात आलेल्या एकूण सौर कृषिपंपांची संख्या ५ लाख ६५ हजारांवर पोहोचली असून, महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. आणखी पाच लाख सौर कृषिपंप बसविण्यात येणार आहेत.
हे पंप बसविल्यानंतर त्यात काही बिघाड होण्याच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी महावितरणने पुढाकार घेतला असून, शेतकऱ्यांना घरबसल्या फोनवरून अथवा ऑनलाइन तक्रार करता येईल, अशी सुविधा उपलब्ध केली आहे. शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केले आहे.
मे महिन्याच्या अखेरीस आलेल्या वादळी वाऱ्यांमुळे आणि मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल्स कोसळून नुकसान झाले. अशा प्रकारच्या विविध समस्या सोडविण्यासाठी व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. सौर कृषिपंप बसविल्यानंतर पंप चालत नसणे, सौर पॅनेलची नासधूस होणे, सौर ऊर्जा संच काम करत नाही, सौर पॅनेल्सची किंवा पंपाची चोरी होणे अथवा पंपातून कमी दाबाने पाणी येणे अशा विविध तक्रारी शेतकरी करू शकतील.
सौर कृषिपंप संचाचा विमा उतरविण्यात आला आहे.लाभार्थी शेतकऱ्यांना महावितरणच्या टोल फ्री नंबरवर फोन करून किंवा महावितरणच्या संबंधित वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणी करून किंवा थेट संबंधित पुरवठादार कंपनीच्या वेबसाइटवर नोंदणी करून तक्रार नोंदविता येईल. तक्रार नोंदविताना शेतकऱ्याने सौर कृषिपंपाचा लाभार्थी क्रमांक लिहिला तर पुरेसे आहे.
शेतकरी आपला नोंदणीकृत मोबाइल क्रमांक लिहूनही तक्रार करू शकतात. आपला जिल्हा, तालुका, गाव व स्वतःचे नाव अशी माहिती देऊनही तक्रार करता येईल. शेतात सौर कृषिपंप बसविल्यानंतर पाच वर्षे त्याची देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी संबंधित पुरवठादार कंपनीवर आहे.
शेतकऱ्यांनी तक्रार नोंदविल्यानंतर तीन दिवसांत तक्रारीचे निवारण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.सर्व कंत्राटदारांना त्यांनी ज्या जिल्ह्यात पंप बसविले आहेत त्या जिल्ह्याच्या ठिकाणी सेवा केंद्र उभारणे बंधनकारक करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीचे निराकरण झाल्यावर त्यांना मोबाईलवर संदेश मिळेल. शेतकऱ्यांच्या तक्रारी व त्यांचे निराकरण याबाबत कंत्राटदार कंपन्यांच्या कामावर महावितरणच्या प्रत्येक मंडलाच्या अधीक्षक अभियंत्यांची देखरेख राहील.
...अशी तक्रार करा
महावितरणच्या माध्यमातून बसविलेल्या सौर कृषी पंपांविषयी काही तक्रार असल्यास खालील प्रकारे ती तक्रार नोंदविता येईल
महावितरणचा टोल फ्री क्रमांक : १८००-२३३-३४३५ व १८००-२१२-३४३५
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेची वेबसाइट https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY
पुरवठादार कंपनीची वेबसाइट-यावर थेट जाता येईल किंवा महावितरणच्या वेबसाइटवर एकत्रितपणे सर्व ४४ पुरवठादार कंपन्यांच्या लिंक उपलब्ध केल्या आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.