Sharad Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Sharad Pawar News : महिलाविरोधी धोरणांचा रस्त्यावर उतरून विरोध करा : शरद पवार

NCP Women Wing : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या महिला आघाडीला पाच कलमी कार्यक्रम दिला.

Swapnil Shinde

Mumbai News : राज्य सरकारच्या विद्यार्थी, तरुण, महिलांविरोधातील धोरणांचा रस्त्यावर उतरून विरोध करा, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या महिला आघाडीला पाच कलमी कार्यक्रम दिला.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथे महिला पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत शरद पवार बोलत होते.

कुटुंबाच्या मालमत्तेत महिलांना अधिकार देण्याचा निर्णय आपण घेतला. शेतकऱ्यांच्या कुटुंबात सात-बाराच्या उताऱ्यावर पती-पत्नी दोघांची नावे असली पाहिजेत, असा निर्णय माझ्याकडे सत्ता असताना घेतला. याची शंभर टक्के अंमलबजावणी होत नाही, त्यासाठी आपल्याला सरकारकडे आग्रह धरावा लागेल, असे शरद पवार म्हणाले.

मणिपूरमध्ये महिलांची धिंड काढली जाते, त्यांना जिवंत मारले जाते. या सगळ्याबाबत आपल्याला अतिशय जागृत राहावे लागेल. असा प्रकार घडला, तर राष्ट्रवादीच्या त्या भागातील भगिनी रस्त्यावर उतरल्याच पाहिजेत, असे सांगत यासाठी अंगावर केसेस घ्यावा लागल्या तरी चालेल, पक्ष त्याची काळजी घेईल, असे आवाहन पवारांनी उपस्थित महिला कार्यकर्त्यांना केले.

राज्य सरकारने शाळांचे समायोजन करण्यासाठी काही शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सावित्रीबाई फुलेंच्या महाराष्ट्रात शाळा बंद करून मुलांना शाळाबाह्य ठेवले जात आहे. याविषयी सावित्रीच्या लेकी गप्प बसल्या, तर लोक आपल्याला त्याचा जाब विचारतील. तुमच्या परिसरात प्राथमिक शिक्षणातून मुलांना बाजूला ठेवण्याचा सरकारचा डाव तुम्ही थांबवला पाहिजे, असेही पवार यांनी या वेळी सांगितले.

आज एका बाजूने नोकऱ्यांची कमतरता आहे आणि दुसरीकडे शासनातील रिक्त जागांची संख्या जास्त आहे. पण सरकार कंत्राटी पद्धतीने नोकरभरती करत आहे. तसेच १ जानेवारी २३ ते ३१ मे २०२३ या काळात या पाच महिन्यांच्या काळात राज्यात १९ हजार ५५३ तरुणी आणि महिला बेपत्ता झाल्या. हा प्रश्‍न गंभीर असून, या मुद्यावर आपण गप्प बसायचे का, असा सवाल करत यावरही आवाज उठवण्याची सूचना पवार यांनी आपल्या भाषणात केली.

जिल्हा परिषद, नगरपरिषदेच्या शाळा खासगी कंपनीला दिल्या जात आहेत. या कंपन्या आपल्या मर्जीप्रमाणे या शाळा चालवत आहेत. नाशिकमध्ये अशीच एक शाळा मद्य तयार करणाऱ्या कंपनीने दत्तक घेतली आणि तिथे हल्ली गौतमी पाटीलचा कार्यक्रम झाला, हा आदर्श आपण मुलांसमोर ठेवायचा का, असा सवाल करत यालाही आपण विरोध करायला हवा, असे पवार या वेळी म्हणाले.

यासंदर्भात राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांना आपण सविस्तर माहिती देणार असून, राष्ट्रवादीची महिला आघाडी या प्रश्‍नांवर जागरूक असली पाहिजे, असेही पवार यांनी या वेळी सांगितले.

पालकमंत्रिपदासाठी महाराष्ट्राचे नेतृत्व दिल्लीसमोर झुकत नाही : सुप्रिया सुळे

यशवंतराव चव्हाण यांनी स्वाभिमान दाखविला. जेव्हा गरज पडली तेव्हा तेव्हा महाराष्ट्राचे नेतृत्व दिल्लीला गेले आहे. महाराष्ट्राचे नेतृत्व कधी पालक मंत्रिपदासाठी दिल्लीसमोर झुकत नाही, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्यावर केली. माझ्या अश्रूंची काळजी करू नका. त्यांची आता फुले झाली आहेत. आपली वैयक्तिक लढाई कुणाशी नाही. आपण आपल्यात लढायचे नाही. राष्ट्रवादी - राष्ट्रवादीत भांडण करायचे नाही. आपले भांडण केवळ भ्रष्ट जुमला पार्टीशी आहे, असेही सुप्रिया सुळे या वेळी म्हणाल्या.

परतीचे दोर कापले गेलेत : जयंत पाटील

आपला पक्ष वाढू नये म्हणून शरद पवार आणि विरोधक एकच आहोत अशा अफवा पसरवल्या जात आहेत. जे गेले त्यांचे परतीचे दोर कापले गेले आहेत. शरद पवार हे निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन बसतात यातच सर्व काही आले. त्यामुळे कुणीही मनात शंका न ठेवता काम करा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Legislative Assembly: कृषिमंत्री कोकाटे यांची पावसाळी अधिवेशनाकडे पाठ

Pune APMC Scam: बाजार समिती संचालकांची ‘ईडी’मार्फत चौकशी करा

Guru Pournima 2025: गुरुपौर्णिमेला गुरुकुंजात गुरुदेवभक्तांची मांदियाळी

Pomegranate Price: डाळिंबाच्या एका क्रेटला साडेसहा हजार रुपये दर

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील गैरप्रकार बिहारमध्ये चालू देणार नाही

SCROLL FOR NEXT