Neral News : कर्जत तालुक्यातील पाली भूतिवली हे सर्वांत मोठे धरण म्हणून प्रसिद्ध आहे. धरणाच्या पाझरावर अनेक गावांच्या पाणी योजना अवलंबून आहेत. मात्र, यातील साठा गेली अनेक वर्षे मृतावस्थेत होता.
त्यामुळे २००३ नंतर धरणाच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी धरणाचे पाणी सोडण्यात आले. त्यामुळे पाली भूतिवली येथील नागरिकांना ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कर्जत तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त रेल्वेपट्ट्यात शेती करता यावी, यासाठी तत्कालीन आमदार तुकाराम सुर्वे यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा करून लघुपाटबंधारे प्रकल्प मंजूर केला होता. त्या धरणाचे अनेक वर्षे रखडलेले काम अद्याप पूर्ण झालेले नव्हते.
धरणाच्या मुख्य जलाशयात २००३ मध्ये पाणी अडविण्यात आले होते. धरणातून पाझरून येणाऱ्या पाण्यावर आसन, माणगाव, उमरोली, चिंचवलीसह अनेक गावांच्या वाड्यांच्या योजना अवलंबून आहेत.
धरणाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने आम्ही पाण्याचा स्तर कमी केला. याबाबत आम्ही परिसरातील ग्रामपंचायतींना कळवले होते. ठेकेदारालादेखील याबाबत सूचित केले आहे. ग्रामस्थांना पाण्याचा त्रास होणार नाही, याची आम्ही काळजी घेत आहोत.एस. एस. शिंदे, उपअभियंता, लघु पाटबंधारे उपविभाग, कर्जत
सध्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. अशा परिस्थितीत पाटबंधारे विभागाकडून धरणामधून अतिरिक्त पाणी बाजूच्या कॅनलमधून सोडण्यात आले आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी घटत चालली आहे.सागर शेळके, अध्यक्ष, शिवशाही युवा प्रतिष्ठान
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.