Pune News: पुणे जिल्ह्यातील गडकिल्ले, प्राचीन मंदिरांच्या संवर्धनासह मुळशीत साहसी क्रीडा प्रकारांच्या जागतिक स्पर्धांसाठीचा विकास आराखडा करताना जिल्हा पर्यटनात देशात आघाडीवर नेण्याचा प्रयत्न असल्याचे अर्थ व नियोजनमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत सोमवारी (ता.२८) झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पर्यटन विकास आराखडा या वेळी सादर केला. या वेळी उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख यांच्या मंत्रालय आणि पुणे जिल्ह्यातील संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील गडकिल्ले, प्राचीन मंदिरे, लोककला, लोकसंस्कृतीचा समृद्ध वारसा, पर्यटनवाढीच्या अमर्याद संधीचा उपयोग करून पर्यटन नकाशावर स्वतंत्र स्थान निर्माण करण्याच्या दृष्टीने पुणे जिल्ह्याचा देशाच्या सर्वसमावेशक पर्यटन विकास आराखडा तयार करण्याचे आदेश पवार यांनी या वेळी दिले.
या वेळी मंत्री पवार म्हणाले, ‘‘आपल्या राज्यात येणाऱ्या विदेशी पर्यटकांपैकी ७९ टक्के पर्यटक मुंबईला भेट देतात. पुण्याला अवघे १४ टक्के पर्यटक येतात. या आराखड्याच्या अंमलबजावणीतून येत्या तीन वर्षांत जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या चाळीस लाखांवर, तर पुढील पाच वर्षांत एक कोटींवर नेण्याचा प्रयत्न आहे.
त्यातून जिल्ह्याच्या सकल उत्पन्नात दहा ते पंधरा हजार कोटींची वाढ होईल. पन्नास हजार रोजगार निर्मितीचा तसेच पाच लाख अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीचाही उद्देश आहे. साहसी क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा तसेच सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन दर वर्षी विशिष्ट कालावधीत नियमितपणे केले जाईल. त्यातून जिल्ह्याच्या पर्यटनक्षेत्राला नवी ओळख मिळेल.’’
हा आराखडा गुजरातने कच्छच्या वाळवंटात ‘रणउत्सव’, अरुणाचल प्रदेशने झीरो व्हॅलीमध्ये ‘झिरो फेस्टिव्हल’, राजस्थानने जयपूरला ‘साहित्य महोत्सव’, नागालँडमध्ये ‘हॉर्नबिल महोत्सव’ यांचा अभ्यास करून तयार करण्यात आला आहे.
‘पर्यावरणाचा विचार करून आराखडा सादर करा’
‘‘माळशेज घाटातील पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या विश्रामगृहाच्या शेजारील टेकडीवर काचेच्या स्कायवॉकची सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर उभारण्याचा प्रस्ताव एका महिन्यात सादर करावा, अशा सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पर्यटन व सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या.
दरम्यान, पर्यावरणाचा विचार करून हा आराखडा करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, ठाणे आणि पुणे या जिल्ह्यांच्या सीमेवर तसेच कल्याण-नगर महामार्गावर वसलेला माळशेज घाट निसर्गरम्य पर्यटनस्थळ आहे. हा प्रकल्प उभारताना त्यातून पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेला भाग वगळावा. याविषयी वनविभागाचा अभिप्राय लक्षात घेऊन ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी वन विभागाला पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी,’’ अशी सूचनाही पवार यांनी दिल्या.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.