Buldana News : जिल्ह्यातील २०२३ च्या खरीप व रब्बी हंगामातील पीकविम्यापासून वंचित राहलेल्या पात्र-अपात्र शेतकऱ्यांना तातडीने पीकविमा देण्यासाठी संबंधित कंपनीला बाध्य करा आणि शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने पीकविम्याची रक्कम जमा करा, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली. मुंबई येथे मंत्रालयात प्रधान कृषी सचिव श्रीमती जयश्री भोज यांची भेट घेतली.
शेतकऱ्यांना आतापर्यंत पीकविमा कंपनीने २०२३ च्या खरीप हंगामातील पात्र २ लाख २४ हजार ४८२ शेतकऱ्यांच्या खात्यावर १३८ कोटी ५१ लाख रुपये जमा केले. रब्बी हंगामातील पात्र ५६ हजार ९८९ शेतकऱ्यांच्या खात्यावर १२५ कोटी २२ लाख रुपये कंपनीने जमा केले आहेत. आता पीकविम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी देखील तुपकरांनी आता पुन्हा पाठपुरावा सुरू केला आहे.
रब्बी हंगामात कापणी पश्चात अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना अद्याप कंपनीने पैसे दिले नाहीत. त्याचबरोबर खरीप हंगामातील ७० हजार ८३१ शेतकऱ्यांना कंपनीने काही कारणास्तव अपात्र केले आहे. त्या शेतकऱ्यांना पीकविमा देण्याचे कंपनीने मान्य केले आहे.
‘त्या’ शेतकऱ्यांना व रब्बी हंगामातील कापणी पश्च्यात व अपात्र अशा १ लाख २६ हजार २६९ शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने पीकविमा जमा करावा, अशी मागणी तुपकरांनी लावून धरली. शासनाकडून उर्वरित हिस्सा मिळाल्यानंतरच या वंचित शेतकऱ्यांची पीकविमा रक्कम जमा करू, असे कंपनीकडून सांगण्यात आले.
त्यामुळे तुपकरांनी मंत्रालयात जयश्री भोज यांची भेट घेत चर्चा केली. सरकारने कंपनीला वंचित शेतकऱ्यांना पीकविमा रक्कम अदा करण्यास बाध्य करावे, पीकविमा देण्यासाठी विलंब करणाऱ्या AIC पीकविमा कंपनीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. यासंदर्भात उर्वरित रकमेसाठीचा अहवाल कृषी विभागाने वित्त विभागाला पाठविण्याच्या सूचना भोज यांनी दिल्या आहेत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.