Mango Blossom Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Blossom : बोर्डीमध्ये प्रतिकूल वातावरणामुळे मोहोर लांबणीवर

Team Agrowon

Bordi News : गेल्या काही दिवसांपासून बोर्डी परिसरात प्रतिकूल वातावरणामुळे आंब्याला मोहोर येण्याची प्रक्रिया लांबली आहे. मागील चार दिवसांपासून ढगाळ वातावरण व संध्याकाळच्या वेळी धूरसदृश हवामान निर्माण होत असल्यामुळे आंबा बागायतदार, तसेच भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

डहाणू तालुक्याच्या उत्तरेकडील नरपड, चिखले, घोलवड, बोर्डी, रामपूर, अस्वली, जांबुगाव, चिंबावे, वाकी, झारली अशा सुमारे १५ गावांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात चिकू, आंबा बागायती आहेत. साधारणपणे दरवर्षी डिसेंबर ते जानेवारीमध्ये आंब्याच्या झाडांना मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू होते, असा बागायतदारांचा अनुभव आहे;

परंतु मागच्या सात-आठ वर्षांपासून डिसेंबरमध्ये अपेक्षित थंडी पडत नसल्यामुळे मोहोर येण्याची प्रक्रिया फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होत असल्याचे दिसून येते. गेल्या सप्टेंबरमध्येच पावसाने काढता पाय घेतल्यामुळे चालू वर्षी मोहोर येण्याची प्रक्रिया लवकर सुरू होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता.

या अनुषंगाने शेतकऱ्यांनी आंबा बागायतीमध्ये खत-पाणी व्यवस्थापन, तसेच कीटकनाशक फवारणी आदी आवश्यक मशागतीवर मोठा खर्च केला; परंतु फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत आंब्याच्या झाडांना मोहोर येण्याची प्रक्रिया अतिशय संथ गतीने होत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच वातावरणात बदल होत असल्यामुळे मोहोर येण्याची प्रक्रिया लांबली आहे. यावर्षी शेतकऱ्यांना आंबा बागायतीमध्ये निराशादायी चित्र दिसत आहे.

गेल्यावर्षीही निराशा

२०२३च्या हंगामात आंबा बागायती चांगल्या बहरल्या होत्या; परंतु मेच्या १६ तारखेपासून बिपरजॉय चक्रीवादळाने आंब्याचे पीक झोडपून काढल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. तसेच चिकू बागायतदारांनाही पावसाळी हंगामात फळांची आवक कमी झाल्यामुळे नुकसान झाले होते. चालू वर्षाच्या सुरुवातीपासून काही प्रमाणात परिस्थिती सुधारेल, या आशेने पुन्हा एकदा कामाला लागलेला शेतकरी नैसर्गिक आपत्तीमध्ये गुरफटला गेला आहे.

चालू वर्षी आंब्याला मोहोर येण्याची प्रक्रिया लांबली आहे; परंतु आता हळूहळू तो येऊ लागला आहे. दरवर्षी फेब्रुवारीमध्ये मोहोर येण्याची प्रक्रिया पूर्ण होते. मात्र, चालू वर्षी फार उशीर झाला. त्यामुळे शेतकऱ्याच्या हाती फळे पडेपर्यंत पावसाचा धोका संभवेल काय, अशी भीती आहे.
पंकज तुकाराम राऊत, आंबा बागायतदार
चालू वर्षी आंबा बागायतीमध्ये झाडांना मोहोर येण्याची प्रक्रिया लांबली आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पालघर जिल्ह्याच्या पश्चिम भागात थंडीचे प्रमाण अनियमित व कमीच असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मोहोर येण्यासाठी अनुकूल वातावरण निर्मिती झाली नसावी, त्याचा परिणाम दिसून येत आहे.
विलास जाधव, शास्त्रज्ञ, कोसबाड कृषी विज्ञान केंद्र

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

Fruit Crop Insurance : फळपीक विमा योजनेत नियमबाह्य सहभागाबाबत कारवाईसत्र

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

SCROLL FOR NEXT