Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Monsoon Rain : मॉन्सूनपूर्व पावसाने दाणादाण

Team Agrowon

Pachora News : जळगाव जिल्ह्यातील काही भागांत मॉन्सूनपूर्व पावसाने शुक्रवारी (ता. ७) सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली. चोपडा तालुक्यातील अनेक गावांत ढगांच्या गडगडाटासह वादळी वारा, पाऊस झाल्याने ग्रामीण भागात अनेक ठिकाणी झाडे कोलमडली. चोपडा तालुक्यातील लासूर येथे वादळी वाऱ्यामुळे झाड पडून म्हैस मृत्युमुखी पडली.

अनवर्दे बुद्रुक येथे वीज पडून म्हैस ठार झाली; तर हिंगोणे येथील सात ते आठ घरांचे पत्रे उडाली. दुसरीकडे पाचोरा तालुक्यात कुरंगीसह गिरणाकाठावरील परिसरात वादळी वाऱ्याने केळीसह लिंबाच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत.चोपडा तालुक्यात वादळी वाऱ्याने मामलदे येथील जिल्हा परिषद शाळेचे देखील पत्रे उडून नुकसान झाले आहे.

अडावद, गोरगावले या भागातील किमान ४० हेक्टर शेतजमिनीवरील केळी पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती कृषी विभागाचे अधीक्षक दीपक साळुंखे यांनी दिली. दरम्यान, सातपुडा भागातील काही आदिवासी गावांत देखील पिकांचे काही प्रमाणात नुकसान झालेले आहे.

कुरंगी परिसराला झोडपले

नांद्रा (ता. पाचोरा) : कुरंगीसह गिरणाकाठावरील परिसरात शुक्रवारी (ता. ७) रात्री नऊपासून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यात केळीबागा जमीनदोस्त झाल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. त्याचबरोबर लिंबाच्या बागांनाही फटाका बसला आहे. मोठमोठी झाडेही उन्मळून पडली आहे. वीजखाबांवरही झाडे पडल्याने रात्री नऊपासून सकाळी बारापर्यंत पाचोरा येथून येणाऱ्या ३३ केव्हीचा वीजपुरवठा हा माहेजी व लासगाव फिटरमधून खंडित झाला होता.

दरम्यान, वीज वितरण कंपनीचे कर्मचारी व अधिकारी यांनी प्रचंड मेहनत घेऊन वीजपुरवठा सुरळीत केला. कुरंगी येथील माजी सरपंच पंढरीनाथ गोविंदा पाटील यांच्या सहा बिघे शेतातील सात हजार केळीखोड जमीनदोस्त झाल्याने मोठे नुकसान झाले. शेतातील लिंबूबागही जमीनदोस्त झाली आहे.

या बाबतीत कुरंगी तलाठी नजीम शेख यांनी शेतात जाऊन पंचनामा केला आहे. दरम्यान, नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिलेले आहेत. पंचनामे झाल्यावर शासनाकडून योग्य ती नुकसानभरपाई मिळवून देण्यात येईल, असे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले.

पोल्ट्री शेडसह कांदाचाळीचे साक्री तालुक्यात नुकसान

साक्री तालुक्याच्या बहुतांश भागात शुक्रवारी (ता.७) सायंकाळी मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी वादळी वाऱ्यासह वरुण राजाने दमदार हजेरी लावत सलामी दिली. जोरदार वादळामुळे दाणादाण उडाल्यामुळे बळीराजाला एकीकडे पावसाच्या आगमनाचा आनंद तर दुसरीकडे नुकसानीमुळे डोळ्यांत मात्र अश्रूंच्या धारा आहेत.

वादळामुळे हिंदळा शिवारात भाऊसाहेब शांताराम ह्याळीस यांच्या शेतातील घरातील सर्व पत्रे उडून काही अंतरावर फेकले गेले. ह्याळीस यांच्या कांदा चाळीतील पत्रा उघडल्याने सुमारे शंभर क्विंटल कांदा पाण्यात सापडला. तसेच जगदीश रघुनाथ पाटील यांच्या शेतातील आंब्याची झाडे उन्मळून पडली. काकोर शिवारात योगेश हिरामण देवरे यांच्या पोल्ट्रीची भिंत पडल्यामुळे सुमारे साडेतीनशे पक्षी मृत्यूमुखी पडले.

चिचंखेडे (ता.साक्री) येथील पाडगण शिवारात प्रा. भूषण विश्वासराव देवरे यांच्या शेतातील कांदा चाळ वादळामुळे सुमारे दोनशे फूट लांब अंतरावर फेकली गेली. येथील होळी चौकात लिंबाचे झाड उन्मळून पडले असून म्हसदीसह, चिंचखेडे, अक्कलपाडा, वसमार, ककाणी, राजबाई शेवाळी, वसमार, भडगाव, काळगाव व देऊर (ता.धुळे) येथील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT