Dairy Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Dairy Movement: शिलेदार महाराष्ट्रातील दूध चळवळीचे...

Dairy Farming: महाराष्ट्रातील जातिवंत दुधाळ गाई, म्हशींचा प्रसार आणि पशुपालन उद्योगाला चालना देण्यामध्ये मणिभाई देसाई, अप्पासाहेब पवार, शंकरराव मोहिते-पाटील यांच्यासारख्या दूरदृष्टी असलेल्या व्यक्तींचा मोठा सहभाग आहे.

Team Agrowon

Pioneers of Milk Revolution: ‘‘साधारणपणे १९७० दरम्यानचा काळ...शेतकऱ्यांच्या गोठ्यामध्ये कृत्रिम रेतनाची सेवा देण्यासाठी ‘बाएफ’चे कार्यकर्ते जायचे, तेव्हा आजूबाजूचे लोक उत्सुकतेने जमायचे. त्यांना हा काहीतरी अद्‌भुत प्रकार वाटायचा. या तंत्रज्ञानामुळे गाईचे कसे काय होणार, अशी शंका त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेली असायची. या निमित्ताने कार्यकर्ते शेतकऱ्यांना कृत्रिम रेतनाची संपूर्ण तांत्रिक माहिती द्यायचे.

त्यांचे शंकानिरसन करायचे. कालांतराने गाईने धष्टपुष्ट निरोगी वासराला जन्म दिला, की त्यांना काही फारसे पटविण्याची गरज पडायची नाही. थोडक्यात सांगायचे झाले, तर दुग्धोत्पादन वाढीचे विचार पोहोचविण्यासाठी प्रात्यक्षिक आणि तोंडी प्रचार हेच प्रभावी माध्यम आहे. हे मणिभाई देसाई यांनी जाणले. त्यांच्या मार्गदर्शनानुसार ‘बाएफ’ संस्थेने देशभरात शाश्‍वत ग्राम आणि शेती विकासासाठी पशुपालनातील तंत्रज्ञान प्रसार आणि दुग्धोत्पादनाला चालना दिली...’’

‘बाएफ’ संस्थेचे वरिष्ठ सल्लागार डॉ. अशोक पांडे राज्यातील पशुपालनाला चालना देण्यामागे मणिभाई देसाई यांनी पशुपालन धोरणाच्या कार्यक्रमाची कशी आखणी केली, त्याला पशुपालकांना कसा प्रतिसाद मिळत गेला याबाबतचा प्रवास सांगत होते. डॉ. पांडे म्हणाले, की मणिभाईंनी पशुपालन आणि दुग्धोत्पादनाला चालना देण्यासाठी उरुळीकांचन (जि. पुणे) येथे १९४७ मध्ये गीर गाईंची निवड करून शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचविण्यास सुरुवात केली.

सौराष्ट्रातून गीर गाईचा पहिला कळप आणला. यामध्ये ‘धर्मराग’ नावाचा वळू आणि जमुना, गौरी, इंजन, कावेरी, रंगा आणि गोरार अशा बऱ्याच जातिवंत दुधाळ गीर गाई होत्या. दरम्यानच्या काळात गुजरातचे मुख्यमंत्री ढेबरभाई हे उरुळीकांचन येथील आश्रमामध्ये उपचारासाठी आले होते, तेव्हा मणिभाईंनी केलेली व्यवस्था पाहून त्यांनी काही उत्कृष्ट वंशाच्या गीर कालवडी भेट दिल्या.

१९५८ च्या दरम्यान मणिभाईंनी पुण्याच्या स्पायसर कॉलेजमधून ‘सावित्री’ नावाची गाभण गाय आणली होती. ही गाय ‘टूमन’ नावाच्या होल्स्टिन जातीच्या परदेशी वळूकडून गाभण होती. सावित्रीने एका संकरित कालवडीला जन्म दिला. आश्रमाच्या गोशाळेतील ही पहिली संकरित पैदास. मणिभाईंनी या कालवडीचं नाव देखील ‘सावित्री’ ठेवलं. ती चांगली धष्टपुष्ट आणि काळी कुळकुळीत होती.

दहा महिने आणि चार दिवसांनी ती माजावर आली. गीर गोवंशाच्या बाबतीत असे कधी घडलं नव्हतं. सामान्यतः गीर गाईला माजावर यायला तीन वर्षे लागतात. मात्र दोन वर्षांची होण्याच्या आत सावित्रीने एका सुंदर वासराला जन्म दिला आणि पुढे ती भरपूर दूध देऊ लागली. या संकरित गाईचे प्रति दिन सरासरी दूध उत्पादन ११ ते १२ लिटर इतके होते. दुभता काळही जास्त होता.

आतापर्यंत प्रक्षेत्रावर एकाही गाईने प्रति दिन एवढे दूध दिले नव्हते. या संकरित गाईच्या माध्यमातून मणिभाईंना दुग्धोत्पादन वाढीचे उत्तर सापडलं! या सावित्री गाईमध्ये विलायती वळूकडून दुग्धोत्पादन, प्रजोत्पादन आणि भारतीय गाईतील उष्णता आणि रोग प्रतिकार करण्याचे विशिष्ट गुणधर्म आनुवंशिकतेने आले होते. मणिभाईंच्या असं लक्षात आलं, की हीच संकरित दुधाळ गाय लाखो लोकांना पशुपालनातून किफायतशीर स्वयंरोजगार देऊ शकते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT