Outbreak of 'Kukumber Mosaic' disease in banana orchards
Outbreak of 'Kukumber Mosaic' disease in banana orchards Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Disease : केळी बागांमध्ये ‘कुकुंबर मोझॅक’ रोगाचे थैमान

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

अॅग्रोवन वृत्तसेवा
जळगाव ः खानदेशसह मध्य प्रदेशात जुलै व ऑगस्टमध्ये लागवड केलेल्या केळी बागांवर (Banana Orchard) कुकुंबर मोझॅक व्हायरस (सीएमव्ही) (Kukumber Mosaic disease) या विषाणूजन्य रोगाचा (Viral Disease) फैलाव झाला आहे. केळीचे आगार म्हणून ओळख असलेल्या रावेर, यावल, मुक्ताईनगर, जामनेर, नंदुरबारमधील शहादा भागांतही हा रोग केळी पिकात दिसून आला आहे. सीएमव्हीने पीक वाया गेल्याने ते काढून फेकण्याची वेळ अनेकांवर आली आहे.


जिल्ह्यातील रावेरमधील केऱ्हाळे, दसनूर, अहिरवाडी, वाघोदा बुद्रुक, मुक्ताईनगरमधील नायगाव, अंतुर्ली परिसर, जामनेरातील हिंगणे, पळासखेडा भाग, यावलमधील बामणोद, भालोद, न्हावी, कोचूर परिसर, नंदुरबारच्या शहादामधील ब्राह्मणपुरी, जवखेडा परिसरात सीएमव्ही रोगाचा फैलाव केळी पिकात झाला आहे.
मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर तालुक्यातील दापोरी, दापुरा, फोकनार, नाचणखेडा, दर्यापूर, शिरपूर, गुलई आदी भागातही जुलै व ऑगस्टमध्ये लागवड केलेल्या केळी बागांत सीएमव्ही दिसून आला आहे.

मोठे क्षेत्र बाधित
‘सीएमव्ही’मुळे जळगाव जिल्ह्यातील सुमारे दोन ते अडीच हजार हेक्टर केळीखालील क्षेत्र बाधित झाले आहे. यात काही बागांत या रोगाची लागण सुरुवातीच्या स्थितीत आहे. परंतु दोन ते अडीच हजार हेक्टरवरील बागा १०० टक्के काढून फेकण्याची स्थिती आहे. केऱ्हाळे (ता. रावेर) येथील दोन शेतकऱ्यांनी आपल्या १० हजार केळी झाडे थेट काढून फेकली आहेत.


कोट्यवधींची हानी
केळी लागवडीसाठी सुरुवातीलाच एकरी २५ ते ३० हजार रुपये खर्च येतो. तसेच जमिनीतून तसेच विद्राव्य खतेही दिली जातात. यावर आणखी वेगळा खर्च असतो. यातच अनेकांचे पीक १०० टक्के खराब झाले आहे. त्यांचे मोठे नुकसान झाले असून, रोगग्रस्त बाग काढून त्याची मशागत व नव्याने पेरणीसाठी आणखी मोठा खर्च करावा लागेल. यात कोट्यवधींची हानी जिल्ह्यात झाल्याचे दिसत आहे.

राष्ट्रीय केळी संशोधन केंद्रातील तज्ज्ञांना सूचना
जळगाव येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत कार्यरत केळी संशोधन केंद्राने ‘सीएमव्ही’ रोगाबाबत जळगाव, मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्यात प्राथमिक पाहणी केली आहे. तसा आपला अहवाल तयार झाला असून, याबाबत काय स्थिती केळी पिकात तयार झाली आहे, कुठली खबरदारी घेतली जावी याबाबतचा अहवाल तयार केला असून, तो महात्मा फुले कृषी विद्यापीठाला सादर केला जाणार आहे. तसेच या समस्येबाबत त्रिची (तमिळनाडू) येथील राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राला सूचना देण्यात आली असून, तेथील विषाणूजन्य रोग व विषाणूसंबंधी संशोधन करणारे शास्त्रज्ञ जिल्ह्यात पाहणीसाठी दाखल होण्याची शक्यता आहे, अशी माहिती केळी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. चंद्रशेखर पुजारी यांनी ‘अॅग्रोवन’शी बोलताना दिली.

जुलै व ऑगस्टमधील अनेक बागा ‘सीएमव्ही’ग्रस्त झाल्या आहेत. कीडी व इतर समस्या जुलै व ऑगस्टमध्ये आर्द्रतेमुळे अधिक असतात. यामुळे या काळातील बागांमध्ये मोठी हानी दिसून आली आहे. फक्त मेचा शेवटचा आठवडा व जूनचा पहिला आठवडा या काळात लागवड केलेल्या बागांमध्ये सीएमव्ही रोगाचे प्रमाण कमी आहे.
- चंद्रशेखर पुजारी, प्रमुख, केळी संशोधन केंद्र, जळगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delhi Farmers' protest : भाजपच्या उमेदवारांविरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा रोष वाढला; एसकेएमचा विरोध कायम

Lok Sabha Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ लाख ५० हजार मतदारांचा कौल कोणाला? मतदान केंद्रे सज्ज

Fire in Nainital : उत्तराखंडच्या जंगलातील आग पोहचली शेताच्या बांधावर, एका महिलेचा होरपळून मृत्यू

Animal Ear Tagging : ...अन्यथा भरपाई अन् अनुदान नाही

Sunburn Crop : कोवळी रोपे वाचविण्यासाठी शेतकरी सरसावला

SCROLL FOR NEXT