Sugarcane Management Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Management : अवर्षण परिस्थितीत उसाचे व्यवस्थापन

Team Agrowon

डॉ.अभिनंदन पाटील, डॉ.अशोक कडलग, डॉ.गणेश पवार

Sugarcane Crop Management : धरण क्षेत्रात पाऊस कमी पडल्यामुळे राज्यातील धरणात पाणीसाठा कमी प्रमाणात झाला. पुरेसा पाऊस झाला नसल्याने ऊस लागवडीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली नाही. शेतात उभ्या असलेल्या ऊस पिकास पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने उत्पादन आणि साखर उताऱ्यावर परिणाम होणार आहे. त्यासाठी योग्य प्रकारच्या उपाययोजना राबविणे गरजेचे आहे.

पिकाचे निरीक्षण केले असता बुंध्याकडील आणि शेंड्याकडील प्रत्येकी ८ ते १० कांड्या योग्य वाढीच्या असतात. मधल्या ८ ते १२ कांड्या आखूड, अपुऱ्या वाढीच्या असतात. हा परिणाम उन्हाळ्यातील पाण्याच्या टंचाईचा असतो. यामुळे उसात साखर कमी साठवली जाते. उसातील तंतुमय पदार्थाचे प्रमाण वाढते.

पूर्व हंगामी उसाला पाण्याचा ताण हा सुरुवातीच्या किंवा प्रथम वाढीच्या अवस्थेत सहन करावा लागतो. या कालावधीमध्ये फुटवे फुटण्याचे प्रमाण जास्त असते, कांड्याही सुटू लागतात, अशा अवस्थेत पाण्याचा ताण बसल्यास फुटवे मरण्याचे प्रमाण वाढते.

पिकाची फुटवा अवस्था अवर्षण काळात येते. त्यामुळे फुटव्यांचे प्रमाण फारच कमी राहते. ऊस एकसडी राहतो. मुळांची वाढ ही समाधानकारक होत नाही, त्यामुळे पीक अन्न व पाणी समाधानकारकपणे शोषू शकत नाही. उशिरा (फेब्रुवारी/ यानंतर) लागण केलेल्या उसास किडींचा जास्त प्रादुर्भाव दिसून येतो.

लागवड करत असताना पाण्याची शाश्‍वत उपलब्धतेनुसार आणि उन्हाळ्यात पाणी पुरवठा होऊ शकेल का, याचा विचार करून ठरावीक क्षेत्रावरच नवीन लागण करावी, खोडवा जोपासावा. उशिराची लागवड उन्हाळ्यात कमी पाण्यात तग धरणार नाही तसेच रोग, किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता जास्त असते.

अवर्षण परिस्थितीत हिरवळीचे पीक किंवा पाचटाचे आच्छादन करावे. रुंद सरी (४.५ ते ५ फूट) पद्धतीत ठिबक सिंचन करावे. रिकाम्या जागेत पाचटाचे आच्छादन करावे. अन्यथा रिकाम्या पट्ट्यातील जमिनीतून पाण्याचे बाष्पीभवन वाढते. पिकावर अनिष्ट परिणाम होतो.

बेण्याच्या उपलब्धतेसाठी ५ ते १० गुंठ्याचा छोटा बेणेमळा करावा. यातून पुढील लागण हंगामासाठी बेणे उपलब्ध होईल.

ऊस तुटून गेल्यानंतर खोडवा नांगरू नये किंवा रोटाव्हेटर मारू नये. तोडणी कार्यक्रमानुसार आडसाली, पूर्वहंगामी, सुरू किंवा खोडवा ऊस तुटून गेल्यानंतर सर्व उसाचा खोडवा ठेवावा.

ऊस तुटल्यानंतर पाचट समप्रमाणात पसरून बुडख्यावर असलेले पाचट बाजूला करून बुडखे मोकळे करावेत जेणेकरून त्यावर सूर्यप्रकाश पडून येणारा नवीन कोंब जोमदार येतील. उसाचे बुडखे मोठे राहिल्यास ते जमिनीलगत धारदार कोयत्याने छाटून घ्यावेत. लगेच कार्बेन्डाझिम (१ ग्रॅम प्रति लिटर) आणि इमिडाक्लोप्रिड(०.३६ ग्रॅम प्रति लिटर) फवारणी करावी. त्यामुळे मातीतून होणारे रोग, किडींना प्रतिबंध होतो. (ॲग्रेस्को शिफारस)

फेब्रुवारीनंतर तुटलेल्या उसाला पाण्याची कमतरता भासते. त्यामुळे पाण्याची उपलब्धता पाहून नत्र खतांच्या मात्रेत बदल करावा. पाणी कमी असेल तर रासायनिक खताऐवजी जैविक खतांचा पुरवठा अधिक उपयुक्त ठरतो. जिवाणू खतामुळे मुळांची वाढ जोमदार होते. मुळांच्या भोवती राहून हे जिवाणू पिकाला सतत नत्राचा पुरवठा करतात.

त्यामुळे हेक्टरी २.५ लिटर ॲसिटोबॅक्टर जिवाणू संवर्धकाची मात्रा द्यावी. ठिबक सिंचनाची सोय असल्यास पाण्यात विरघळणारी युरिया, म्युरेट ऑफ पोटॅश यासारखी खते ठिबक संचाद्वारे द्यावीत. अझोफॉस्फो हे द्रवरुप खत प्रति एकर एक लिटर प्रमाणात ठिबक संचाद्वारे किंवा आळवणी करून द्यावे.

नेहमीच्या आणि रुंद सरीतील लागणीच्या खोडव्यात एक आड एक सरी पाणी देण्याचे नियोजन करावे. पट्टा पद्धतीमध्ये फक्त जोड ओळीतील एकाच सरीला पाणी द्यावे. यामुळे पाण्याची बचत होऊन पीक वाढीस फायदा होतो.

येत्या काळात प्रत्येक पाण्याच्या पाळीतील अंतर हळूहळू वाढवीत जावे. शक्य तेथे आंतरमशागत करावी, म्हणजे मुळे खोलवर जातील. पाण्याचा ताण सहन करण्याकरिता सक्षम होतील.

ऊस पिकास पाण्याचा ताण असेल त्याचवेळी २ टक्के म्युरेट ऑफ पोटॅशची फवारणी करावी. यासाठी २० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश प्रति लिटर पाणी या प्रमाणात हेक्टरी ५०० लिटर पाणी फवारावे. २१ दिवसांच्या अंतराने ३ ते ४ फवारण्या कराव्यात.

पिकास पाण्याचा ताण बसतो त्या वेळी हेक्टरी १२५ किलो म्युरेट ऑफ पोटॅशची जादा मात्रा मुळाच्या सान्निध्यात द्यावी.

म्युरेट ऑफ पोटॅश फवारणीला दुसरा पर्याय म्हणून ६ टक्के केओलीनची फवारणी फायद्याची ठरते. यासाठी ६० ग्रॅम केओलीन प्रति लिटर पाणी या प्रमाणात हेक्टरी ५०० लिटर पाण्याची फवारणी करावी. १५ दिवसाचे अंतराने ३ ते ४ फवारण्या कराव्यात. केओलीनमुळे पानांद्वारे होणारे बाष्पीभवन कमी होते.

पाण्याचा ताण अधिक कालावधीसाठी असेल, तर १०० लिटर पाण्यामध्ये ५०० मिलि पाण्याचा ताण सहन करणारे बायोस्ट्युमिलंट मिसळून फवारणी करावी. फवारणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी, वातावरणातील तापमान व वाऱ्याचा वेग कमी असेल अशावेळी करावी. (ॲग्रेस्को शिफारस)

खोडवा उसात पाचट जाळू नये, अगर पाचट जाळलेले असल्यास हिरवळीचे पीक आंतरपीक म्हणून घ्यावे. याचा आच्छादन म्हणून वापर करावा. ऊस तुटल्यावर एक महिन्यांनी हिरवळीच्या पिकाची टोकण पद्धतीने लागण करून पीक ५० टक्के फुलोऱ्यात आल्यानंतर त्याचा आच्छादनासाठी वापर करावा. पाचट आच्छादन न केलेल्या शेतकऱ्यांनी एक आड एक सरी पाण्याचे नियोजन करावे. पुढच्या पाण्याच्या वेळी सरी बदलावी.

खोडवा पिकासाठी खत मात्रा

कोणत्याही प्रकारे पाचटाचे तुकडे करू नयेत. सरीच्या बगला फोडू नयेत. उसाची मुळे खोलवर पसरलेली असतात. जमिनीचा वरचा थर न फोडल्यामुळे आणि पाचट आच्छादनामुळे बाष्पीभवन कमी प्रमाणात होते. पाणी न देताही खोडव्याची फूट चांगली होते.

जमिनीत वाफसा असताना रासायनिक खतांची मात्रा पहारीच्या साह्याने दोन समान हप्त्यांत द्यावी. पहिली खतमात्रा एकरी ५० किलो नत्र, २३ किलो स्फुरद आणि २३ किलो पालाश एकत्रित मिसळून १५ दिवसांच्या आत पूर्ण करावी. पहारीने बुडख्यांपासून १० ते १५ सेंमी अंतरावर १५ ते २० सेंमी खोल छिद्र घेऊन सरीच्या एका बाजूला पहिली खतमात्रा द्यावी.

दोन छिद्रांमधील अंतर ३० सेंमी ठेवावे. दुसरी तेवढीच मात्रा विरुद्ध बाजूस त्याच पद्धतीने ९० ते १०५ दिवसांनी द्यावी आणि नेहमीप्रमाणे पाणी द्यावे. पाणी नसल्यास पहारीने दिलेली खत मात्रा ही तशीच छिद्रात राहते, म्हणून पाण्याची पाळी देणे आवश्यक आहे. पाणी नसल्यास अशी पहारीने खते न देता ती फवारणीने द्यावीत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Crushing Season : सांगली जिल्ह्यात पावसामुळे गाळप हंगाम लांबण्याची शक्यता

Crop Damage Compensation : खानदेशात ‘केवायसी’अभावी अनेक शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित

Watermelon Cultivation : खानदेशात कलिंगड लागवड रखडली

Vidhan Sabha Election Buldhana : बुलडाणा जिल्ह्यात २१.२४ लाख मतदार

Vidhan Sabha Election Beed : बीड जिल्ह्यातील सहा मतदारसंघात २१ लाखांवर मतदार

SCROLL FOR NEXT