Agriculture Investment  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Investment : ‘कृषी’त दरवर्षी ५ हजार कोटींची गुंतवणूक

Maharashtra Agriculture Policy : शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध होण्यासाठी शासन प्रयत्नशील असून गेल्या सहा महिन्यांत ५० ते ५५ धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत.

Team Agrowon

Pune News : शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध होण्यासाठी शासन प्रयत्नशील असून गेल्या सहा महिन्यांत ५० ते ५५ धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. शेतीला प्रोत्साहन म्हणून शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक करण्यासाठी दरवर्षी पाच हजार कोटी रुपये याप्रमाणे पाच वर्षांत २५ हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, अशी माहिती कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली.

प्रगतशील व प्रयोगशील शेतकऱ्यांच्या परिसंवादात शनिवारी (ता. २५) कोकाटे बोलत होते. या वेळी आमदार अभिजित पाटील, ‘स्मार्ट’चे प्रकल्प संचालक हेमंत वसेकर, संचालक रफिक नायकवडी, ‘आत्मा’चे संचालक अशोक किरन्नळी, प्रक्रिया व नियोजन संचालक विनयकुमार आवटे, विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गवसाने तसेच कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ व कृषी विभागातील अधिकारी उपस्थित होते.

कृषिमंत्री कोकाटे म्हणाले, ‘‘भांडवली गुंतवणुकीमध्ये कांदा चाळ, साठवणगृहे, नवीन तंत्रज्ञान यासारख्या शेतकऱ्यांच्या गरजांचा समावेश करण्यात आला आहे. या बाबत धोरण जाहीर करण्यात आले असून त्याचा सविस्तर धोरणात्मक शासन निर्णय येत्या आठवड्याभरात काढण्यात येईल.

कृषी क्षेत्रातील भविष्यातील धोरण ठरविण्यासाठी शेतकऱ्यांच्या विचारांचा, कल्पनांचा समावेश आवश्यक आहे. त्यादृष्टीने विभागस्तरावर अशा कार्यशाळा, परिसंवाद घेण्यात येत असून त्याअंतर्गत आज पुणे विभागीय परिसंवाद आयोजित करण्यात आला. शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी शासन सकारात्मक असून अस्थिरता दूर करण्यासाठी शासन आणि शेतकऱ्यांनी एकत्रितपणे सामोरे जाण्याची आवश्यकता आहे.

ते म्हणाले, शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) तंत्रज्ञानाचा वापर होण्यासाठी अर्थसंकल्पात ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून आवश्यकता भासल्यास पुरवणी मागण्यांमध्ये वाढीव निधीची तरतूद करण्यात येईल. कृषी विभागाने योजनांची प्रचार, प्रसिद्धी करावी. शासनाच्या सुविधा, योजना शेतकऱ्यांपर्यंत लवकरात लवकर पोहोचविण्यासाठी तसेच शेताच्या बांधावर जाऊन समस्या जाणून घेण्यात येतील.

शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले असून योजनांच्या लाभाची रक्कम धनादेशाद्वारे न देता ‘डीबीटी’द्वारे खात्यात जमा करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सेंद्रिय शेती करावी. संशोधन केंद्रामध्ये शेतकऱ्यांच्या आवश्यकतेनुसार विविध वाण, रोपे उपलब्ध करून द्यावीत. पुणे जिल्ह्यात कृषी प्रदर्शनासाठी कायमस्वरूपी वातानुकूलित हॉल बांधण्यात येईल.’’ या परिसंवादात विविध पीक उत्पादक २० कंपन्या व शेतकरी यांच्यासोबत सुमारे ५ तास गटचर्चा करण्यात आली.

परिसंवादात अनेक मुद्द्यांवर चर्चा

कांद्याला हमीभाव, मागेल त्याला कांदा चाळ, आंतरमशागतीसाठी अत्याधुनिक कृषी अवजारे, ऊस पिकासाठी सुधारित तंत्रज्ञान, नवीन वाण, केळी उत्पादन वाढीसाठी नवनवीन प्रयोग, प्रक्रिया उद्योगांसाठी चालना, ज्वारी वरील प्रक्रिया उद्योग, डाळिंब, द्राक्षे आदींसाठी सुविधा, मका पिकाला हमीभाव, उत्पादित माल साठवणुकीसाठी गोडाऊन, सेंद्रिय उत्पादनाचे प्रमाणीकरण, देशी गाई पाळण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान, अंजीर फळाचा फळपीक विमा योजनेमध्ये समावेश, अंजीर सुकवण्यासाठी संशोधन केंद्रास वाढीव निधी, आंब्यासाठी हमीभाव, भाजीपाला उत्पादकांना ऑनलाइन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे, संरक्षित शेती, सेंद्रिय उत्पादित मालासाठी स्वतंत्र बाजारपेठ, तूर आयात निर्यात धोरणामध्ये सुस्पष्टता आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT