Wheat sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Wheat Sowing : खानदेशात गहू पेरणी कमीच

Team Agrowon

Jalgaon News : कमी पाऊसमान, इतर फळ पिकांत मिळणारा अधिक नफा यामुळे खानदेशात यंदा गव्हाची पेरणी कमी झाल्याची स्थिती आहे. ही पेरणी अखेरपर्यंत सुमारे २५ हजार हेक्टरपर्यंत स्थिरावेल, असेही संकेत आहेत.

सध्या हवी तशी थंडीदेखील नाही. गव्हास थंडी हवी असते. यंदा किमान तापमान नोव्हेंबर महिना संपत आला, तरी १० अंश सेल्सिअसखाली गेलेले नाही. मागील वर्षीदेखील थंडी कमी होती.

यामुळे गव्हाची पेरणी कमी झाली होती. परंतु यंदाची पेरणी मागील वर्षाच्या तुलनेत दीड ते दोन हजार हेक्टराने कमी होईल, असेही दिसत आहे. कारण गव्हास पाणी अधिक लागते. पाट पद्धतीने सिंचन करताना वेळ व श्रमही अधिक लागतात. यंदा पाऊसमान कमी असल्याने दुष्काळी व मुरमाड, हलक्या जमिनीच्या क्षेत्रात गहू पेरणी शेतकऱ्यांनी टाळली आहे. खानदेशात ३१ ते ३२ हजार हेक्टरवर गव्हाची पेरणी अपेक्षित असते.

परंतु यंदा ही पेरणी पाच ते सात हजार हेक्टरने कमी होईल, असेही दिसत आहे. कारण गव्हाची पेरणी आजघडीला अपेक्षेच्या तुलनेत कमी झाली आहे. ही पेरणी सुमारे १६ हजार हेक्टरवर खानदेशात झाली आहे.

जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक ११ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. पुढे १५ डिसेंबरपर्यंत शेतकरी गहू पेरणी करतील. जळगाव जिल्ह्यातील एकूण पेरणी १८ ते १९ हजार हेक्टरवर पोहोचू शकते. तर धुळे व नंदुरबारात मिळून सुमारे सात ते आठ हजार हेक्टरवर पेरणी होईल, अशी माहिती मिळाली.

गव्हाऐवजी अनेकांनी हरभरा, दादर ज्वारी पिकाची पेरणी केली आहे. या पिकांच्या शेतीमालास चांगले दर आहेत. शिवाय चाराही मिळतो. कमी पाणी व कमी खर्चात ही पिके येतात. तसेच ज्यांच्याकडे पाणी किंवा कृत्रीम जलसाठे मुबलक आहेत, ते शेतकरी कमी कालावधीत येणाऱ्या फळ व भाजीपाला पिकांकडे वळत आहेत.

काही शेतकऱ्यांनी पुढे केळी लागवडीसाठी बेवड व जमीन सुपीकता यासाठी गव्हाची पेरणी केली आहे. ही पेरणी रावेर, यावल भागांत अधिक झाली आहे. परंतु उत्पादन व नफ्याचे पीक म्हणून गव्हाची पेरणी शेतकऱ्यांनी टाळल्याचे दिसत आहे. गहू पेरणीसाठी अनेक शेतकरी कापसाखालील क्षेत्र रिकामे करीत आहेत.

जळगाव जिल्ह्यातील पश्‍चिम भागात गिरणा धरणातून शेतीला आवर्तन न मिळाल्याने गहू पेरणीवर या भाहातही परिणाम झाला आहे. या भागातही गव्हाऐवजी हरभरा पिकाला शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे.

वेलवर्गीय पिकांनाही पसंती

अनेक शेतकरी गव्हाऐवजी भेंडी, कारली, टोमॅटो, गिलके, कलिंगड, खरबूज व इतर वेलवर्गीय पिकांकडे वळत आहेत. गहू पेरणी खानदेशात रावेर, यावल, चोपडा, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा व तळोदा भागात केली जाते. याच भागात गहू पेरणीबाबत शेतकऱ्यांचा कल कमी झाला आहे. यामुळे क्षेत्रात मोठी घट येईल, असेही सांगितले जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT