Pune News : देशात यंदा रब्बीचा पेरा गेल्यावर्षीपेक्षा १७ टक्क्यांनी आघाडीवर आहे. पिकेही जोमात आहेत. मात्र सध्याचे संमिश्र हवामान, पुढील तीन महिन्यांमध्ये कमी थंडी आणि अनेक भागातील कमी पावसाचा अंदाज आहे. ही परिस्थिती रब्बी पिकांना पोषक नाही. यामुळे रब्बी पिकांविषयी चिंता वाढणार आहे. सध्याही काही भागात खरिपातील तुरीहीसह रब्बी पिकांना पाण्याचा ताण बसत आहे.
देशात यंदा रब्बी पेरणीची गती जास्त आहे. देशात यंदा पाऊस चांगला असल्याने रब्बी पेरणीसाठी जमिनित ओल होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरा वाढवला. यंदा गेल्यावर्षीपेक्षा १७ टक्क्यांनी पेरा आघाडीवर आहे. २९ नोव्हेंबरपर्यंत देशात ४२८ लाख हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी झाली. गहू, भात, हरभरा, मका, मसूर, ज्वारी पिकाचा पेरा यंदा आघाडीवर आहे. गेल्यावर्षी दुष्काळामुळे रब्बीची पेरणी कमी झाली होती. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा लागवड १७ टक्क्यांनी आघाडीवर दिसत आहे.
पेरणीला पोषक वातावरण असल्याने यंदा रब्बी पिकांची पेरणी वाढली. मात्र सध्याचे हवामान आणि पुढील तीन महिन्याच्या हवामान अंदाजाने शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे. देशाच्या अनेक भागात मागील काही दिवसांमध्ये थंडी गायब झाली. तसेच पुढील तीन महिन्यांमध्ये थंडीच्या लाटा आणि पावसाचे प्रमाण देशाच्या अनेक भागात कमी राहण्याचा अंदाज आहे. ही स्थिती रब्बी पिकांना पोषक ठरणारी नाही.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने नुकतेच आपला अंदाज प्रसिध्द केला. या अंदाजात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील, असे म्हटले आहे. डिसेंबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या काळात देशाच्या बहुतांशी भागात सरासरीपेक्षा जास्त तापमान राहील. हिवाळ्यातील थंडीच्या लाटा सरासरीपेक्षा कमी राहतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे. देशाच्या दक्षिण भागात, तर मध्य पूर्व भारतात, पूर्व मध्य भारताचा काही भाग आणि उत्तर पूर्व भारताच्या काही भागात डिसेंबर महिन्यात पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहील. तर उत्तर आणि उत्तर पश्चिम भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस राहणार आहे.
ऑस्ट्रेलियाच्या कृषी विभागाने आपल्या अहवालात म्हटले आहे की, डिसेंबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या काळात जगातील महत्वाच्या धान्य आणि तेलबिया उत्पादक भागात संमिश्र पाऊसमानाची स्थिती राहणार आहे. भारतातील रब्बी हंगामालाही संमिश्र वातावारणाचा सामना करावा लागणार आहे. या काळात भारत, ब्राझील, पश्चिम आशिया, पूर्व चीन, दक्षिण अमेरिका आणि मेक्सिको देशामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस असेल.
कमी पावसाचा परिणाम
रब्बीसाठी महत्वाच्या भागात पाऊस कमी आहे. देशातील काही भागात सध्या पावसाची आवश्यता आहे. जमिनित ओलावा नसल्याने तूर आणि बटाटा पिकाला काही भागात फटका बसत आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये मध्य भारतात पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे बटाटा पिकाचे नुकसान झाल्याचे सांगितल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. बटाटा पिकाचे नुकसान ३० टक्क्यांपर्यंत असल्याचेही सांगितले जात आहे.
दक्षिण भागात फटका
कर्नाटक हे तूर उत्पादनात आघाडीवर आहे. मात्र कर्नाटकमधील अनेक भागात तूर पिकाचे पाण्याअभावी नुकसान होत आहे. पाऊस नसल्याने गहू आणि महत्वाच्या रब्बी धान्य पिकांचे नुकसान होऊ शकते, असे व्यापारी सांगत आहेत. तर फेंगल चक्रीवादळामुळे झालेल्या पावसाचा दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकाला फटका बसला. त्यातही तमिळनाडूमधील भात पिकाचे मोठे नुकसान झाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.