Sindhudurg News : जिल्ह्यातील कोकिसरे खांबलवाडी (ता. वैभववाडी) प्रकल्पाचे पाणी अखेर शुकनदीत सोडण्यात आले. त्यामुळे पाण्याअभावी अडचणीत आलेल्या शेकडो एकर शेतीवरील संकट टळले आहे.
जिल्ह्यातील नदीनाल्यांच्या पाणीपातळीत प्रचंड घट झाली आहे. अनेक नद्यांची पात्रे कोरडी पडली आहेत. वैभववाडी तालुक्यातील शुकनदीच्या पाणीपातळीत मोठी घट होऊन अनेक ठिकाणी पात्र कोरडे पडले होते. तीन-चार डोहांमध्ये किरकोळ स्वरूपात पाणी होते. या नदीच्या पाण्यावर शेकडो एकर ऊसशेती आणि शेती, बागायती अवलंबून आहे.
नदीतील पाणी आटल्यामुळे ही संपूर्ण शेतीच संकटात सापडली होती. त्यामुळे या भागातील पाच ते सहा गावांतीली शेतकरी चिंतेत होता. नापणे, सोनाळी, उंबर्डे, कुसूर यासह विविध गावांतील शेतकऱ्यांनी कोकिसरे खांबलवाडी प्रकल्पाचे पाणी शुकनदीत सोडावे, अशी मागणी तहसीलदार सूर्यकांत पाटील यांच्याकडे केली होती.
तहसीलदारांनी यासंदर्भात लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांकडून प्रकल्पातील पाण्याची स्थिती जाणून घेतली. त्यानंतर प्रकल्पातील पाणी शुकनदी पात्रात सात ते आठ दिवसांनी एकदा सोडावे, अशी सूचना केली.
त्यांच्या सूचनेनुसार हे पाणी शुकनदीच्या पात्रात सोडण्यात आले. त्यामुळे पुन्हा एकदा नदीपात्रात मुबलक पाणी झाले आहे. पाण्याअभावी अडचणीत आलेल्या शेतीला पाणी मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता देखील मिटली आहे.
कालव्यांची कामे पूर्ण करण्याची मागणी
वैभववाडी तालुक्यात कुर्ली घोणसरी आणि अरुणा मध्यम पाटबंधारे असे दोन मध्यम प्रकल्प आहेत. यातील कुर्ली घोणसरी प्रकल्पाची घळभरणी होऊन २५ ते ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. परंतु या प्रकल्पाच्या कालव्याची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत.
त्यामुळे शेतकऱ्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. अरुणा प्रकल्पाच्या कालव्याचे काम सुरू आहे. ते देखील जलदगतीने पूर्ण करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.