Dhule News : खरीप हंगाम-२०२५ साठी शेतकऱ्यांना वेळेवर व पुरेसे बियाणे उपलब्ध व्हावेत, यासाठी कृषी विभागाने नियोजन पूर्ण केले. त्यानुसार यंदा जिल्ह्यात अंदाजे तीन लाख ७९ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी अपेक्षित आहे. त्यासाठी ३२ हजार १४६ क्विंटल बियाण्यांची मागणी कृषी आयुक्तालयाकडे करण्यात आली.
धुळे जिल्ह्यात रब्बी व उन्हाळी हंगामातील पीक काढणी जवळपास पूर्ण झाली आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी खरिपासाठी मशागत पूर्ण केली. नांगरणी, काटेरी झुडपांचे निर्मूलन, कचरावेचणी अशी कामे पूर्णत्वास आली आहेत. खरिपात सोयाबीन, कपाशी, मका, बाजरी, भुईमूग, तूर, मूग, उडीद यांसारखी महत्त्वाची पिके घेतली जातील. त्यासाठी विविध पिकांच्या बियाण्यांची सोय करण्यासाठी कृषी विभागाने नियोजन केले आहे.
बियाणे व खतांच्या विक्रीत कोणतीही अनियमितता होऊ नये, तसेच लिंकिंगचा प्रकार टाळण्यासाठी कृषी विभाग सतर्क आहे. बनावट बियाणे व खते विकणाऱ्यांविरोधात कारवाईसाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले. दरम्यान, दरवर्षी बियाणे व खतांच्या किमतीत वाढ होत असल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक ताण येतो.
यंदाही काही बियाण्यांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने वाढत्या दरांवर नियंत्रण आणावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. दरम्यान, कृषी विभागाकडून कपाशीसाठी एक लाख ९९ हजार २५० बीटी बियाणे पाकिटांची मागणी स्वतंत्रपणे करण्यात आली. खरीप हंगामात शेतकऱ्यांची धावपळ होऊ नये यासाठी खतसाठाही सुरक्षित ठेवण्यात आला आहे. तीन हजार ८०० टन खत साठवणूक करून ठेवण्यात आले. यात साडेतीन हजार टन युरिया व ३०० टन ‘डीएपी’चा समावेश आहे.
अडचणींच्या निवारणासाठी टोल फ्री क्रमांक
महाराष्ट्र राज्यात शेती क्षेत्राच्या दृष्टीने खरीप हंगामाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. राज्यातील शेतकरी खरीप हंगाम यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील असतात. अशा वेळी बियाणे, खते व कीटकनाशके या निविष्ठांचा पुरवठा वेळेत गुणवत्तापूर्ण व मुबलक प्रमाणात होणे अत्यावश्यक आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरीप हंगाम-२०२५ च्या आढावा सभेत बियाणे, खते व कीटकनाशकांच्या गुणवत्तापूर्ण उपलब्धतेबाबत राज्यातील शेतकरी, वितरक व विक्रेते यांना क्षेत्रीय स्तरावर येणाऱ्या विविध अडचणींचे निवारण करण्याकरिता केलेल्या सूचनेनुसार आयुक्तालय स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला. या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यासाठी व्हॉट्सॲप क्रमांक ९८२२४४६६५५ उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच, कृषी विभागाच्या १८००२३३४००० या टोल फ्री क्रमांकावरही संपर्क करता येईल.
याबरोबरच अडचण किंवा तक्रार controlroom.qc.maharashtra@gmail.com या ई-मेलवरही पाठविता/नोंदविता येईल. संबंधितांनी येणाऱ्या अडचणी व निविष्ठांची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी व लिंकिंगबाबतच्या तक्रारी नोंदविताना नाव, पत्ता, संपर्क क्रमांक व अडचणी किंवा तक्रारीचा संक्षिप्त तपशील द्यावा.
सदर माहिती कोऱ्या कागदावर लिहून त्याचा फोटो व्हॉट्सॲप किंवा ई-मेलवर पाठवल्यासही तक्रारींचे निराकरण करणे सोयीस्कर होईल. ज्या शेतकऱ्यांना व्हॉट्सॲपचा वापर करणे शक्य नसेल, त्यांनी उपरोक्त क्रमांकावर संपर्क क्रमांकासह तोंडी तक्रारी नोंदवाव्यात. शेतकऱ्यांना त्यांच्या तक्रारी सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत नोंदविता येतील, असे कृषी संचालक (निवगुनि) सुनील बोरकर यांनी कळविले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.