Raigad News : काशीद समुद्रकिनारी जलवाहतुकीसाठी बांधण्यात येणाऱ्या संरक्षक बंधाऱ्याचे काम प्रगतिपथावर आहे. बंधाऱ्याचा फायदा वेगवान जलवाहतुकीबरोबरच काशीद समुद्रकिनारा सुरक्षित होण्यासाठी होणार आहे.
समुद्रातून येणाऱ्या लाटांचा अंदाज येत नसल्याने पोहण्याच्या नादात असलेले पर्यटक या सापळ्यात अडकतात. ब्रेकवॉटर बंधाऱ्यामुळे लाटा थोपविण्यास काही प्रमाणात मदत होईल, असे बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
पावसाळ्यातील उधाणात उसळणाऱ्या महाकाय लाटांमुळे काशीद समुद्रकिनारा पर्यटकांसाठी बंद ठेवावा लागतो. आधुनिक पद्धतीने बांधण्यात येणाऱ्या बंधाऱ्यामुळे काशीद आणि आसपासच्या परिसरातील पर्यटन बारमाही सुरू राहण्यास मदत होईल, असा विश्वास येथील पर्यटन व्यावसायिक व्यक्त करीत आहेत. पर्यटकांचा जलवाहतुकीचा प्रवास अगदी कमी वेळेत व्हावा, यासाठी महाराष्ट्र सागरी महामंडळामार्फत मुंबई ते काशीद रो-रो सेवा सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
पाच वर्षांपासून काशीद येथे प्रवासी जेट्टीसह विविध कामे सुरू आहेत; मात्र ही कामे कूर्मगतीने सुरू होते. काशीद हा समुद्रकिनारा पर्यटकांसाठी कायमच आकर्षक ठरला आहे. जगाच्या नकाशात काशीद समुद्रकिनाऱ्याला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे.
वर्षाला दोन लाखांहून अधिक पर्यटक या ठिकाणी फिरण्यासाठी येतात; मात्र प्रसिद्धीबरोबर हा किनारा दुर्घटनांमुळे बदनाम होत आहे. वर्षाला सरासरी सहा व्यक्तींचा मृत्यू होतो. दुर्घटनांना आळा घालण्यासाठी काशीद ग्रामपंचायत, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने विविध उपाययोजना आखल्या आहेत. जलप्रवासी वाहतुकीसाठी संरक्षक बंधारा उपयोगी पडेल, असा विश्वास बंदर विभागाचे अधिकारी व्यक्त करीत आहेत.
नौकांसाठी फायदेशीर
काशीदमध्ये मासळी उतरविण्यासाठी किंवा होड्या तात्पुरत्या उभ्या करण्यासाठी एकही सुरक्षित ठिकाण नाही. काशीद जलवाहतूक प्रकल्पाने ही सुविधा परिसरातील मच्छीमारांना उपलब्ध होणार आहे. हा परिसर किनाऱ्यावर दगडाचा आहे, होड्या भरकटून दगडावर आदळण्याची शक्यता असते, त्यामुळे मोठे नुकसान होते. हे टाळण्यासाठी मच्छीमार समुद्रकिनाऱ्यावर नौका आणण्याचे धाडस करीत नाहीत.
रो-रो जेट्टीसाठी ४२ कोटींची निविदा
ब्रेक वॉटर बंधाऱ्याचे काम ८० टक्क्यापर्यंत पोहोचलेले असताना काही दिवसातच रो-रो जेट्टीचे काम सुरू केले जाणार आहे. यासाठी ४२ कोटी अंदाजित खर्चाचा आराखडा तयार करण्यात आले आहे. काही दिवसांतच ही निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्याचा प्रयत्न बंदर विभागाच्या अभियांत्रिकी शाखेचा आहे.
या जेट्टीवरून काशीद ते थेट मुंबईतील भाऊच्या धक्क्यापर्यंत जलप्रवास करता येणार आहे. या जेट्टीमुळे येथील पर्यटन वाढणार असल्याने गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे.
काशीद किनाऱ्यावर होणाऱ्या दुर्घटनांची विविध कारणे आहेत, यात उंच लाटा हे प्रमुख कारण दिले जाते. बंधाऱ्यामुळे लाटांचा मारा कमी होईल. बंधाऱ्यामुळे साधारण १० ते १५ टक्के किनारा हा लाटांपासून सुरक्षित होईल. जलवाहतुकीबरोबरच येथे नौका सुरक्षितपणे उभ्या करणे शक्य होणार आहे. याचा फायदा येथील पर्यटनवाढीसाठी होईल.- सुधीर देवरा, कार्यकारी अभियंता, मेरीटाइम बोर्ड
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.