Water Management
Water Management Agrowon
ॲग्रो विशेष

Water Management : मृद्‍, जलसंधारणासाठी अनघड दगडी बांध, गॅबियन बंधारा असे उपाय अवलंबणे गरजेचं

Team Agrowon

डॉ. सचिन शिंदे, प्रा. प्रवीण मताई

Water conservation Update : प्रत्येक ठिकाणची भौगोलिक स्थिती, जमिनी, सिंचन स्रोत समान नसतात. त्यामुळे स्थानिक परिस्थितीनुसार मृद्‌ व जलसंधारणाचे उपाय अवलंबणे गरजेचे आहे. या उपायांची अंमलबजावणी शास्त्रीय पद्धतीने करावी.

अनघड दगडी बांध

पाणलोट क्षेत्रातील वरच्या भागात घळी नियंत्रणासाठी अनघड दगडी बांध परिणामकारक आहेत. यामुळे वाहत्या पाण्याची गती कमी होते. पाण्याबरोबर वाहून आलेली माती बांधाच्या वरच्या बाजूला साठविली जाते, त्यामुळे जमिनीची धूप होण्यास प्रतिबंध होतो.

बांध घालण्याची जागा खडकाळ असू नये, तसेच दगडी बांधासाठी स्थानिक स्तरावर दगड उपलब्ध असणे आवश्‍यक आहे. दगडी बांध बांधताना पाया चांगला खोदून घ्यावा.

दगड सांधमोड पद्धतीने रचावेत, त्यामुळे दगड मजबूत बसतील. दोन दगडांतील पोकळ्या लहान दगडांनी भरून काढाव्यात.

गॅबियन बंधारा

जाळीच्या सांगाड्यात दगडांचा जो बांध घातला जातो, त्यास गॅबियन बंधारा असे म्हणतात. ज्या ठिकाणी पर्जन्यमान जास्त असेल आणि नाल्याच्या तळाचा उतार जास्त असेल, अशा ठिकाणी प्रवाहामुळे दगडी बांध टिकू शकत नाही. अशा ठिकाणी गॅबियन बंधारा उपयुक्त आहे.

गॅबियन बंधारा बांधावयाच्या नाल्याची रुंदी दहा मीटरपेक्षा अधिक असू नये. नाल्याच्या वळणावर हा बंधारा बांधू नये. नाल्याच्या पात्रात ज्या ठिकाणी गॅबियन बंधारा बांधावयाचा आहे, त्या ठिकाणी दोन्ही बाजूंकडील काठ चांगले खोदून घ्यावेत.

नंतर बांध बांधावयाच्या जागेवर योग्य आकाराची लोखंडी जाळी अंथरावी, नंतर त्यात दगड रचून घ्यावेत. मोठ्या दगडांमधील पोकळ्या लहान दगडांनी भरून घ्याव्यात. दगड रचून झाल्यानंतर जाळी तारेने बांधून घ्यावी.

कोणत्याही परिस्थितीत पुरामुळे बांध वाहून जाणार नाही याची काळजी घ्यावी. ज्या ठिकाणी दगड उपलब्ध आहेत, अशा ठिकाणी गॅबियन बंधारा बांधावा. गॅबियन बंधाऱ्यामुळे पाण्याबरोबर वाहून येणारी माती बंधाऱ्याच्या वरच्या बाजूला अडविली जाते.

समपातळी बांधबंदिस्ती

शेतातील वाहते पाणी अडविण्यासाठी उताराच्या आडव्या दिशेने घातलेल्या मातीच्या अथवा दगडाच्या अडथळ्यास बांध असे म्हणतात.

साधारणतः सहा टक्के अथवा त्यापेक्षा कमी उतार असणाऱ्या कमी पर्जन्यमानाच्या प्रदेशात लागवडीयोग्य जमिनीमध्ये समपातळी बांध घातले जातात.

समपातळी बांधाच्या उपाययोजनेमुळे वाहत्या पाण्याचा संकलन काळ वाढतो. जमिनीमध्ये पाणी मुरण्यास मदत होते. सलग ढाळाचे विभाजन झाल्याने वाहणाऱ्या पाण्याची गती रोखली जाऊन धूप कमी होते, जमिनीची उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होते.

ढाळीची बांधबंदिस्ती

अनियमित अथवा अतिपावसाच्या प्रदेशात ढाळीच्या बांधाची उपाययोजना केली जाते. या स्वरूपाच्या उपाययोजनेमध्ये बांधामधील जास्तीचे पाणी अधुपकारी गतीच्या आधारे बांधाच्या बाहेर काढून दिले जाते.

वनराई बंधारा

हा बंधारा नदी-ओहोळांवर बांधला जातो. ज्या ठिकाणी पाण्याचा साठा अधिक होऊ शकेल आणि वाहणाऱ्या पाण्याचे कमी रुंदीचे पात्र लक्षात घेऊन हा बंधारा घातला जातो. यासाठी सिमेंटच्या रिकाम्या पिशव्यांमध्ये वाळू भरून, पिशव्या शिवून बंधाऱ्यासाठी वापरल्या जातात. नदीपात्रामध्ये पाण्याच्या प्रवाहास आडव्या अशा रीतीने सांधेमोड पद्धतीने पिशव्या रचाव्यात.

लेखक - डॉ. सचिन शिंदे, ९४२१६१८७९०, (विषय विशेषज्ञ,कृषी अभियांत्रिकी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, लातूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT