Drought Agrowon
ॲग्रो विशेष

Drought Crisis : रब्बी सोडा, माणसं-जनावरं जगवणे मुश्कील

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : यंदाच्या पावसाळ्यात पाऊस झाला नाही, परतीचा पाऊसही पडला नाही. खरिपात दहा-पंधरा टक्केही उत्पादन पदरात पडलं नाही. पाऊसच नसल्याने एखादा अपवाद वगळला, तर कोणत्याही शेतकऱ्याला रब्बीची पेरणी करता आली नाही. ज्यांनी पेरलं ते उगवलं नाही.

आताच पाणी नाही. त्यामुळे रब्बीचं सोडा, आता माणसं, जनावरं जगवण्यासाठी संघर्ष करायचाय, आमच्या पठार भागात दरवर्षीच पाणीटंचाई असते, यंदा मात्र परिस्थिती अधिक गंभीर आहे. संगमनेर तालुक्यातील डोळासणे येथील ग्रामदैवत भैरवनाथाच्या मंदिरात बसलेल्या शेतकऱ्यांची यंदाच्या दुष्काळाची गंभीरता तेवढ्याच तीव्रतेने सांगितली.

नगर जिल्ह्याच्या बहुतांश भागात यंदा पाऊस नाही. ऊस, साखर कारखान्यांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या जिल्ह्यातील अनेक भागात कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, बाजरी तर रब्बीत ज्वारी, हरभरा, गव्हासारखी पिकेही मोठ्या प्रमाणात घेतली जातात.

संगमनेर तालुक्यातील पठार भागातील सारोळे पठार, माळेगाव पठार, सावरगाव घुले, कर्जुले पठार, वरुडी पठार, पोरखी बाळेश्‍वर, जवळे बाळेश्‍वर, पिंपळगाव माथा, महालवाडी या गावांच्या शिवारातही पावसावरच बहुतांश शेती आणि शेतीवरच तेथील अर्थकारण अवलंबून आहे.

पण दरवर्षीच्या तुलनेत यंदा पंचवीस टक्केही पाऊस झालेला नाही. यंदा रब्बीच्या पेरण्याचं सोडा, पाणी आजच नाही. आता जनावरं, माणसं जगवायची कसरत करावी लागणार आहे. दुष्काळ, पाऊस पीक परिस्थिती आणि पुढील काळातील स्थितीवर चर्चा करताना गावांतील ज्येष्ठ शेतकरी पोपटराव क्षीरसागर, दिनकर काकड, संदीप काकड, तुषार काकड, किसन बांबळे, यांच्यासह तेथे असलेले तरुण शेतकरी यंदाच्या स्थितीवर चर्चा करताना चिंता व्यक्त केली.

खरिपात पैसा अन् कष्टही मातीत

डोळासणे व परिसरात खरिपात सोयाबीन हे प्रमुख पीक. यंदा मात्र पीक ऐन भरात यायच्या काळात पावसाने खंड पडला. दीड महिना पावसाचा थेंबही आला नसल्याने पिकांची जागेवर होरपळ झाली. बांधावर शेळ्या चारताना शेतकरी किसन काकड भेटले. काकड म्हणाले, ‘‘अडीच एकर सोयाबीन पेरले, पाच-सहा गोण्या झाल्या. अडीच एकरातील भुईमुगात तीन गोण्या शेंगा झाल्या, मका पेरली होती. त्याचा गाईंच्या चाऱ्याला आधार मिळेल.

मुरघास करून ठेवलाय. बुजूर्ग शेतकरी पोपटराव क्षीरसागर यांनाही चार एकरांत दीड क्विंटल सोयाबीन, तर दिनकर काकड यांना सात एकरांत तीन क्विंटल सोयाबीन झाले. खरिपात यंदा पीक घेण्यासाठी घातलेला पैसा आणि केलेली मेहनत वाया गेली.

रब्बीत तर काहीच मिळणार नाही असे येथील शेतकरी सांगत होते. पाण्याची कमतरता, पठार भाग असल्याने साठवण क्षमता नाही. यंदा स्थितीची गंभीर आहे. सरकारही फारसे लक्ष देत नाही, त्यामुळे असल्याने रत्नाकर पोखरकर यांनी दहा एकर सीताफळ, डाळिंबाची बाग काढून टाकली.

शिवारातील ठळक बाबी

- खरिपात सोयाबीन, बाजरी, भुईमूग अशी पावसावर येणारी पिके. जुलै- ऑगस्टमधील पावसाच्या खंडामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान.

- पावसाचा खंड, वाढ खुंटलेली असल्याने सोयाबीन, बाजरी, भुईमूगाची एक क्विंटलपर्यंतही उत्पादकता नाही. तरीही पीकविम्याबाबत काहीही सांगितले जात नाही.

- रब्बीत ज्वारी, हरभरा पेरतात. यंदा शिवारात पाच टक्केही पेरण्या झाल्या नाही. ज्यांनी पेरलं ते उगवलं नाही. सारा शिवार उजाड दिसतो आहे.

- पाणी नसल्याने चाराही नाही. त्यामुळे दुभती जनावरे, शेळ्या-मेंढ्या विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ.

- या भागात फळबागांचे प्रमाण अल्प, पण त्याही जगण्याची शाश्‍वती नसल्‍याने काढून टाकायला सुरुवात.

- पिण्याच्या पाण्यासाठी आताच टॅंकर सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे. रोजगारा ग्रामस्थांचे स्थलांतर.

- पीकविमा किंवा सरकारी योजनांचा लाभ देण्यासाठी कोणीही इकडे फिरकत नाही. दुष्काळावर प्रशासकीय पातळीवर चर्चाही होत नाही.

- दुष्काळाची तीव्रता अधिक गंभीर असताना, पैसेवारी पन्नास पैशाच्या आत असताना तालुक्यात दुष्काळ जाहीर नाही.

- पिके गेली, आर्थिक नुकसान झाले, पण झालेल्या नुकसानीचे ना पंचनामे ना दखल घेतली नाही. इकडे कोणाही फिरकले नाही.

आमचे गाव पठारावर आहे. खरीप आला नाही, रब्बीची पेरणी नाही. त्यामुळे या भागातील लोकांना पुढच्या सात-आठ महिन्यांच्या काळात जगण्याची चिंता आहे. असे असूनही सरकारकडून दुष्काळी योजनांचा लाभ नाही हे दुर्दैवी आहे.
- दिनकर काकड, शेतकरी, डोळासणे, ता. संगमनेर मो. ९८५०६१९६५०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT