Unhala Pani Vyavsthapan: उन्हाळा सुरू झाला की भाजीपाला पिकांसमोर सर्वात मोठे आव्हान असते ते म्हणजे वाढते तापमान आणि पाण्याची टंचाई. या परिस्थितीत पिकांमध्ये फुलगळ होणे, वाढ खुंटणे, पाने वाळणे आणि उत्पादनात घट येणे अशा समस्या मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. त्यामुळे या हंगामात शेतकऱ्यांनी पाण्याचे नियोजन, खत व्यवस्थापन, कीड-रोग नियंत्रण आणि आच्छादन या उपाययोजना करणे आवश्यक असते.
खत व्यवस्थापनाबाबत सांगताना तज्ज्ञांनी सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा संतुलित वापर करण्याचा सल्ला दिला आहे. शेणखत आणि गांडूळखत यांसारख्या सेंद्रिय खतांमुळे जमिनीचा पोत सुधारतो आणि पाणी धरुन ठेवण्याची क्षमता वाढते. तसेच शिफारशीनुसार खतांच्या मात्रा वेळोवेळी देणे गरजेचे आहे. ठिबक सिंचनाचा वापर करत असल्यास पाण्यातून खत देणे (फर्टिगेशन) अधिक परिणामकारक ठरते.
उन्हाळ्यात पिकांना शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळीच पाणी द्यावे. दुपारच्या कडक उन्हात सिंचन केल्यास पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होते आणि मुळांना अचानक पाणी मिळाल्याने त्यांना ताण बसू शकतो.
तसेच पानांवर राहिलेले पाण्याचे थेंब सूर्यप्रकाशात लेन्ससारखे कार्य करून पाने जळण्याची शक्यता वाढते. त्यामुळे ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीचा वापर केल्यास पाण्याची बचत होऊन कमी पाण्यातही चांगले उत्पादन घेता येते.
सिंचन करताना जमिनीचा प्रकार आणि पिकाची वाढीची अवस्था लक्षात घेणे आवश्यक असून, विशेषतः फुलधारणा ते फळधारणा या टप्प्यात पाण्याचा ताण येऊ देऊ नये.
उन्हाळ्यातील प्रखर सूर्यप्रकाश आणि उष्णतेपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी केओलिनची फवारणी उपयुक्त ठरते. यामुळे पानांवर पांढरा थर तयार होऊन सूर्यकिरण परावर्तित होतात आणि पानांचे तापमान कमी राहते. तसेच फुलगळ कमी करण्यासाठी एन.ए.ए. (१५ पीपीएम) फवारणीचा सल्ला देण्यात आला आहे.
आच्छादन हा उन्हाळ्यातील एक प्रभावी उपाय आहे. आच्छादनामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहतो, बाष्पीभवन कमी होते आणि तणांची वाढ नियंत्रित होते. पॉलिथिन मल्च, गवत किंवा पालापाचोळा यांचा वापर करून आच्छादन करता येते. यामुळे मुळांच्या भोवती अनुकूल वातावरण तयार होते, मुळांची वाढ चांगली होते आणि उत्पादनात वाढ होते. काकडी, कलिंगड, खरबूज, मिरची, टोमॅटो, वांगी यांसारख्या पिकांमध्ये आच्छादनाचा फायदा दिसून येतो.
उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे पिकांवर कीड रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे कीड व रोग व्यवस्थापनाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
उन्हाळ्यात भाजीपाला पिकांमध्ये मावा, पांढरी माशी, फुलकिडे, तुडतुडे आणि कोळी यांसारख्या रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव वाढतो.
मिरची, टोमॅटो, वांगी, कोबी, फ्लॉवर यांसारख्या रोपांपासून लागवड करायच्या पिकांमध्ये सुरुवातीच्या अवस्थेत या किडींचे नियंत्रण न झाल्यास विषाणूजन्य आणि जिवाणूजन्य रोगांचा प्रसार होतो.
याशिवाय नागअळी, फळ पोखरणारी अळी, फळमाशी यांसारख्या किडी तसेच करपा, भुरी, मर, पानांवरील ठिपके, फळसड अशा रोगांचा धोका वाढतो.
त्यामुळे शेतकऱ्यांनी एकात्मिक कीड-रोग व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करून शिफारशीत कीटकनाशके व बुरशीनाशके योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी वापरावीत.
शेवटी, काढणी व्यवस्थापनाकडेही दुर्लक्ष करू नये. भाजीपाला पिकांची काढणी बाजारपेठेचा विचार करून करावी. दूरच्या बाजारपेठेसाठी सायंकाळी काढणी केल्यास फळांची ताजेपणा टिकून राहतो. काढणीनंतर फळांची आकार आणि रंगानुसार निवड करून पॅकिंग करावे. भेंडी, गवार, काकडी यांसारख्या पिकांची काढणी एक दिवसाआड, तर वांगी ४ दिवसांनी आणि मिरची ८ ते १० दिवसांनी करावी.
म्हणजेच काय तर उन्हाळ्यात भाजीपाला पिकांचे चांगले उत्पादन घेण्यासाठी शेतीचे योग्य नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. योग्य वेळी योग्य उपाययोजना केल्यास कमी पाण्यातही चांगले उत्पादन मिळवता येते आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवता येते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.