Hiranyakeshi River Pollution agrowon
ॲग्रो विशेष

Hiranyakeshi River Pollution : हिरण्यकेशी नदी प्रदुषणाचा मुद्दा पेटला; १२ तरूणांचा जलसमाधिचा प्रयत्न, अनर्थ टळला

sandeep Shirguppe

Hiranyakeshi River Pollution Gadhinglaj : हिरण्यकेशी नदी प्रदूषणाच्या प्रश्नावर प्रशासन गांभीर्याने दखल घेत नसल्याचा आरोप करून जलसमर्पण आंदोलनातील १३ तरुण आंदोलकांनी नदीपात्रातील पाण्याच्या जोरदार प्रवाहातच उड्या मारल्या. सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी पोलिस व प्रशासकीय अधिकाऱ्यांना या आंदोलनाने घाम फोडला. त्यामुळे गतीने हालचाली करून आठ दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याची आणि महिनाअखेरपर्यंत बेळगाव-कोल्हापूर जिल्हाधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, आंदोलकांची संयुक्त बैठक घेण्याची लेखी ग्वाही नायब तहसीलदार विष्णू बुट्टे यांनी दिली.

संकेश्वर शहराचे सांडपाणी व कारखान्याची मळी थेट हिरण्यकेशी नदीत मिसळत असल्याने हिरण्यकेशी प्रदूषित झाली असून, त्याचा नांगनूरसह चार गावकऱ्यांना आरोग्याचा त्रास होत आहे. वारंवार आंदोलने, निवेदनाद्वारे लक्ष वेधूनही पाणी प्रदूषित करणाऱ्या संस्थेवर कारवाई नसल्याने जलसमर्पणाची वेळ आल्याचे अमर चव्हाण, संपत देसाई, संजय तरडेकर, शाहू मोकाशी यांनी सांगितले. आंदोलनाची कल्पना आठ दिवसांपूर्वी प्रांताधिकाऱ्यांना दिली होती. तरीही आंदोलकर्त्यांना वाऱ्यावर सोडून ते गैरहजर राहिल्याने प्रशासनाचा निषेध नोंदविला. संकेश्वर कारखाना व पालिकेचे प्रतिनिधीही नव्हते.

केवळ चार पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त होता. महसूल मंडल अधिकारी, तलाठी उपस्थित होते. यामुळे प्रशासनाने हे आंदोलन गांभीर्याने घेतले नसल्याचे लक्षात येताच आंदोलकांनी जलसमर्पणासाठी बंधाऱ्याकडे कूच केली. तेव्हा नायब तहसीलदार बुट्टे आंदोलनस्थळी येत असल्याचे सांगितल्याने आंदोलक बंधाऱ्यावरच बसले. जबाबदार प्रतिनिधी लवकर येत नसतील तर जलसमर्पणाचा इशारा दिला. तरीही अधिकारी लवकर न आल्याने तिघांनी नदीपात्रात उडी मारली. अर्ध्या किलोमीटरपर्यंत ते वाहत गेल्याने सर्वांना चिंता वाटू लागली. परंतु, ते सुखरूप बाहेर आले.

दरम्यान, बुट्टेंनी प्रत्यक्ष बंधाऱ्यावर येत आंदोलकांशी चर्चा केली. राष्ट्रपदींचा दौरा आणि निवडणूक प्रशिक्षणामुळे प्रांताधिकारी, तहसीलदार अनुपस्थित नसल्याचे त्यांनी सांगितले. नंतर चव्हाण, देसाई, शाहू मोकाशी यांनी बेळगाव, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी व आंदोलकांची संयुक्त बैठकीचे लेखी पत्र देण्याची मागणी केली.

त्यावर बुट्टे यांनी पुन्हा प्रांताधिकाऱ्यांकडे ही मागणी कळविली. मागणी मान्य केली. पण, लेखी पत्र देण्यास नकार दिल्याने पहिल्यांदा पाच जणांनी तर नंतर अमर चव्हाण यांच्यासह काही तरूणांनी नदीपात्रात उडी घेऊन धिक्काराच्या घोषणा दिल्या. पाण्याच्या प्रचंड प्रवाहात पोहत कसेबसे हे आंदोलक काठावर आले.

चेतन लोखंडे, अंकुश रणदिवे, सीमा मोकाशी, शिवाजी माने यांची भाषणे झाली. सुनील शिंत्रे, राजश्री नार्वेकर, एस. बी. पाटील, युवराज मोकाशी, संतोष मोकाशी, रमेश पाटील, मलाप्पा मुदपाकी, आर. के. गुंडाळी, सुनील पाटील, भय्या चव्हाण, अभिषेक चौगुले, कृष्णा तोडकर, विठ्ठल न्हावी, संजय कांबळे, अजित पाटील आदी आंदोलनात सहभागी झाले.

दोरीमुळे चव्हाण सुखरूप बाहेर...

ठोस निर्णय होत नसल्याने अखेर आंदोलनाचे नेतृत्व करणारे अमर चव्हाण यांनीही कपड्यानिशी नदीत उडी मारली. नदीतूनच ते जोरदार घोषणा देत होते. काही वेळानंतर त्यांना दम भरला. पोहता येणे अवघड झाले. त्यावेळी आंदोलकांची घालमेल सुरू झाली. उपस्थित प्रशासनही हादरले. चव्हाणांची पाण्यातील बिकट परिस्थिती पाहून त्यांच्यासाठी काहींनी उडी घेऊन त्यांना बंधाऱ्याच्या दरवाजाजवळ आणले. तेथे बंधाऱ्यावरील आंदोलकांनी दोरी टाकली. त्याला धरून चव्हाणांना काठावर आणले. ऐनवेळी दोरी नसती तर अनर्थ घडला असता, अशी चर्चा आंदोलनस्थळी सुरू होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Alert : उद्यापासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज; मराठवाडा आणि विदर्भात पावसाला पुन्हा सुरुवात होणार

Crop Damage : खानदेशात पावसाने पीकहानी सुरूच

Solar Power : पश्चिम विदर्भातील ६ हजार घरांवर सौर ऊर्जानिर्मिती

Suryaghar Yojana : छत्रपती संभाजीनगर परिमंडलात ३६५३ जणांना सूर्यघर योजनेचा लाभ

Majhi Ladki Bahin Yojana : तुम्ही ताकद द्या, ‘लाडकी बहीण’चा निधी वाढवू

SCROLL FOR NEXT