Silk Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Silk Farming : दर्जेदार तुती पाला उत्पादनावर भर

विकास गाढवे

Farmer Management

शेतकरी नियोजन : रेशीमशेती

शेतकरी : खंडू कुंडलिक कोरे

गाव : जायफळ, ता. कळंब, जि. धाराशीव

एकूण शेती : पाच एकर

तुती लागवड : एक एकर.

धाराशीव जिल्ह्यातील जायफळ (ता. कळंब) येथे खंडू कुंडलिक कोरे यांची पाच एकर जमीन आहे. गेल्या चार वर्षांपासून ते रेशीमशेती करत आहेत. वर्षातून चार लॉटमध्ये रेशीम कोषाचे उत्पादन घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

उन्हाळ्यात तीव्र उष्णतेमुळे पाचवा लॉट यशस्वी होत नसल्याचा त्यांचा अनुभव आहे. रेशीमशेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून कुटुंबांच्या खर्चाला मोठा हातभार लागला असून, अलीकडेच त्यातून त्यांनी नवीन घरही बांधले आहे.

रेशीमशेतीसाठी २४ फूट बाय ५२ फूट आकाराचे शेड उभारले आहे. प्रति लॉट शंभर ते सव्वाशे अंडीपुंजाचे संगोपन केले जाते. या कामात त्यांना वडील कुंडलिक, पत्नी सौ. बालिका, मुले बालाजी, शिवकुमार व गणेश यांची खूप मदत होते. पुतण्या परमेश्वर कोरे यांची नियोजनासाठी खूप मदत होते. बीड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रेशीम कोषांची विक्री केली जाते.

तुतीच्या निकोप वाढीचे नियोजन

तुती कापणीनंतर ४५ दिवसांत पिकाची चार फूट उंचीपर्यंत वाढ होते. पिकाच्या निकोप वाढीसाठी सुरुवातीला डीएपी खताचा एक डोस दिला जातो. त्यानंतर तुतीला जाड व मोठा पाला यावा, यासाठी दोन जैव उत्तेजकांच्या फवारणी घेतल्या जातात.

मात्र, पिकावर कोणत्याही प्रकारचे कीडनाशक (अगदी जैविकही) अजिबात फवारले जात नाही. तसेच शेतातील अन्य पिके उदा. सोयाबीन, ऊस पिकातही कोणतीही फवारणी करण्यापूर्वी त्याचे अंश तुतीकडे येणार नाहीत, याची काळजी घेतली जाते.

कारण या सर्व रसायनांचे अंश राहिलेला पाला खाल्ल्यानंतर अंडीपुंज (अळ्या) मरतात. यामुळे स्वतःच्या शेतातील सोयाबीनलाही फवारणी करताना काळजी घ्यावी लागते. प्रसंगी फवारणीही टाळली जाते.

दैनंदिन व्यवस्थापन

चार फूट उंचीवर तुतीची वाढ होताच १५ दिवसानंतर अंडीपुंज मिळतील, या पद्धतीने नोंदणी केली जाते. अळ्या येण्यापू्र्वी सात दिवस आधी शेडमध्ये स्वच्छता केली जातो. रॅकची फेरबांधणी केली जाते

फेरबांधणीनंतर अळ्या शेडमध्ये येण्यापूर्वी निर्जंतुकीरणाच्या वेगवेगळ्या घटकांची फवारणी करावी लागते. त्यामध्ये अळ्या येण्यापूर्वी सात दिवस आधी जिवाणूनाशकांची तर तीन दिवसांपूर्वी निर्जंतुकीकरण पावडरची फवारणी केली जाते. अळ्या येण्याच्या एक दिवस आधी फॉर्मेलीनची फवारणी केली जाते. त्यानंतर पेपर बेड करून त्यावर अळ्या टाकल्या जातात.

चॉकीतून आलेल्या अळ्या तुलनेने शांत असताना त्यांना दुसऱ्या दिवशी पावडर मारून तिसऱ्या अवस्थेत (मोल्ट) नेले जाते. मोल्टिंग म्हणजे कात येण्याची अवस्था. तीन दिवस सकाळी व सायंकाळी पाला टाकला जातो. तो पाला जास्त खावा या उद्देशाने दोनवेळा पावडर फवारणी करतो.

अळ्या दाट पसरल्या जातात. त्यामुळे एक दिवस अळ्या झोपतात. त्यानंतर तीन दिवस पाला खातात. दोन दिवसांनी मोल्टवर ठेवल्या जातात.

सात दिवस पाला खाऊन रेशीम धागा बाहेर येऊ लागताच शेडीमधील माळे बांधले जातात.

तुतीच्या काड्यावर चंद्रिका टाकून त्यांना कोष तयार करण्याची व्यवस्था तयार केली जाते.

चार दिवसात कोष तयार करण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यानंतर २१ दिवसात कोष पूर्ण होतात.

चॉकी रेअरिंग सेंटरमुळे फायदा

पूर्वी अंडीपुंजाचा स्वतःलाच सांभाळ करावा लागत होता. आता चॉकी रेअरिंग सेंटरमुळे तयार अळ्या मिळतात. सेंटरमध्येच १० दिवसांपर्यंत अळ्यांचा सांभाळ होतो. गाधवड व जवळा (ता. लातूर) येथील चॉकी सेंटरमधून अंडीपुंजाची खरेदी केली जाते.

परमेश्वर कोरे (पुतण्या), ९८९०००१४५०

(शब्दांकन : विकास गाढवे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमधील वाढ कायम

Crop Insurance : पीकविम्याच्या मुद्द्यावर लोकप्रतिनिधींच्या तक्रारी

Vegetables Rate : कांदा सत्तरीत, तर बटाटा चाळिशीत, कोल्हापूरच्या आठवडी बाजारात पालेभाज्यांची रेलचेल

Rakesh Tikait : राकेश टिकैत सोयाबीन आंदोलनात सहभागी, म्हणाले, शेतकऱ्यांच्या जमिनी आणि भविष्य वाचवण्यासाठी हा संघर्ष...

Dharshiv DCC Bank : दोन लाख शेतकऱ्यांना सभासद करून घेणार

SCROLL FOR NEXT