Sharad Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Sharad Pawar : ग्रीन हायड्रोजन निर्मितीचे स्वस्त तंत्रज्ञान शोधा

Team Agrowon

Pune News : इथेनॉलनंतर आता ग्रीन हायड्रोजन हेच भविष्यातील इंधन बनेल. साखर उद्योगाने त्यासाठी आतापासून पावले टाकावीत. मात्र ग्रीन हायड्रोजन निर्मिती स्वस्त नाही. त्यामुळे परवडण्यायोग्य तंत्र विकसित करण्यासाठी जगातील शास्त्रज्ञांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने मांजरी बुद्रुक येथील मुख्यालयाच्या शिवारात आयोजित केलेल्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय साखर परिषदेला शुक्रवारी (ता. १२) सुरुवात झाली. या वेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. ‘जागतिक साखर उद्योगातील शाश्‍वतता, आव्हाने व संधी’ या विषयांचा आढावा घेणाऱ्या या परिषदेत २७ देशांच्या प्रतिनिधींसह अडीच हजार शास्त्रज्ञ व तंत्रज्ञ उपस्थित आहेत. परिषदेतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाला पहिल्या दिवशी उत्तम प्रतिसाद मिळाला.

राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, भारतीय साखर तंत्रज्ञान संघटनेचे अध्यक्ष संजय अवस्थी, आंतरराष्ट्रीय ऊस जैवतंत्रज्ञान संघाचे सचिव डॉ. जर्मन सेरिनो, ब्राझीलचे गुईल्हेरमी नास्टारी, साखर संघाचे अध्यक्ष पी.आर.पाटील, माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे,

माजी जलसंपदामंत्री जयंत पाटील, ‘व्हीएसआय’चे सल्लागार शिवाजीराव देशमुख व महासंचालक संभाजीराव कडू पाटील यांच्यासह इतर मान्यवर व्यासपीठावर होते.
शरद पवार म्हणाले, की राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विकासासाठी १९७५ मध्ये वसंतदादा पाटील यांच्या द्रष्ट्या धोरणातून व्हीएसआयची स्थापना झाली. आज ऊस, साखर आणि उपपदार्थ्यांच्या क्षेत्रात ही संस्था जागतिक भरारी घेत असल्याचे पाहून खूप आनंद होतो आहे.

साखर उद्योग बनवू शकतील ग्रीन हायड्रोजन

अभ्यासपूर्ण भाषणात श्री. पवार म्हणाले, ‘‘साखर कारखान्यांमधील सहवीज निर्मिती प्रकल्पांमधून तयार होणारी वीज वापरून जलविद्युत विघटनातून ग्रीन हायड्रोजन तयार करता येते. तसा एक पथदर्शक प्रकल्पदेखील व्हीएसआयने उभारला आहे. मुळात ग्रीन हायड्रोजन हे अत्यंत स्वच्छ व अतिक्रियाशील इंधन आहे.

त्यातून कार्बन डायऑक्साइडऐवजी केवळ पाण्याचे उत्सर्जन होते. इतर इंधनापेक्षा ते तिप्पट शक्तिशाली आहे. त्यामुळेच ग्रीन हायड्रोजन निर्मितीचे तंत्रज्ञान परवडण्यायोग्य करण्यासाठी जगातील शास्त्रज्ञांना प्रयत्न करायला हवेत.’’

मला चिंता वाटतेय...

इथेनॉल धोरणाबाबत श्री. पवार म्हणाले, ‘‘देशात नव्याने स्थापन झालेल्या इथेनॉल प्रकल्पांवर प्रतिकूल परिणाम करणारे धोरण राबवले जात आहे. त्याबद्दल मला चिंता वाटते. साखर पाक व रसापासून इथेनॉल निर्मितीवर निर्बंध लावण्यात आली. त्यासाठी साखर संचालनालयाकडून अधिसूचना जारी केली.

त्यामुळे देशातील साखर कारखान्यांना आणि आसवनी प्रकल्पांना अडचणीत आले आहेत. अर्थात, त्यात सुधारणा करण्यासाठी तत्काळ पावले टाकल्याबद्दल मी केंद्र सरकारला धन्यवाद देतो. कारण या सुधारणांमुळे त्यामुळे साखर उद्योगाला दिलासा मिळणार आहे.’’

गडकरींचे मी अभिनंदन करतो

श्री. पवार यांनी रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांचे या परिषदेत जाहीरपणे अभिनंदन केले. ते म्हणाले, ‘‘देशाला उपयुक्त ठरणारे इथेनॉल धोरण आणल्याबद्दल मी श्री. गडकरी यांचे अभिनंदन करतो. या धोरणानंतर इथेनॉल क्षेत्रात साखर उद्योगाने भरीव गुंतवणूक केली. गेल्या हंगामात ५०० कोटी लिटरपर्यंत इथेनॉल पुरवठा केला.

इथेनॉल उत्पादनातून ९४ हजार कोटींची उलाढाल साखर कारखान्यांनी केली आहे. यामुळे देशाचे इंधन आयातीवरील २४ हजार कोटी रुपयांचे परकीय चलन वाचले आहे. यामुळेच देशाच्या इंधन मिश्रण कार्यक्रमातील इथेनॉलचा वाटा १२ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकला आहे.’’

‘भविष्यातील शेती’ संकल्पनेकडे वळाआज देशात पाच कोटी शेतकरी ५० लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस शेती करीत आहेत. मात्र जैविक व अजैविक ताणाचा परिणाम ऊस शेतीमध्ये अनेक समस्या तयार करीत आहे. या समस्या हाताळण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, सेन्सर्स तंत्रज्ञान, रोबोटिक्स या अत्याधुनिक व्यवस्थेतून नवी व्यवस्थापन पद्धत अवलंबावी लागेल.

हवामान बदलामुळे उसाचे उत्पादन घटले आहे. साखर उद्योगासमोरील आव्हानांचा सामना करण्यासाठी आपल्याला जैव तंत्रज्ञान, अतिसूक्ष्म (नॅनो) तंत्रज्ञान, रेण्वीय जैवशास्त्र, सुधारित पिढीतील जनुकीय तंत्रज्ञान व जैवपरावर्तित तंत्राचा अंगीकार करावा लागेल, असे दिशादायक विचार श्री. पवार यांनी या परिषदेत मांडले.

२०० दिवस निरुपयोगी ठरत आहेतसाखर कारखान्यांकडून गाळप क्षमतेचा सातत्याने विस्तार केला जात आहे. दुसऱ्या बाजूला ऊस उत्पादन मात्र स्थिर आहे. त्यामुळे १६० दिवसांचा गाळप हंगाम आता १२० दिवसांवर आला आहे. परिणामी, उर्वरित २०० दिवस साखर कारखान्यांमधील यंत्रे व मनुष्यबळ पूर्णतः निरुपयोगी ठरते आहे.

यातून साखर कारखान्यांवरील आर्थिक भार आणि उत्पादन खर्च वाढलेला आहे. त्यामुळेच बदलत्या वेळेनुसार साखर उद्योगाला आता इथेनॉल, सीबीजी, हायड्रोजन, इवाई इंधन व इतर उत्पादन निर्मितीचे नवे मार्ग शोधावे लागतील, असा सल्ला श्री. पवार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soymeal Export : भारतातून सोयापेंड निर्यात मागील ५ महिन्यात दुप्पट; तेलबिया पेंड निर्यात घटली

Sugar Ordinance : साखर अध्यादेश धोरणात्मक बदलात शेतकरी बेदखल, राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे मागणी

Animal Care : जनावरे का होतात लठ्ठ?

PM Aasha Yojana : कडधान्य आणि तेलबियांच्या उत्पादनाला चालना देणाऱ्या 'पीएम आशा योजने'ला केंद्राची मंजुरी

Soybean Cotton Anudan : सोयाबीन कापूस अनुदानाची कृषिमंत्री मुंडेंनी मिरवली शेखी; शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT