Turmeric Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Turmeric Farming : वेळेवर करा हळद पिकात भरणी

Team Agrowon

डॉ. मनोज माळी

Turmeric Crop Management : सध्या हळद लागवड होऊन दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. हा काळ (४६ ते १५० दिवस) हळद पिकाची शाकीय वाढ होण्याचा असतो. या वेळी वातावरणात २५ ते ३५ अंश सेल्सिअस तापमान असते. या अवस्थेमध्ये हळदीला फुटवे येतात. हळदीच्या नऊ महिन्यांच्या कालावधीमध्ये येणाऱ्या एकूण पानांची संख्या आणि उंची या अवस्थेमध्ये निश्‍चित होत असते.

पावसाळ्यात हळदीच्या खोडांची तसेच फुटव्यांची वाढ भरपूर होते. नुकतीच पाऊसाने उघडीप दिली असून, हळद लागवडीमध्ये आंतरमशागतीची कामे तात्काळ करून घ्यावीत. आंतरमशागतीच्या कामांमध्ये भरणी, खते, पाणी व्यवस्थापन, तणांचे नियंत्रण इत्यादी महत्त्वाच्या कामांचा समावेश होतो.

आंतरमशागत (भरणी करणे)

हळदीच्या लागवडीनंतर २.५ ते ३ महिन्यांनी हळदीचे पीक ३ ते ५ पानांवर असताना भरणी करणे आवश्यक असते. कारण या कालावधीमध्ये हळद पिकास फुटवे येण्यास व हळकुंड फुटण्यास सुरुवात होते. सरीमधील माती किंवा लागण केलेल्या दोन्ही गड्ड्यांमधील मोकळ्या जागेमधील माती १.५ ते २ इंच शिपीच्या कुदळीने खणून दोन्ही बाजूंच्या गड्ड्यांना लावणे म्हणजेच भरणी करणे होय. माती लावताना संपूर्ण कंद झाकला जाईल अशा पद्धतीने माती लावावी. भरणी केल्यानंतर जर पाऊसमान नसेल तर पिकास हलके पाणी द्यावे. जेणेकरून भर लावलेली माती पावसाने वाहून जाणार नाही.

भरणी केल्यामुळे नवीन येणारे हळकुंडे झाकले जातात. त्यांची चांगली वाढ होते. वेळेवर भरणी केल्यामुळे उत्पादनामध्ये जवळजवळ १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. भरणी न केल्यामुळे सूर्यप्रकाशात हळकुंड येऊन ते हिरवे पडते आणि वाढ खुंटते.

गादीवाफ्यावर भरणी करताना पॉवर टिलरच्या साह्याने किंवा दोन गादीवाफ्यांमधील जागेतील माती मोकळी करून करून गादीवाफयावर भर द्यावी. पॉवर टिलरचा वापर केल्यामुळे मजुरी खर्चात बचत होण्यास मदत होते. गादीवाफ्यावर ठिबक सिंचन केले असल्यास भरणी करताना ड्रीपर मातीखाली जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

खत व्यवस्थापन

हळद पिकांस रासायनिक खतांमध्ये हेक्टरी २०० किलो नत्र, १०० किलो स्फुरद आणि १०० किलो पालाश देण्याची शिफारस आहे. संपूर्ण स्फुरद आणि पालाश लागवडीवेळी द्यावे. नत्राची मात्रा २ समान हप्त्यांत विभागून द्यावी.

पहिला हप्ता लागवडीनंतर ४५ दिवसांनी, तर दुसरा हप्ता भरणीवेळी (लागवडीपासून २.५ ते ३ महिन्यांनी) द्यावा. या वेळी हेक्टरी २१५ किलो युरियाची मात्रा द्यावी. सूक्ष्म अन्नद्रव्ये जसे फेरस सल्फेट (हिराकस) १२.५० किलो आणि झिंक सल्फेट १० किलो तसेच २ टन निंबोळी किंवा करंजी पेंड प्रति हेक्टरी द्यावे. भरणीवेळी खते दिल्यामुळे खते योग्यरीत्या मातीत मिसळली जातात.

पाणी व्यवस्थापन

पावसाचे पाणी जमिनीमध्ये साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पिकामध्ये पाणी साचून राहिल्यास मुळांना मुळांना ऑक्सिजन मिळण्यास अडथळा येतो. परिणामी, पाने पिवळी पडून निस्तेज होऊन मलूल होतात. त्यासाठी शेतात साचलेल्या पाण्याचा तत्काळ निचरा करावा.

ऑगस्ट, सप्टेंबर या कालावधीत दरवर्षी हमखास पाऊस होतो. त्यासाठी वाकोऱ्याची शेवटची सरी कुदळीच्या साह्याने फोडून पाणी काढून द्यावे. पावसाच्या कालावधीत जमिनीतील ओलावा अभ्यासून सिंचनाचे नियोजन करावे.

लागवड रुंद वरंबा पद्धतीने असल्यास ठिबक सिंचनाचा उपयोग करावा. जमिनीतील ओलाव्यानुसार ठिबक संचाचा कालावधी ठरवावा. सतत पाणी देणे टाळावे. सतत ओलावा राहिल्याने हळकुंडे कुजण्याची शक्यता असते.

हळद पिकात उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत जमिनीत वाढणारे कंद असतो. त्यामुळे जमिनीतील मुख्य चार घटक जसे मातीचे प्रमाण, सेंद्रिय पदार्थ, हवा आणि पाणी यांचे संतुलन राखावे. जमिनीत केवळ मातीचे कण राहिले तर जमीन कोरडी होऊन मुळांच्या वाढीस वाव मिळत नाही. जमिनीत जास्त पाणी जास्त झाले तर अपेक्षेपेक्षा जास्त ओलेपणा (चिखल) होण्याची शक्यता असते. परिणामी, कंद कुजण्याचे प्रमाण वाढते. ज्या जमिनीत मातीचे प्रमाण ४५ टक्के, सेंद्रिय पदार्थ ५ टक्के, हवा आणि पाणी प्रत्येकी २५ टक्के असते, अशा जमिनीत पिकाची वाढ चांगली होते.

तण नियंत्रण

हळद पिकामध्ये शेणखताचा वापर अधिक होतो. शेणखतातून तणांचे बी शेतामध्ये येते. हळद लागवडीमधील तणांचे वेळीच नियंत्रण करणे गरजेचे आहे. तणांचा प्रादुर्भावानुसार लागवडीपासून ६०, ९० आणि १२० दिवसांच्या अंतराने निंदणी करावी. हळद उगवणीनंतर कोणत्याही तणनाशकाची फवारणी करू नये. जर तणनाशकाची फवारणी केली तर हळद पिकाच्या शरीर क्रियांवर विपरित परिणाम होतो.

भरणीचे फायदे

भरणी केल्यामुळे पावसामुळे उघडे पडलेले हळदीचे गड्डे पूर्णपणे झाकले जातात. गड्डे झाकल्यामुळे कंदमाशीसारख्या किडींना गड्ड्यांवर अंडी घालता येत नाहीत. त्यामुळे या किडीची पुढील पिढी नष्ट होण्यास मदत होते. तसेच कंदकुज रोगाला देखील आळा बसतो.

उघड्या गड्ड्याच्या बाजूने नव्याने येणारी हळकुंडे संपूर्ण झाकली जातात. त्यांची चांगली वाढ होते.

उथळ झालेल्या सऱ्या भरणी केल्यामुळे खोल होण्यास मदत होते. परिणामी, सिंचनाद्वारे दिलेले पाणी पिकांस व्यवस्थित व समप्रमाणात मिळते. पाण्याचा होणारा अपव्यय टाळला जातो.

भरणी करतेवेळी शिफारस केलेली खतमात्रा दिल्यामुळे संपूर्ण खते मातीखाली झाकली जातात. त्यामुळे खतांचा ऱ्हास, अपव्यय होत नाही. दिलेली खतमात्रा पिकाच्या मुळांजवळ पडल्यामुळे पिकास चांगला फायदा होतो. खतांची कार्यक्षमता वाढते.

मातीखाली झाकलेल्या हळदीच्या जेठा गड्ड्यांची वाढ चांगली होते. शिवाय हळकुंडांची संख्या वाढण्यास मदत होते. परिणामी, उत्पादनात वाढ होते.

भरणी केल्यामुळे पिकाची लांब मुळे तुटली जातात. तसेच कार्यक्षम तंतुमय मुळे जास्त प्रमाणात तयार होऊन आवश्यक अन्नघटक शोषण क्रिया चांगली होऊन उत्पादन वाढीस मदत होते.

भरणी केल्यामुळे लहान-मोठ्या तणे नष्ट होतात. त्यामुळे निंदणीच्या खर्चात बचत होते.

माती पोकळ झाल्यामुळे जमिनीमध्ये हवा खेळती राहण्यास मदत होते. त्यामुळे हळकुंडांचे चांगले पोषण होऊन ती चांगली पोसतात.

- डॉ. मनोज माळी, ९४०३७ ७३६१४

(लेखक महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत हळद संशोधन केंद्र, क. डिग्रज जि. सांगली येथे प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Climate Change : तापमानवाढीचा शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका : मुख्यमंत्री शिंदे

Bamboo Farming : पृथ्वी रक्षणासाठी बांबू शेती उपयुक्त : पाशा पटेल

Agriculture PG Admissions : कृषी ‘पदव्युत्तर’ अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

Fish Production : पर्ससीन, एलईडी मासेमारीमुळे मत्स्योत्पादनात घट

Sugar MSP : इथेनॉलसह साखरेच्या एमएसपीत वाढ करण्याच्या हालचाली

SCROLL FOR NEXT