Crop Insurance Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance Scheme: पीकविमा योजनेला राज्यात थंडा प्रतिसाद

Farmer Respose: एक रुपयात पीकविमा योजना बंद करण्याचा निर्णय, सुधारित योजनेत चारपैकी तीन ट्रिगरवर मारण्यात आलेली फुली आणि गैरप्रकार टाळण्यासाठी करण्यात आलेल्या सुधारणा याचा परिणाम म्हणून यंदा सहभागी शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटण्याची चिन्हे आहेत.

मनोज कापडे

Pune News: चालू खरिपात सुधारित पंतप्रधान पीकविमा योजनेला शेतकऱ्यांचा थंडा प्रतिसाद मिळत आहे. एक रुपयात पीकविमा योजना बंद करण्याचा निर्णय, सुधारित योजनेत चारपैकी तीन ट्रिगरवर मारण्यात आलेली फुली आणि गैरप्रकार टाळण्यासाठी करण्यात आलेल्या सुधारणा याचा परिणाम म्हणून यंदा सहभागी शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटण्याची चिन्हे आहेत.

गेल्या वर्षी पीकविमा योजनेसाठी १ कोटी ६८ लाख अर्ज आले होते. यंदा मात्र १४ जुलैपर्यंतच्या आकडेवारीनुसार सुमारे पावणेबारा लाख अर्ज भरण्यात आले. अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ जुलैपर्यंत आहे. सध्या दिवसाला सरासरी एक लाख या गतीने अर्ज दाखल केले जात आहेत.

हाच वेग कायम राहिला आणि काही दिवसांची मुदतवाढ मिळाली तरी अर्जदार शेतकऱ्यांची संख्या ५० लाखांचा तरी टप्पा ओलांडेल का, याबाबत कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी शंका व्यक्त केली आहे.एक रुपयात पीक विमा योजना बंद करून राज्य शासनाने खरीप हंगाम २०२५ साठी सुधारित पीक विमा योजना लागू केली. त्यानुसार शेतकऱ्यांना भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका, भुईमूग, कारळे, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन या पिकांसाठी दोन टक्के तर कापूस व कांदा या नगदी पिकांसाठी पाच टक्के विमा हप्ता भरावा लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सहभागात लक्षणीय घट दिसून येत आहे.

यंदा खरिपात कमी विमा अर्ज येण्यामागे ‘फार्मर आयडी’ची सक्ती हेदेखील प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात आले. कारण ५० लाखाहून अधिक शेतकऱ्यांकडे सध्या ‘फार्मर आयडी’ नाही. तसेच, सर्वाधिक नुकसानभरपाई मिळणारे स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, काढणी पश्‍चात नुकसान भरपाई हे ट्रिगर सुधारित योजनेत वगळण्यात आले आहेत. केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई मिळणार आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेकडे पाठ फिरवली आहे.

एक रुपयात पीकविमा योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. पण त्या योजनेत गैरप्रकारांचेही पेव फुटले होते. बोगस शेतकऱ्यांच्या नावाने विमा काढणे, शासकीय जमिनी, पडीक जमिनी, गायरानांच्या जमिनीवर विमा काढणे असे प्रकार वाढीस लागले होते. गेल्या वर्षी कांद्याचे पावणेदोन लाख हेक्टर बोगस क्षेत्र दाखवून शेकडो गावांमध्ये खोटे विमा अर्ज भरण्यात आले होते. शेतात केवळ गवत असताना तब्बल एक हजार कोटी रुपयांहून अधिकचे कांदा पीक विमा संरक्षित केले गेले होते. असे गैरप्रकार रोखण्यासाठी यंदा उपग्रह सर्व्हेक्षण, अॅग्रीस्टॅकचा डेटा व इतर तांत्रिक सुधारणा करण्यात आल्यामुळे बोगस विमाधारकांना फारसा वाव राहणार नाही; त्यामुळेही अर्जदारांचे प्रमाण घटल्याचे कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

यंदा खरिपात दोनच विमा कंपन्या

यंदा पीकविमा योजनेत सहभागी कंपन्यांची संख्याही घटली आहे. खरिपात सध्या केवळ भारतीय कृषी विमा कंपनी (एआयसी) व आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स अशा दोनच कंपन्यांचा सहभाग आहे. यातील एआयसी ही सरकारी मालकीची कंपनी आहे. गेल्या वर्षीच्या खरिपात एक रुपयात पीकविमा योजनेमुळे १ कोटी ६८ लाख विमा अर्ज आले होते. त्यामुळे कंपन्यांना देखील चांगला व्यवसाय मिळाला होता. गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांपेक्षा कंपन्यांना जास्त फायदा होत असल्याचे सांगत सरकारने यंदापासून सुधारित पीकविमा योजना लागू केली आहे. अपेक्षित मलिदा मिळण्याची शक्यता नसल्यामुळे यंदा कंपन्यांची संख्या घटल्याचे सूत्रांनी सांगितले.

Chart

दिवसाला एक लाख अर्ज

यंदा १४ जुलैपर्यंत ११ लाख ७३ हजार ९३८ विमा अर्ज दाखल झाले आहेत. यातून ७.१८ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी ६७.३१ कोटी रुपये विमा हप्ता भरला आहे. केंद्र व राज्य सरकारने प्रत्येकी १२३ कोटींहून अधिक रक्कम विमाहप्ता अनुदानाच्या हिश्श्यापोटी भरली आहे. त्यामुळे विमा कंपन्यांना आतापर्यंत ३१४ कोटींहून अधिक रुपयांचा व्यवसाय मिळाला आहे. राज्याचा पीकपेरा आता निम्म्याहून अधिक पूर्ण झाला असून विमा अर्ज भरण्यास वेग आला आहे. रोज एक लाखापेक्षा जास्त अर्ज दाखल होत आहेत. परिणामी चालू पंधरवड्यात विमा अर्जांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसेल, असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Crisis : १७ सप्टेंबरपासून संयुक्त किसान मोर्चा विदर्भ दौऱ्यावर; कापूस धोरण, टॅरिफ आणि आत्महत्यावर शेतकऱ्यांशी संवाद

Maharashtra Health Scheme: कॅन्सर, हृदयविकार, किडनी आजारांवर आता गरीबांसाठी सरकारकडून मिळणार १.५ लाखांपर्यंत मोफत आरोग्य सुविधा

Hingoli APMC Merger : हिंगोली, सिरसम कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे एकत्रीकरण

krushi Sakhi : कृषी सखींना लवकर मिळणार थकित मानधन

Manoj Jarange Patil: १७ सप्टेंबरच्या आत कुणबी प्रमाणपत्र द्या; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा!

SCROLL FOR NEXT