Flower Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Flower Farming : शेतकरी नियोजन ः फुलशेती

Sangali News : सांगली जिल्ह्यातील लिंगनूर (ता. मिरज) येथे प्रदीप दत्तात्रय कुडचे यांची माळरान तीन एकर शेती आहे. तालुक्याचा पूर्व भाग हा तसा दुष्काळीच. त्यामुळे प्रदीप कुडचे हे उपलब्ध पाण्यावर काही ठरावीक हंगामी पिके घेत असत.

Team Agrowon

शेतकरी ः प्रदीप दत्तात्रय कुडचे
गाव ः लिंगनूर, ता. मिरज. जि. सांगली
एकूण शेती ः तीन एकर
फुलशेती ः एक एकर (शेवंती, गलांडा, झेंडू, बिजली)


सांगली जिल्ह्यातील लिंगनूर (ता. मिरज) येथे प्रदीप दत्तात्रय कुडचे यांची माळरान तीन एकर शेती आहे. तालुक्याचा पूर्व भाग हा तसा दुष्काळीच. त्यामुळे प्रदीप कुडचे हे उपलब्ध पाण्यावर काही ठरावीक हंगामी पिके घेत असत. मागील दहा ते बारा वर्षांपूर्वी या भागात म्हैसाळचे पाणी आल्याने सिंचनासाठी शाश्‍वत पाण्याची सोय झाली. त्यानंतर त्यांनी एक विहीर, एक कूपनलिका घेत शेतीला मुबलक पाण्याची सोय केली.

त्यामुळे गेल्या दहा वर्षांपासून त्यांनी पीक पद्धतीत बदल केला. भाजीपाला पिकांमध्ये ढोबळी मिरची, टोमॅटो अशी पिके घेऊ लागले. मात्र तेवठ्यावरच न थांबता त्यांना मागील ५ वर्षांपासून फुलशेतीची वाट धरली आहे. हंगामानुसार शेवंती, झेंडू, गलांडा आणि बिजली या फुलपिकांची लागवड ते करतात. दरवर्षी एका एकराचे साधारण २० गुंठे प्रमाणे दोन भाग करून त्यात फुलपिकांच्या लागवडीचे नियोजन केले जाते. प्रदीप कुडचे यांना महेश पाटील आणि संजू खेडकर यांचे फुलशेतीमध्ये मार्गदर्शन मिळते. आता कुडचे हे भाजीपाला पिकांसह फुलपिकांत देखील मास्टर झाले आहेत.

जोखीम कमी ः
रोपवाटिकेतून दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण तयार रोपांची खरेदी केली जाते. प्रामुख्याने गणपती, दसरा आणि दिवाळी या सणांदरम्यान फुलांना मागणी अधिक असते. या काळात फुले विक्रीसाठी उपलब्ध होण्यासाठी मे, जून आणि जुलै असा हंगाम घेतला जातो.

त्यानुसार काटेकोर नियोजन करून दर्जेदार फुलांचे उत्पादन घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. फुलाचा हंगाम संपल्यानंतर त्याच क्षेत्रात भाजीपाला अशी फेरपालट करून पीक पद्धतीचा अवलंब केला जातो. फुलपिकांचे लागवड क्षेत्र कमी असल्याने जोखीम कमी असते, असे प्रदीपराव सांगतात.

लागवडीची तयारी ः
- फुल लागवडीसाठी रोपवाटिकेत रोपांची आगाऊ मागणी नोंदवली जाते. त्यानुसार रोपांची उपलब्धता करून लागवडीचे नियोजन केले जाते.
- रोपवाटिकेतून झेंडू रोप ३ रुपये, गलांडा १ रुपये ५० पैसे, शेवंती ३ रुपये आणि बिजली, भगवा झेंडू यांची रोपे दीड रुपये दराने खरेदी केली जाते.
- लागवडीपूर्वी जमिनीची चांगली मशागत केली जाते.

रोटर मारून घेतल्यानंतर शेतामध्ये एकरी ४ ट्रॉली प्रमाणे शेखणत मिसळले जाते.
- त्यानंतर १०ः२६ः२६, निंबोळी पेंड आणि करंजी पेंड असा बेसल डोस दिला जातो.
- रोप लागवडीसाठी पाच आणि सहा फुटांचे बेड तयार केले जातात.
- बेड तयार झाल्यानंतर ठिबकच्या नळ्या टाकून मल्चिंग पेपर अंथरून घेतला जातो.
- रोप लागवडीपूर्वी ठिकबद्वारे बेड चांगले भिजवून घेतले जातात.

लागवड नियोजन ः
- गलांडा रोपांची लागवड करताना दोन रोपांमध्ये दोन फूट अंतर राखले जाते.
- शेवंती, झेंडू, बिजली यांच्या दोन रोपांमध्ये साधारण दीड फूट अंतर राखले जाते. लागवड झिकझॅग पद्धतीने केली जाते.
- साधारण २० गुंठे क्षेत्रासाठी गलांडाची २००० रोपे, शेवंतीची ४५०० ते ५००० रोपे, तर झेंडू आणि बिजलीची ४५०० ते ५००० रोपांची आवश्यकता भासते.

खत व्यवस्थापन ः
- रोपांची लागवड केल्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी पहिली रासायनिक आळवणी केली जाते.
- ह्युमिक ॲसिड, १९ः१९ः१९ यांची दुसरी आळवणी केली जाते.
- तिसरी आळवणी झिंक आणि १३ः४०ः१३ ची केली जाते.


- रोपांची वाढ चांगली होण्यासाठी १२ः६१ः०० चा आळवणीद्वारे वापर केला जातो.
- रोपांच्या वाढीच्या अवस्थेनुसार ठिबकद्वारे रासायनिक खतांचे व्यवस्थापन केले जाते. त्यामध्ये प्रामुख्याने १२ः६१ः००, १३ः४०ः१३ या विद्राव्य खतांचा वापर केला जातो. साधारण चार दिवसांच्या अंतराने ठिबकद्वारे खतांचे नियोजन केले जाते.

कीड-रोग व्यवस्थापन ः
- फुलपिकांमध्ये हवामान बदलानुसार विविध कीड-रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. प्रामुख्याने नागअळी, करपा, लाल कोळी आदी कीड-रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यासाठी दर पंधरा दिवसांनी रासायनिक कीडनाशके आणि बुरशीनाशकांच्या प्रतिबंधात्मक फवारणींचे नियोजन केले जाते. वाढीच्या काळात पिकाचे सातत्याने निरीक्षण केले जाते. कीड-रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास आवश्यकतेनुसार रासायनिक फवारण्या घेतल्या जातात.

सिंचन व्यवस्थापन ः
- संपूर्ण फुलशेतीमध्ये सिंचनासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला आहे.
- लागवड केल्यानंतर एक दिवसाआड साधारण तीन ते चार तास पाणी दिले जाते.
- हंगामामध्ये फुलांचे उत्पादन सुरू झाल्यानंतर एक दिवसाआड तीन तास पाणी ठिबकने सिंचन करण्याचे नियोजन असते.
- तापमानातील चढ-उतारानुसार ठिबकचा कालावधी कमी-जास्त केला जातो.

उत्पादन, विक्री ः
- लागवडीनंतर साधारण अडीच ते तीन महिन्यांत फुलांची तोडणी सुरू होते. सुरुवातीचे काही तोडे कमी, तर नंतर हळूहळू फूल उत्पादनात वाढ मिळते.
- गलांडा फुलांची साधारण एक दिवसाआड तर झेंडू आणि शेवंती फुलांची ३ दिवसाआड तोड केली जाते. एका तोड्याला गलांडा फुलांचे ५० ते ६० किलो तर शेवंती आणि झेंडू फुलांचे ८० ते १०० किलोपर्यंत उत्पादन मिळते.
- हंगामामध्ये गलांडा फुलांना ३० रुपयांपासून ते १०० रुपये तर शेवंती फुलांना २० ते १५० रुपयांपर्यंत दर मिळतो.
- उत्पादित सर्व फुलांची विक्री मिरज येथील फुल मार्केटमध्ये केली जाते.

- प्रदीप दत्तात्रय कुडचे, ९८३४४००१८०
शब्दांकन ः अभिजित डाके

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Farming: जमीन सुपीकता, काटेकोर खत व्यवस्थापनावर भर

Ladaki Bahin Yojana: लाडक्या बहिणींकडून ६,८०० कोटींची वसुली होणार; योजनेत ४२ लाख अपात्र लाभार्थी 

Star Campus Award: ‘अर्थ डे नेटवर्क’तर्फे मुक्त विद्यापीठास ‘स्टार कॅम्पस अॅवॉर्ड’ 

Onion Farmers: कांद्यासाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करा

Sugarcane Crushing Season: आगामी गाळपासाठी एक लाखावर हेक्टर ऊस

SCROLL FOR NEXT