Farmers Protest  Agrowon
ॲग्रो विशेष

Farmers Protest : शेतकरी नेत्यांचा सरकारला अल्टिमेट; भाजपला मतदान न करण्याचे जनतेला आवाहन

Aslam Abdul Shanedivan

Pune News : हमीभाव कायद्यासह विविध मागण्यांसाठी हरियाणा आणि पंजाबचे शेतकरी १३ फेब्रुवारीपासून आंदोलन करत आहेत. आंदोलक शेतकरी दिल्लीच्या जवळ असणाऱ्या शंभू, खनौरी, डबवली आणि रतनपुरा सीमेवर बसले असून त्यांच्या मागण्यांकडे मात्र केंद्र सरकारने दुर्लक्ष केले आहे. यावरून संतापलेल्या शेतकरी नेत्यांनी थेट सरकारला अल्टिमेटम देत मागण्या मान्य करा अन्यथा शंभू सीमेवर रेल्वे रोखण्यात येईल असा इशारा दिला आहे. संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चाने हा इशारा मंगळवारी (ता.१६) चंदीगड येथील किसान भवनात आयोजित पत्रकार परिषदेतून दिला. यावेळी प्रमुख शेतकरी नेते उपस्थित होते.

यावेळी शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल यांनी आंदोलनाची पुढील रणनीती जाहीर केली. तसेच, 'गेल्या २८ दिवसांपासून तुरुंगात आमरण उपोषण करणाऱ्या अनिश खतकर यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे. त्यांना काही इजा झाल्यास त्याला हरियाणा सरकार जबाबदार असेल', असे म्हटले आहे. तसेच, 'बुधवारी सायंकाळपर्यंत नवदीप सिंग, अनिश खतकर आणि गुरकीरत सिंग यांना सोडले नाही तर बुधवारी (ता.१७) सकाळी शंभू सीमेवर रेल्वे रोखण्यात येईल', असा स्पष्ट इशारा डल्लेवाल यांनी दिला आहे.

यावेळी १३ फेब्रुवारीपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असून वीज, पाणी आणि स्वच्छता या मुलभूत सुविधाही पुरविल्या जात नसल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला आहे. 'शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी असून भाजपच्या नेत्यांना प्रश्न विचारण्याची मोहीम छेडली जाणार असल्याचेही', डल्लेवाल यांनी सांगितले आहे.

सध्या देशात लोकसभा निवडणूक लागली असून नेते प्रचारात व्यस्त झाले आहेत. त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे काही पडलेले नाही. यावरून भाजपच्या नेत्यांना प्रश्न विचारल्यास ते पळ काढत आहेत. ते दिल्लीत बसलेले ज्येष्ठ नेतेच उत्तर देतील असे म्हणत आहेत. यामुळे डल्लेवाल यांनी आता भाजप नेत्यांना खुल्या चर्चेचे आव्हान दिले आहे. तसेच 'आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम असून आगामी काळात हरियाणा-पंजाबमध्ये अनेक ठिकाणी रँली काढण्यात येतील. मोठमोठ्या जाहीर सभांचे आयोजन केले जाईल', असे डल्लेवाल यांनी म्हटले आहे.

'हरियाणा पोलिसांच्या तपासातून पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळण्याची आशा नाही. शांततापूर्ण आंदोलन हा प्रत्येकाचा लोकशाही आणि मूलभूत अधिकार आहे. प्रशासनाने आंदोलकांवर कोणत्याही प्रकारची हुकूमशाही दाखवू नये', अशी विनंती न्यायालयाला केल्याची माहिती डल्लेवाल यांनी दिली आहे. यावेळी तरूण शेतकरी शुभकरन सिंग याचा मृत्यू चौकशी समितीत हरियाणा पोलीस अधिकाऱ्याच्या समावेशावरून शेतकरी नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

भारतीय जनता पक्षाला मतदान करू नका

तसेच पंजाबमधील ग्रामीण मजदूर किसान समितीने शेतकऱ्यांना लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला मतदान करा, पण भारतीय जनता पक्षाला मतदान करू नका, असे आवाहन केले आहे. तसेच अनेक दिवसापासून आपल्या मागण्यांबाबत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांकडे सरकार लक्ष देत नसल्याचे म्हटले आहे. ग्रामीण मजदूर किसान समिती ही संघटना संयुक्त किसान मोर्चा म्हणजेच एसकेएमशी संबंधित आहे.

हुशारीने मतदान करा - राकेश टिकैत

दरम्यान शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी देखील भाजपसह सर्व राजकीय पक्षांवर टीका केली आहे. टिकैत म्हणाले की, 'शेतकऱ्यांचा सर्वच पक्षांबाबत भ्रमनिरास झाला असून त्याचे उत्तर ते मतदानातून देतील. मतदान करताना लोकांनी आपला आतला आवाज ऐकला पाहिजे. मी माझ्या पत्नीला देखील कोणाला मतदान करायचे हे सांगणार नाही. पण मला माहित आहे की ती आणि शेतकरी हे शेतकरी हितासाठी काम करणाऱ्या पक्षाला किंवा उमेदवाराला मतदान करतील'.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT