Mango Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Farming : आंब्याचा दर्जा राखण्यावर भर

राजेश कळंबटे

Mango Farming Management :

शेतकरी नियोजन

पीक : हापूस आंबा

शेतकरी : जयवंत महादेव बिर्जे

गाव : मालगुंड, ता.जि. रत्नागिरी

आंबा क्षेत्र : २७ एकर

एकूण झाडे : १७००

रत्नागिरी जिल्ह्यातील जयवंत महादेव बिर्जे हे मागील अनेक वर्षांपासून आंबा व्यवसायात आहेत. ग्राहकाला थेट आंबा विक्री करण्यावर त्यांचा भर असतो. विशेषतः नैसर्गिक पद्धतीने पिकविलेला आंबा ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. यासाठी हापूस आंबा बागांमध्ये संपूर्ण नैसर्गिक खतांचा वापर केला जातो.

जयवंत यांची स्वतःची अडीच एकरांत हापूस लागवड असून त्यात ५५ कलमे आहेत. याशिवाय त्यांनी करारावर सुमारे १७०० झाडे घेतली आहेत. आंबा व्यवसाय करताना बिर्जे यांनी आंबा फळांचा दर्जा राखण्यावर विशेष भर दिला आहे. त्यामुळे ग्राहकांकडून दरही चांगले मिळतात. त्यासाठी वर्षभर बागेतील सर्व कामांचे योग्य नियोजन करण्यावर त्यांनी भर दिला आहे.

आंबा बागेचे सर्व व्यवस्थापन स्वतः जयवंत बिर्जे आणि मुलगा अथर्व पाहतात. मार्केटिंगची जबाबदारी मुलगा समर्थ आणि मुलगी अनुया हे दोघे पाहतात. दर्जेदार आणि नैसर्गिक आंबे असल्यामुळे दर चांगला मिळतो.

आंबा विक्रीसाठी सोशल मीडियावरून मार्केटिंग केले जाते. यंदा पहिल्यांदाच बिर्जे यांच्या बागेतील १५० डझन आंब्यांची दुबईला निर्यात करण्यात आली. रत्नागिरीमधून नाव्हाशेवा मार्गे आंबे दुबईत गेले. त्याला दरही चांगला मिळाला.

व्यवस्थापनातील बाबी

साधारणपणे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बागेत चरी मारून गांडूळ खताची मात्रा दिली जाते. साधारण १५ वर्षे वयाच्या झाडांना १५ किलो, तर त्यापेक्षा मोठ्या झाडांना ५० किलो प्रतिझाड गांडूळ खत मात्रा दिली जाते. त्यानंतर बांडगुळे, रोगग्रस्त फांद्याची छाटणी केली जाते.

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात १९ः१९ः१९ हे खत २ किलो, सिंगल सुपर फॉस्फेट २ किलो याप्रमाणे प्रति झाड मात्रा दिली जाते. संपूर्ण रासायनिक खतमात्रा झाडाभोवती अडीच फुटांवर रिंग करून पालापाचोळा टाकून त्यात दिली जाते. श्रावण महिन्यात बागेची साफसफाई केली जाते. झाडाची विरळणी केली जाते. टाळमाती लावली जाते.

बागेतील काही झाडांना सेंद्रिय खते तर काही झाडांना रासायनिक खतांच्या मात्रा दिल्या जातात. रासायनिक खते दिल्या जाणाऱ्या झाडांना संजीवकांच्या मात्रा दिल्या जातात. साधारण ऑगस्ट महिन्यात बागेत संजीवकांचा वापर केला जातो. एका झाडाला ४० मिलि संजीवके दिली जातात. त्यानंतर रासायनिक खतांचे डोस दिले जातात.

मात्र ज्या झाडांना सेंद्रिय खते देण्याचे नियोजित आहे, त्यांना संजीवके दिली जात नाहीत. सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेतलेल्या बागेतील झाडांच्या आंब्यांना ग्राहकांकडून दरही चांगले मिळतात. सध्या बागेतील सुमारे ५५० झाडांचे सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन केले जाते. यंदा बागेत ऑक्टोबर महिन्यात झाडांना पहिला मोहर आला होता.

त्या वेळी बागेत साफसफाई करण्यात आली. गवत काढून बागेतील खड्ड्यात मल्चिंग करण्यात आले. याच कालावधीत शेंडे अळी, पानांवरील अळीचा प्रादुर्भाव दिसून आला. त्यासाठी शिफारशीप्रमाणे रासायनिक कीटकनाशकांची फवारणी घेतली. याशिवाय कलमांवर आलेला मोहर टिकून राहण्यासाठी शिफारशीप्रमाणे बुरशीनाशकांची फवारणी दर १५ दिवसांनी घेण्यात आली.

या वर्षी पालवीवर फुलकिड्यांचा प्रादुर्भाव झाला होता. त्यासाठी शिफारशीत घटकांची फवारणी घेतली. मोहोर पूर्ण आल्यावर जानेवारीत आणखी एक फवारणी केली. त्यानंतर वाटाणा आकाराची फळे दिसू लागल्यावर जिब्रेलिक ॲसिडची एक फवारणी घेतली.

याच कालावधीत झाडांची हलवणी करण्यात आली. त्यामुळे सुकलेला मोहोर गळून पडण्यास मदत झाली. जेणेकरून झाडावरील कैरीची वाढ व्यवस्थित होईल. हे सर्व जानेवारी महिन्यात करण्यात आले.

कैरी सुपारी एवढ्या आकाराची झाल्यावर सेंद्रिय घटकांची फवारणी घेतली. जानेवारी ते मार्च या कालावधीत अशा तीन फवारण्या केल्या. यामुळे फळांचा आकार वाढून रंग देखील सुधारण्यास मदत होते.

या वर्षी मार्च महिन्यात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला होता. त्यामुळे आंबा भाजण्याची शक्यता होती. हे लक्षात घेऊन मार्च महिन्यात आठ दिवसांनी प्रति झाड २०० लिटर पाणी देण्यास सुरुवात केली. त्यामुळे कडक ऊन असूनही फळे भाजली नाहीत. आंबा तयार होण्यापूर्वी पुन्हा एकदा झाडांवरील सुकलेला मोहर काढून टाकण्यात आला.

जयवंत बिर्जे ९४२२६२५३३०

(शब्दांकन : राजेश कळंबटे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT