Industrial Revolution Agrowon
ॲग्रो विशेष

Industrial Revolution : निरुपयोगी वर्गाचा उदय

Employment : पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या औद्योगिक क्रांतीने मध्यमवर्गाला जन्म दिला. यापूर्वी गरीब व श्रीमंत हे दोनच वर्ग मानले जात. १९९१ नंतर भारतात अर्थक्रांती झाली आणि त्यातून खूप मोठा वर्ग एका आर्थिक वर्गातून पुढच्या आर्थिक वर्गात ढकलला गेला.

Team Agrowon

अमोल साळे

Amol Sale Article : पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या औद्योगिक क्रांतीने मध्यमवर्गाला जन्म दिला. यापूर्वी गरीब व श्रीमंत हे दोनच वर्ग मानले जात. १९९१ नंतर भारतात अर्थक्रांती झाली आणि त्यातून खूप मोठा वर्ग एका आर्थिक वर्गातून पुढच्या आर्थिक वर्गात ढकलला गेला. गेल्या काही वर्षांपासून चौथ्या औद्योगिक क्रांतीविषयी भाकिते मांडले जात आहेत.

यापूर्वीच्या औद्योगिक क्रांतीसाठी मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणावर गरज भासली आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर रोजगार उत्पन्न झाले. ते रोजगार देण्यासाठी, कारखान्यात काम करवून घेण्यासाठी लोकांना शिक्षण देण्यात येऊ लागले. त्यातून सध्याची शिक्षण पद्धती निर्माण झाली, जिचा मूळ उद्देश कारखान्यांना कुशल कामगार उपलब्ध करून देणे हा होता.

या पार्श्‍वभूमीवर येणारी चौथी औद्योगिक क्रांती विशेष आहे. कारण यात कामगारांची गरज फार कमी आहे. बरीचशी कामे यंत्र, सॉफ्टवेअर प्रोग्राम करू शकतील. या सर्वातून मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी निर्माण होऊ शकते. रोजगारविहिन विकास (जॉबलेस ग्रोथ) होत राहील. म्हणजे जीडीपी वगैरे वाढत राहील पण ही वाढ सर्वसमावेशक नसेल. सरकार कराच्या रूपात निधी उभारू शकेल पण रोजगार निर्मिती होणार नाही. पर्यायाने खूप मोठी लोकसंख्या बेरोजगार राहील. यातून युनिव्हर्सल बेसिक इन्कम यासारखे पर्याय निर्माण होतील.

गत औद्योगिक क्रांतीतून जसा मध्यम वर्गाचा जन्म झाला तसा भविष्यातील औद्योगिक क्रांती निरुपयोगी वर्गाला (युसलेस क्लास) जन्म देईल, असे मानले जात आहे. जेव्हा एखाद्याला हाताला काम मिळते तेव्हा त्याच्या आयुष्याला एक उद्दिष्ट मिळते. स्थिर आयुष्य, सुखी कुटुंब, स्वतःचे घर, गाडी, मुलांना चांगले शिक्षण इत्यादी उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून लोक आयुष्यभर राबतात. बेरोजगारी फक्त आर्थिक टंचाई घेऊन येत नाही तर बौद्धिक दिवाळखोरी पण घेऊन येते. ढोबळमानाने पाहिले तर आर्थिक स्थैर्य लाभलेले लोक समाजाला उपद्रव करत नाहीत. शांतता राखतात, कर भरतात, गुन्हेगारी कमी होते इ. पण बेरोजगारी ही सामाजिक अस्थैर्य घेऊन येते.

चौथ्या औद्योगिक क्रांतीमुळे निर्माण होणाऱ्या निरुपयोगी वर्गाला गुंतवून ठेवणे, सामाजिक स्थैर्य अबाधित राखणे हे मोठे आव्हान असणार आहेत. त्यासाठी त्यांना युनिव्हर्सल बेसिक इन्कम, मोफत इंटरनेट, सोशल मीडिया, कॉम्प्युटर-मोबाइल गेम्स, साखरयुक्त, पोषणमूल्य नसलेले जिवंत राहण्यापुरते अन्न, पॉर्न, राजकीय गप्पा, धार्मिक अभिमान, अस्मिता वगैरे मनोरंजनाच्या साधनांमध्ये गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. प्रसंगी या निरुपयोगी वर्गाला कायमचे संपवण्याचाही प्रयत्न होईल. त्यासाठी साथीचे रोग वगैरे पसरवले जातील असे भाकित कितीतरी विद्वान करत आहेत.

युवाल हरारी, ज्यांनी सेपियन्स (Sapiens) नावाचे पुस्तक लिहून जगभरातल्या पुस्तकप्रेमी घराघरांमध्ये आपले स्थान बनवले आहे ते या विषयावर वारंवार बोलत असतात. बहुदा युसलेस क्लास हा शब्दही त्यांनीच पहिल्यांदा वापरला असावा. हा शब्द ऐकताना फार नकारात्मक वाटावा असाच आहे, पण त्याला पर्यायी शब्द अजून तरी नाही.

२०१७च्या शेवटी फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांनी हार्वर्ड विद्यापीठात दिलेल्या ‘Commencement Speech’चा मुख्य विषय होता- ‘ध्येय’. येणाऱ्या पिढ्यांपुढचे सर्वांत मोठे आव्हान ‘ध्येय’ हेच असणार आहे. झुकरबर्ग यांनी हरारी यांच्याइतके स्पष्टपणे सांगितले नसले, तरी त्यांचा आणि हरारी यांचा रोख एकाच दिशेने होता, हे कळते.

तरीही निरुपयोगी वर्गाचा उदय म्हणजे मध्यम वर्गाचा अस्त नाही. उद्योगांना कामगारांची गरज राहीलच. फक्त ती गरज कमीत कमी कामगारांकडून भागेल आणि कौशल्याच्या पातळीची अपेक्षा ही दर औद्योगिक क्रांतीत उंचावली जाईल हे नक्की. एक पिढी शाळा-कॉलेजात जे काही तांत्रिक ज्ञान शिकेल, ते ज्ञान काही दशकांत कालबाह्य होताना त्याच पिढीला पाहावे लागेल. त्यामुळे सतत नवीन तंत्रज्ञान शिकत राहण्याची गरज निर्माण केली जात आहे.

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या सद्यपरिस्थितीशी या सगळ्यांचा ताळमेळ लावण्याचा प्रयत्न करून बघा. एखादी गोष्ट भविष्यात अशी घडेल, तशी घडेल असा आपण विचार करत असतो तेव्हा त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आजही घडत असतात. आज सुद्धा भविष्याचाच एक भाग असतो.
----------
(लेखक आर्थिक विषयांचे अभ्यासक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सिताफळाची आवक वाढली; आवळ्याला कमी उठाव, हिरवी मिरची नरमली, लिंबुचे दर टिकून, लसणाचे दर स्थिर

Leopard Attack : निमगावात बिबट्याचा घोड्याच्या शिंगरूवर हल्ला

Dam Water Discharge : वाघूर, गिरणातून विसर्ग

Crop Damage : सोलापूर जिल्ह्यात १.३३ लाख हेक्टरवरील पिकांना तडाखा

Rain Damage Jalgaon : पावसाने जळगाव जिल्ह्यात हानी

SCROLL FOR NEXT