Nagpur News : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची क्रूर कहाणी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांनी बुधवारी आणि गुरुवारी सभागृहात मांडली. या वेळी विधानसभा अक्षरशः सुन्न झाली. या वेळी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराड याला खुनाचा कट आणि खून या गुन्ह्याखाली अटक करावी, अशी मागणी सर्वपक्षीय आमदारांनी केली.
परळी आणि बीड जिल्ह्यांत राजकीय वरदहस्ताने गुंडगिरी फोफावली असून, या संघटित गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढण्याची मागणी या वेळी दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी केली. या वेळी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी हे क्रूर हत्याकांड घडविणाऱ्या टोळीचा खरा आका शोधून त्याला अटक करण्याची मागणी केली.
तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे गटनेते जितेंद्र आव्हाड यांनी, तर या प्रकरणाचा तपास एसआयटीकडून करून काही फायदा होणार नाही. सरकारमध्ये बसलेल्यांची चौकशी करण्याची हिंमत कोणीही दाखविणार नाही. संशय असलेल्या मंत्र्यांचा आधी राजीनामा घ्या आणि मग न्यायालयीन चौकशी करा, अशी मागणी केली.
राष्ट्रवादी राष्ट्रवादीच्या (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनीही घटनाक्रम सांगत देशमुख यांची क्रूरपणे केलेल्या हत्येचा प्रसंग गुरुवारी सभागृहात मांडला. या वेळी क्षीरसागर यांना अश्रू अनावर झाले. गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनीही हा मुद्दा उपस्थित करत कडक कारवाईची मागणी केली.
विधानसभेत नियम १०१ अन्वये संतोष देशमुख आणि परभणी येथे झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येचा मुद्दा विरोधी पक्षाच्या नाना पटोले, सुनील प्रभू, जितेंद्र आव्हाड तसेच केजच्या आमदार नमिता मुंदडा यांनी सभागृहात मांडला. बुधवारी रात्री उशिरापर्यंत या विषयावर चर्चा सुरू होती. गुरुवारी सकाळी पुन्हा चर्चेला प्रारंभ झाला.
या वेळी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड यांना अटक करण्याची मागणी सर्व आमदारांनी केली. या चर्चेत आमदार सुरेश धस, नमिता मुंदडा, अभिमन्यू पवार, संदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडित, राजू नवघरे, राजेश विटेकर यांनी देशमुख यांची झालेली क्रूर हत्या व तो प्रसंग सभागृहात मांडला. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच एकनाथ शिंदे हे देखील ही चर्चा सुन्न होऊन ऐकत होते.
या वेळी सुरेश धस यांनी परळीतील गुंडांनी बीड जिल्ह्याचे गुन्हेगारीकरण केले असून त्याचे क्षेत्र विस्तारत चालले आहे. तर नमिता मुंदडा यांनी बीडमध्ये पोलिसांचा कुठलाही धाक नसल्याचे मांडले. यातील प्रमुख आरोपी हा वाल्मीक कराड असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. एका मंत्र्याला मंत्रिमंडळातून बाहेर काढत नाहीत, त्याचा राजीनामा घेत नाहीत तोपर्यंत संतोष देशमुखला न्याय मिळणार नाही, असे सांगत आव्हाड यांनी नाव न घेता मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी केली.
सूर्यवंशी हत्येची सखोल चौकशीची मागणी
परभणी येथे पोलिसांच्या कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या झालेल्या हत्येची सखोल चौकशी करण्याची मागणीही सभागृहात आमदार नितीन राऊत, राजकुमार बडोले, जितेंद्र आव्हाड यांनी केली. परभणी शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड करण्यात आली. हा मोडतोड करणारा आरोपी सोपान पवार हा गतिमंद असल्याचे सांगितले जात आहे.
पण बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात सामील झालेल्या सोपान पवार याने ही मोडतोड केली आहे. त्यामुळे तो खरच गतिमंद आहे का, याची चौकशी करावी अशी मागणी नितीन राऊत यांनी केली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.