
Nagpur News : नागपुरातील जम्बो मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता तीनही पक्षांत नाराजांचा उद्रेक होत असून पक्षनेत्यांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करून प्रश्न विचारले जात आहेत. काही नाराज आमदारांनी माध्यमांशी बोलत, काहींनी मौन बाळगत तर काहींनी थेट पत्र लिहून आपली नाराजी बोलून दाखविली आहे.
सरकार स्थापन झाल्यानंतर रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार नागपुरात अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राजभवनाच्या हिरवळीवर पार पडला. यात अनेक ज्येष्ठ मंत्र्यांना बाजूला ठेवत नव्याने काही आमदारांना संधी दिली आहे. तीनही पक्षांतील मातब्बर नेत्यांना बाजूला सारल्याने त्यांच्यात प्रचंड नाराजी आहे.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना सोमवारी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आपला संताप आवरता आला नाही. ज्यांनी मला डावलले त्यांना तुम्ही प्रश्न विचारा असे म्हणत ‘कोण वरिष्ठ’ असे सांग थेट पक्षश्रेष्ठींनाच आव्हान दिले. शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांनी पुण्याला जाणे पसंत केले असून तूर्त बोलणार नाही पण जेव्हा बोलेन तेव्हा सर्वकाही बोलेन असे सांगितले आहे. दीपक केसरकर यांनी आपला नागपुरातील मुक्काम हलविला आहे. पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी तर आता मला पुढील अडीच वर्षांत मंत्रिपद दिले तरी नको असे सांगत नाराजी व्यक्त केली आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार, सुरेश खाडे, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित यांना बाजूला ठेवले आहे. या चारही आमदारांनी अधिवेशनाकडे पाठ फिरविली. सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्याला अंधारात ठेवल्याचा अप्रत्यक्ष आरोप केला. शेवटपर्यंत माझ्या नावाचा समावेश होता मात्र, अचानक नाव काढले असे सांगत मी नाराज नाही असे सांगण्याचा प्रयत्न केला.
भाजपचे नेते संजय कुटे यांनीही पत्र लिहिले असून मतदारसंघातून मला सलग पाचवेळा निवडून दिले आहे. त्यांच्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही. माझे जे व्हीजन आहे ते पूर्ण करणार आहे. त्यामुळे कुणी नाराज होऊ नये असे सांगितले आहे.
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अनिल पाटील आणि संजय बनसोडे हे नाराज असले तरी त्यांनी सभागृहात हजेरी लावल्याचे दिसले. काल नागपूर सोडलेले दीपक केसरकर यांनी सभागृहात हजेरी लावली मात्र, तोवर कामकाज संपले होते. तसेच वाचाळवीर म्हणून ख्याती असलेले अब्दुल सत्तार यांनीही अधिवेशनाकडे पाठ फिरविली.
पडळकर, खोत यांचीही नाराजी
जत विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. तसे वातावरणही तयार करण्यात आले होते. तसेच शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनाही अपेक्षा होत्या. मात्र, या दोघांनाही भाजपने संधी दिली नाही. त्यामुळे एरवी कॅमेऱ्यांसमोर प्रतिक्रियांसाठी उपलब्ध असलेले हे दोन्ही नेते अधिवेशनात दिसले नाहीत.
खोत यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणाले, की मित्रपक्षांसाठी काही मंत्रिपदे बाजूला काढायला हवी होती. मात्र, आमच्याकडून शेत नांगरून घेतले आणि पैरा न फेडता नांगर आणि बैलही घेऊन गेले आहेत. तरीही आम्ही महायुतीसोबत आहोत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.