Milk Rate agrowon
ॲग्रो विशेष

Milk Rate Issue : घटत्या दूध दराचा उत्पादकांना दररोज वीस कोटींचा फटका

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : दुग्धजन्य पदार्थांचे दर कमी झाल्याचे सांगत गेल्या अडीच-तीन महिन्यांपासून गाईंच्या दुधाचे दर कमी केले आहेत. त्याचा मोठा फटका दूध उत्पादकांना बसत आहे. गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत सध्या राज्यात दररोज दूध उत्पादकांना वीस कोटी रुपयांपर्यंत आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. राज्यात दूध दर पाडल्याने संताप व्यक्त केला जात असून उपोषण, आंदोलने सुरू असतानाही दुग्धविकास विभाग दखल घेत नसल्याने दूध उत्पादक हतबल झाले आहेत.

राज्यात दर दिवसाला दोन ते सव्वा दोन कोटी लिटर गाईच्या दुधाचे संकलन होते. नगर, नाशिक, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली भागात दूध व्यवसाय करणारे शेतकरी अधिक आहेत. २०१६ मध्ये दूध दरात मोठी घसरण झाली होती.

त्यावेळी दूधदर वाढीसाठी राज्यात मोठे आंदोलन उभारले गेले होते. त्याचे केंद्र नगर जिल्ह्यात होते. मुंबईला जाणारा दूध पुरवठा बंद केल्यावर १७ रुपयांवरून दुधाचा दर पंचवीस रुपयांवर गेला होता. आताही तीच परिस्थिती राज्यात निर्माण झाल्याचे शेतकरी नेते सांगत आहेत.

सहा महिन्यांपूर्वी दुधाला ३९ रुपये प्रती लिटर दर होता. दुग्धजन्य पदार्थ, बटर, पावडरीचे दर कमी झाल्याने दूध दरात कपात सुरू केला. ३२ रुपयांवर दर आल्यानंतर दूध दर निश्चितीसाठी समिती केली. समितीने ३४ रुपये प्रतीलिटर दर देण्याचे निश्चित केले.

त्यानुसार दूध संघांनी २१ जुलैपासून ३.५ फॅट व ८.५ ‘एसएनएप’ला ३४ रुपये दर द्यायची घोषणा केली, परंतु वेगळ्या मार्गाने शेतकरी लुट करण्यासाठी रिटर्नचे दर वाढवून ‘एसएनएफ’च्या प्रतिपॉईंटला ३० पैशाऐवजी १ रुपये व फॅटच्या प्रतिपॉईटला २० पैशांऐवजी ५० पैसे कपात सुरू केली.

त्याबाबत शेतकऱ्यांत ओरड झाल्यानंतर पुन्हा हे दर पूर्वीप्रमाणे केले. मात्र दुधाचे दरही कमी करून ३२ रुपये केले. आता तर समितीलाही न मोजता दूध संघ चालकांनी दुधाचे दर २६ ते २७ रुपयांवर आणले आहेत. त्यामुळे शेतकरी संतप्त असून आंदोलने, मोर्चे सुरू झाली आहेत. नगर जिल्ह्यातील अकोले येथे चार दिवसांपासून शेतकरी उपोषण करत आहेत. पुणे जिल्ह्यातही सागर जाधव यांनी दूध दरवाढीसाठी उपोषण केले आहे.

सध्या राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. बहुतांश भागात चारा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तयार होत असल्याने दूध व्यवसाय जपणे अवघड झाले आहे. त्यात पशुखाद्याचे दर वरचेवर वाढत आहेत. अशा संकटाशी सामना करत असताना दुधाचे दर कमी केले जात असल्याने राज्यातील दूध उत्पादक हतबल झाले आहेत. मागील सहा महिन्यांच्या तुलनेत सध्या राज्यातील दूध उत्पादकांना दररोज २० ते २५ रुपयांचा आर्थिक फटका सोसावा लागत आहेत.

भेसळ कोण रोखणार?

राज्यात दुधाच्या पडत्या दरासोबत दुधात होणारी भेसळही सतत चर्चेत असते. दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही दुधातील भेसळ रोखण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्या लागतील असे सातत्याने सांगत आहेत. मध्यंतरी नगर, बीड जिल्ह्यांतील दूध भेसळ उघड झाली होती.

अजूनही अनेक भागात भेसळ सुरू असल्याचा दुग्धविकास विभागाला वाटते. असे असले तरी यंत्रणा तुमच्या हाती असताना जर हतबलता व्यक्त होत असेल तर मग दुधातील भेसळ कोण रोखणार? असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून अनेक अडचणीवर मात करुन दूध व्यवसाय करतो. सध्या अडीचशे लिटर दूध आहे. दुष्काळी स्थितीमुळे त्रस्त असताना दुधाचे दर पाडल्याने दररोज तीन हजार रुपयाचा आर्थिक फटका बसत आहे. सरकारने दूध व्यवसायाला आधार दिला नाही तर अनेक शेतकऱ्यांचा दूध व्यवसाय मोडून जाईल.
राजेंद्र भागचंद भगत, दूध उत्पादक, पिंपळगाव वाघा, ता. नगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT