Buldana News : मार्चच्या मध्यातच उन्हात वाढत झाली. दिवस व रात्रीचे तापमान वाढले. त्यामुळे प्रकल्पांतील पाण्याचे बाष्पीभवन वाढले. प्रकल्पातील साठा झपाट्याने घटत आहे. सध्या सर्व प्रकल्पांतील साठा मिळून २१ टक्क्यांच्या आत पोहोचला आहे. यामुळे आगामी दोन महिन्यांत पाणीटंचाईचे चटके आणखी वाढतील अशी शक्यता आहे. जिल्ह्यात खडकपूर्णासारखा सर्वांत मोठा प्रकल्प पूर्णतः कोरडा पडला आहे.
जिल्ह्यात तीन मोठे आणि ७ मध्यम प्रकल्प आहेत. लघू प्रकल्पांची संख्या अधिक असली तरी काही प्रकल्प वगळता बहुतांश प्रकल्पांत पाणीसाठा फारसा नाही. सध्या प्रकल्पात केवळ २१ टक्के जलसाठा आहे.
जिल्ह्यात यंदाच्या मोसमात पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी प्रमाणात पाऊस झाला होता. त्यामुळे प्रकल्प पूर्णतः भरू शकले नव्हते. सध्या उन्हाळा सुरू झाला. तापमानात कमालीची वाढ झालेली आहे. जिल्ह्यात असलेल्या मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ १४.७६ टक्के साठा आहे. नळगंगा प्रकल्पात ३०.२५ टक्के, पेनटाकळी प्रकल्पात १९.८३ टक्के साठा आहे.
मध्यम प्रकल्पांमध्ये सुद्धा २८.२७ टक्के साठा आहे. ज्ञानगंगा प्रकल्पात ४८.३७ टक्के, मस प्रकल्पात ४२.३० टक्के, कोराडी प्रकल्पात २९.८३ टक्के, पलढग प्रकल्पात ३८.८८ टक्के, मन प्रकल्पात १५.१२ टक्के, तोरणा प्रकल्पात ९.५० टक्के, उतावळी प्रकल्पात २३.२० टक्के जलसाठा आहे. लघू प्रकल्पात २३.७० टक्के जलसाठा आहे. सर्व प्रकल्प मिळून सरासरी २१ टक्के पाणी उपलब्ध आहे.
ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा
जिल्ह्यात यंदा ग्रामीण भागात नागरिकांना मार्च महिन्यामध्ये पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. यामुळे टँकरच्या मागणीत वाढ झाली.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.