Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : शेतकऱ्यांसाठी रात्र ठरली वैऱ्याची

Team Agrowon

Nashik News : गेल्या सप्ताहात झालेले पिकांचे नुकसान ताजे असतानाच शनिवारी (ता. १९) रोजी पुन्हा जिल्हाभर मुसळधार पावसाने दाणादाण उडवली आहे. यामध्ये मका, सोयाबीन, खरीप कांदा व रब्बी कांदा रोपवाटिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचा समस्यांचा विळखा अजूनच वाढला आहे. एका रात्रीत पावसाच्या नुकसानीमुळे कोट्यवधींचा फटका बसला आहे. त्यामुळे शनिवारची रात्र शेतकऱ्यांसाठी वैऱ्याची ठरली.

जिल्ह्यात सर्व दूर झालेल्या पावसामुळे सर्वत्र नुकसान आहे. शनिवारी सायंकाळी चार वाजेनंतर पावसाला सुरुवात झाली. तर मध्यरात्रीपर्यंत पाऊस कोसळत होता. चांदवड परिसरात अवघ्या काही तासांतच १०० मिमी पावसाची नोंद झाली. ढगफुटीसदृश पावसामुळे चांदवड परिसरात सर्वत्र पाणीच पाणी होते. येथून जवळच असलेल्या वडबारे परिसरातील तामटी बंधारा फुटल्याने राहूड भागात पाणी मोठ्या प्रमाणावर वाहून आले.

तर चंद्रेश्वराच्या पायथ्याशी असलेला बंधाराही फुटल्याने राहुड नदी दुथडी भरून वाहत होती. लहान ओढे, नाले काही वेळात वाहू लागले.नदीकाठच्या जवळपास १ हजार मीटर शेतजमिनीतील माती मोठ्या प्रमाणावर वाहून गेली. याशिवाय पाण्याच्या प्रवाहासोबत ट्रॅक्टर, दुचाकी वाहून गेली. तर अनेक ठिकाणी विहिरींचे उभारलेले कडेही तुटून वाहिले तर प्रभाव मोठा असल्याने खूट्यावरच जनावरे पाण्यात तडफडून मृत पावल्याची भीषण परिस्थिती आहे. याशिवाय बहुतांश ठिकाणी कांदा रोपवाटिकांचे अतोनात नुकसान आहे.

देवळा तालुक्यातील कापशी वाखरी परिसरात झालेल्या पावसामुळे खरीप पिकांसह कांदा रोपवाटिकांचे मोठे नुकसान आहे. मक्याच्या पिकाची यामध्ये प्रामुख्याने नुकसान असल्याने शेतकऱ्यांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न या पावसामुळे निर्माण झाला आहे.

यासह सटाणा, मालेगांव तालुक्यातील अनेक भागांत पावसाने दाणादाण उडवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढल्याचे दिसून येते. शिवारात पाणी साचल्याने शेतकऱ्यांना रब्बी हंगामही उभा करता येतो की नाही असा प्रश्न आहे. येवला, निफाड, सिन्नर, कळवण, नांदगाव, पेठ, सुरगाणा, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक, दिंडोरी सर्वत्र नुकसान असून शेतकरी तणावाखाली आहे.

नुकसान असे ...

- चांदवड तालुक्यात पावसामुळे पाझर तलावांचे नुकसान.

- जिल्ह्यात सर्वच भागात कांदा पिकांसह, कांदा रोपवाटिकांचे नुकसान.

- इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा तालुक्यांतील अनेक ठिकाणी भात लागवडी भुईसपाट.

- साठवलेला चाराही पावसात भिजल्याने अडचणीत वाढ.

टोमॅटो, कोबी, मिरची, वेलवर्गीय भाजीपाला पिकांचे नुकसान.

- द्राक्ष पट्ट्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे द्राक्षांची कोवळी फुटीची पाने फाटली.

- अनेक ठिकाणी पूल वाहून गेल्याने संपर्क तुटला, विजेचे खांब तुटून पडल्याने वीजपुरवठा खंडित.

- चांदवड, येवला तालुक्यात पाण्याचा प्रवाह घरात, दुकानात गेल्याने मोठे नुकसान.

येथे अतिवृष्टीची नोंद:

माडसांगावी (७२), देवगाव (६८), नांदूर (६८.८), विंचूर (६८.८), देवपूर (७२), वडांगळी (७४.८), पांगरी (१०५), चांदवड (१००.५).

पाण्याच्या प्रवास सोबत जमीन वाहून गेल्याने खडक उघडा पडला आहे. नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या शेतातील ३० फूट माती वाहून गेली. यासह या पुरामध्ये गाई, बैल, म्हैस व शेळ्या मृत झाले आहेत. परिसरातील गावांचा संपर्क तुटला आहे. चांदवडसह देवळा तालुक्यातील अनेक गावे या पुरामुळे प्रभावित झाले आहेत.
- विजय निकम, शेतकरी, राहुड, ता. चांदवड
अनेक ठिकाणी उंचावर शेतात पाणी साचलेले पाहिले नव्हते. मात्र अशा ठिकाणच्या उंचावरील जमिनी आता उकळून गेले आहेत. खरिपातील पिके हातातून गेली शिवाय कांदा रोपे आता हातात शिल्लक नाहीत. नुकसान मोठे असल्याने सरकारने सरसकट मदत द्यावी हाच पर्याय आहे. शेतकऱ्यांना आश्वासने देऊन अडचणीत आणू नये आता तातडीने मदतीची गरज आहे.
- मधुकर मोरे, शेतकरी, मोरेनगर, ता. सटाणा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Congress on BJP : भाजप महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा सगळ्यात मोठा शत्रू; काँग्रेसकडून जोरदार टीका

Marathwada Heavy Rain : मराठवाड्यातील सहा जिल्ह्यातील ४० मंडलांत अतिवृष्टी

Garlic Grass : बहुवार्षिक पौष्टिक द्विदल चारापीक : लसूणघास

Bidri Sugar Factory : ‘बिद्री’चा वाढीव ऊसदराचा १०७ रुपये दुसरा हप्ता आदा

Crop Damage : मराठवाड्यात पावसाने केली दाणादाण

SCROLL FOR NEXT