Cashew Farming Management:
शेतकरी नियोजन । पीक : काजू
शेतकरी : अशोक महादेव सावंत
गाव : आयनोडे, ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग
एकूण क्षेत्र : ७ एकर
काजू लागवड : ४ एकर
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आयनोडे (ता. दोडामार्ग) येथे अशोक सावंत यांची ७ एकर जमीन आहे. त्यातील चार एकरांमध्ये काजूच्या वेंगुर्ला चार आणि वेंगुर्ला सात या जातीची सुमारे ३५० कलमे आहेत. याशिवाय नारळांची १००, तर सुपारीची १ हजार झाडे आहेत. सध्या काजू हंगाम टप्प्यात असून पालापाचोळ्याखाली पडलेले काजू गोळा करून प्रतवारीचे काम सुरू आहे. बागेत कोणत्याही रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करून काजू उत्पादन घेण्यावर अशोक सावंत यांचा भर असतो.
मागील कामकाज
दरवर्षी फेब्रुवारी, मार्चमध्ये काजूच्या कलमांना १५ दिवसांच्या अंतराने पाणी दिले जाते. त्यामुळे काजू बीचा आकार वाढतो, वजन देखील चांगले मिळते. यावर्षी देखील सलग दोन महिने पंधरा दिवसांच्या अंतराने पाणी दिले आहे. त्याचे चांगले परिणाम दिसून आले असून वेंगुर्ला चार जातीची काजू बी आकाराने मोठी झाली.
या वर्षीचा काजू हंगाम दरवर्षीच्या तुलनेत महिनाभर विलंबाने सुरू झाला. साधारणपणे मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून काजू बी परिपक्व होण्यास सुरुवात झाली.मागील पंधरवड्यापर्यंत हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू होता. झाडावरून परिपक्व होऊन जमिनीवर पडलेल्या काजू बी गोळा करून प्रतवारी करण्याचे काम सुरू आहे.
हे काम मागील दीड महिन्यापासून सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत करण्यात आले.काजू प्रतवारी करून नंतर २४ तास उन्हामध्ये वाळविण्यात आले. त्यानंतर पिशवीत भरून ठेवले. सध्या हंगाम अंतिम टप्प्यात आला असून पालापाचोळ्याखाली पडलेल्या काजू निवडण्याचे काम सुरू आहे.
आगामी नियोजन
काजू हंगाम संपल्यानंतर कलमांच्या वाढलेल्या फांद्याची छाटणी करण्यात येईल. छाटणी केलेल्या फांद्याना बोर्डो पेस्ट लाली जाईल. छाटणीची कामे पूर्ण झाल्यानंतर बागेतील लहान झुडपे, अनावश्यक वेली काढल्या जातील. बागेत कलमांखाली पडलेला पालापाचोळा गोळा करून बुंध्यावर रचून ठेवला जाईल. पुढे पावसाळ्यात तो कुजून कलमास त्याचा फायदा होतो.
हंगाम संपल्यानंतर बागेत नियमितपणे फेरफटका मारून खोड, फांद्यांचे निरीक्षण केले जाईल. त्यामुळे प्राथमिक अवस्थेत खोडकीड, रोट्याचे निदान होते. यामुळे वेळेवर उपाययोजना करणे शक्य होते.जूनमध्ये पाऊस सुरू झाल्यानंतर पावसाचे प्रमाण बऱ्यापैकी चांगले असते. त्यामुळे बागेत कामे करता येत नाहीत.
साधारणपणे जुलैमध्ये पाऊस कमी असताना झाडांना खतमात्रा दिली जाईल. खतमात्रा कलमाच्या आकारमानानुसार व वयानुसार ठरविली जाते. कलमांना दरवर्षी एकच रासायनिक खत दिले जात नाही. त्यात दरवर्षी बदल केला जातो. याच कालावधीत कलमांवर खोडकिडीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शिफारशीत रासायनिक कीटकनाशकाचा वापर केला जातो.
पावसाळ्याच्या कालावधीत बागेत तणांचा प्रादुर्भाव वाढतो. जून, जुलै महिन्यांत पावसाची तीव्रता अधिक असल्यामुळे या कालावधीत ग्रासकटर चालविता येत नाही. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये पाऊस कमी झाल्यानंतर ग्रासकटरच्या साहाय्याने तण कापले जाते. बागेत तणनाशकांचा वापर टाळला जातो. बागेमध्ये कीड नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळला जातो.
अशोक सावंत, ९४०५२२८६३३
(शब्दांकन : एकनाथ पवार)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.