Indian Agriculture Agrowon
ॲग्रो विशेष

स्वार्थी व्हा, पोटार्थी व्हा

Team Agrowon

नीरज हातेकर

अठराव्या शतकात भारताचा जगाच्या औद्योगिक (Industrial) उत्पन्नातील वाटा २५ टक्के होता. यातील बहुतेक हिस्सा हा वस्त्रोद्योगाचा होता. भारतात उंची वस्त्र विणली जात होती; कारण त्यांना जागतिक बाजारपेठ होती. कोणत्याही उत्पादनात नवीन शोध लागायचे असतील तर त्याला एक किमान स्केल लागते.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठांत ती स्केल आपल्या विणकरांना मिळाली. शिवाय बहुतेक सगळे विणकर शहरी भागातून राहत असत. बहुतेक भारतीय शहरे बहुसांस्कृतिक होती. एकट्या नगरमध्ये फ्रेंच, रशियन आणि इतर देशातील लोकांच्या वसाहती होत्या. नवीन कल्पना सुचण्यासाठी जे निरनिराळे विचार प्रवाह समोर यायला लागतात त्यासाठी हे आवश्यक होते.

या उलट खेड्यांतून असलेली बलुतेदारी ही मुळात उत्पादन व्यवस्था नव्हती तर जाती व्यवस्था होती. तिथे स्केलसुद्धा नव्हती आणि नवीन कल्पनासुद्धा नव्हत्या. म्हणून इथे नवीन शोध लागले नाहीत. भारतात शेकडो वर्षे खेड्यात बैलगाडीचे चाक दगडी आणि आरे नसलेले सॉलिड होते. ते खूप जड तर होतेच आणि त्रासदायकसुद्धा होते.

पण ते बदलावे अशी कोणतीच प्रेरणा नव्हती. जाती व्यवस्थेमुळे बदल करणेही अवघड होते. ह्याया उलट वस्त्रोद्योगात बरेच बदल होऊ शकले. जेव्हा जातीव्यवस्था बदलाच्या आड आली तेव्हा काही ठिकाणी विणकरांनी इस्लाम स्वीकारून यातून मार्ग काढला. उच्च जातींना समुद्री व्यापार करायला जातीय बंधने आड आली तेव्हासुद्धा त्यांनी इस्लाम स्वीकारून समुद्री व्यापारातील मुस्लिम व्यापाऱ्यांच्या व्यापारी जाळ्याचा फायदा घेतला. ते व्यापारात सक्षम झाले आणि समूह म्हणून संपन्न झाले.

या काळात भारतीय शेतीत झालेला एकमेव बदल म्हणजे मिरची सारखी नवीन पिके. त्याला मागणी आणि बाजारपेठा असल्यामुळे शेतकऱ्यांनी या पिकांची लागवड केली. आंतरराष्ट्रीय प्रवाहांतून झालेला हा बदल. थोडक्यात, जागतिक प्रवाहांशी जोडून घेणे गरजेचे. त्यातून समाज पुढे जातो. जगाशी जोडून घेणे, मिळालेल्या संधींचा फायदा घेणे, गरज भासली तर परंपरा टाकून देणे, नवीन गोष्टी स्वीकारणे, आथिर्कदृष्ट्या संपन्न होणे हा राष्ट्र निर्मितीचा मार्ग आहे.

याउलट जगात काय चाललंय ह्याच्याशी घेणे-देणे नसलेला, स्वतःच्या परंपरेच्या जुनाट कल्पंना उराशी कवटाळून, आम्हीच काय ते थोर मानणारा समाज पुढे जात नाही. तो मागेच जातो. हे राष्ट्र निर्मितीचे वगैरे कार्य नाहीये.

ॲडम स्मिथ हा आधुनिक अर्थशास्त्राचा जनक. त्याचे एक महत्वाचे वाक्य आह- खाटिक, बेकरीवाला यांच्या चांगुलपणामुळे आपल्याला पाव, मांस मिळत नाही; तर ते स्वतःचा स्वार्थ जपतात म्हणून आपल्याला या वस्तू मिळतात, असे तो म्हणतो. स्वार्थावर अर्थकारण चालते. स्वार्थी व्हा. पोटार्थी व्हा. स्वार्थी आणि पोटार्थी माणसांमुळेच ही व्यवस्था चालली आहे. सगळेच त्याग करायला लागले तर देश बंद पडेल. माल खपणार नाही तर तयारच कशाला कोण करेल? धंदे चालणार नाहीत. नोकऱ्या जातील. पैसा-पाणी बंद होइल आणि देश बुडेल.

त्यामुळे उगाच त्याग वगैरेचे फार स्तोम माजवू नये. आपण देशासाठी त्याग करत नाही, वगैरे खंत बाळगू नका. नीट, चोख व्यवहार करा. स्वतः स्थिर झालात की इतरांना सुद्धा स्थिर व्हायला मदत करा. याच्या इतके मोठे राष्ट्रकार्य नाही. उगाच कुणाच्या भडक भाषणाला, शेंडा बुडखा नसलेल्या कपोलकल्पित इतिहासाच्या थापांना फसू नका. आणि केवळ त्याग करतो, साधा राहतो म्हणून लोकांचा आदर करणे बंद करा. त्यागाचा धंदा बंद करा. अनेक अण्णा, गुरुजी घरी बसतील.

(लेखक प्रख्यात अर्थतज्ज्ञ आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT