Agriculture AI Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture AI : कृत्रीम बुद्धिमत्तेतून कृषिक्षेत्रात शाश्‍वत बदल होतील ः फडणवीस

Team Agrowon

Pune News : ‘‘जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात शाश्‍वतता हवी आहे. मुख्यतः आपल्या सर्वांचे जीवन शेतीच्या शाश्‍वततेशी संबंधित आहे. राज्यात हवामान बदल, ओला आणि सुका दुष्काळ असे शेतीवर परिणाम करणारे विविध प्रश्‍न असून तंत्रज्ञानाच्या साह्याने आपण कृषिक्षेत्रात शाश्‍वतता आणू शकतो; अनेक गोष्टींचा अंदाज बांधू शकतो. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या साह्याने कृषी आणि आरोग्य क्षेत्रात शाश्‍वत बदल होण्यासह सर्वसामान्य माणसाचे जीवनमान उंचावेल,’’ असा विश्‍वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रातील कृषी, आरोग्य क्षेत्रासह विविध क्षेत्रांतील शाश्‍वत विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) उपयोजन (ॲप्स) तसेच तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यासाठी श्री. फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन आणि गुगल यांच्यात ‘एआय फॉर महाराष्ट्र’ सामंजस्य करार गुगल इंडियाच्या मुंढवा येथील कार्यालयात करण्यात आला. या वेळी राज्याचे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, गुगल इंडियाचे भारतातील प्रमुख आणि उपाध्यक्ष संजय गुप्ता, नागपूर येथील ट्रीपल आयटीचे संचालक प्रा. डॉ. ओमप्रकाश काकडे, ॲक्सिस माय इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रदीप गुप्ता उपस्थित होते.

श्री. फडणवीस म्हणाले, ‘‘संपूर्ण जग तंत्रज्ञानाने चालत आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रशासन चालविणे हा अतिशय सकारात्मक बदल आहे. महाराष्ट्र शासन कायमच अशा अभिनव प्रयोगांना प्रोत्साहन देत आहे. गेल्या ६ महिन्यांत एआय तंत्रज्ञान वेगाने बदलले आहे. या तंत्रज्ञानात याच वेगाने बदल अपेक्षित असल्याने त्याच्या उपयोगासाठी वेगाने पावले उचलणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने कमी वेळात झालेला हा करार सकारात्मक दिशेने उचललेले पाऊल आहे.’’

डॉ. करीर म्हणाले, ‘‘‘एआय’चे लोकशाहीकरण करणे हा या कराराचा उद्देश आहे. शेतकऱ्यांना केवळ आपल्या पिकाच्या वाढीची नव्हे तर कोणते पीक घ्यावे, कोणते नको असे सांगणारे तंत्रज्ञान असावे, असे तंत्रज्ञान ‘एआय’कडून मिळावे म्हणून प्रयत्न आहे. यासाठी गुगलशी करार केला आहे.’’

गुप्ता म्हणाले, ‘‘जागतिक तंत्रज्ञान क्रांतीमध्ये आज भारत अग्रस्थानी आहे. अंतराळ संशोधन, नावीन्यपूर्ण डिजिटल पायाभूत सुविधा आणि ‘यूपीआय’चा परदेशापर्यंत व्यापक प्रसार भारताच्या तंत्रज्ञानातील क्रांती दर्शवितो. महाराष्ट्र कायमच तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात अग्रस्थानी आहे. ‘एआय’द्वारे राज्यात कृषी क्षेत्र, आरोग्य सुविधांमध्ये आमूलाग्र बदल घडविण्यासाठी प्रयत्न करू.’’

‘३० टक्के स्टार्टअप कृषिक्षेत्रात’

‘‘जागतिक स्तरावर मोठ्या कंपन्या भारताबद्दल विचार करताना माहिती तंत्रज्ञानाच्या दृष्टीने बंगळूरचा उल्लेख करतात. मात्र भारताची स्टार्टअप राजधानी महाराष्ट्र आहे. भारतातील सुमारे २० टक्के स्टार्टअप आणि २५ टक्के युनिकॉर्न महाराष्ट्रात आहेत. या करारामुळे पुण्याबाबतही जागतिक स्तरावर बोलले जाईल. मुंबई, पुण्यापुरती मर्यादित असलेली स्टार्टअपची इको सिस्टीम आज ‘स्तर-२’ आणि ‘स्तर-३’ शहरात पोहोचली आहे. ३० ते ३५ टक्के स्टार्टअप कृषिक्षेत्रात तयार होत आहेत. याद्वारे आजचे तरुण शेतकऱ्यांचे जीवनमान बदलत आहेत,’’ असे श्री. फडणवीस म्हणाले.

सात क्षेत्रांसाठी भागीदारी

नावीन्यता आणि उद्योजकतेतील भागीदारीद्वारे गुगल राज्यातील स्टार्टअप इको सिस्टीमला तसेच उद्योजकता विकासाला एआय तंत्रज्ञान पुरवून सहकार्य करणार आहे. कौशल्य प्रशिक्षण आणि शिक्षण, आरोग्य, कृषी, पर्यावरण, नगर नियोजन, वाहतूक नियोजन अशा क्षेत्रासाठी या कराराद्वारे गुगलचे सहकार्य लाभेल. शासकीय सेवांमध्ये नाविन्यता आणून सामान्य माणसापर्यंत शासकीय योजना प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी देखील तंत्रज्ञान उपलब्ध होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Irrigation Management : सिंचन व्यवस्थापन बदलत्या वातावरणाशी सुसंगत हवे

Cotton Disease : कपाशीच्या पिकात पातेगळ वाढली

E-Peek Pahani : ई-पीकपाहणीची अट रद्द करा

Raju Shetti : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजू शेट्टींचा मोठा धमाका; ऊस परिषदेचे करणार आयोजन

Crop Damage Compensation : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांना भरपाईपोटी ९८७ कोटींची मदत

SCROLL FOR NEXT