'Indian Seed Congress 2024' Agrowon
ॲग्रो विशेष

Indian Seed Congress 2024 : निकृष्ट बियाणे नियंत्रण आराखडा स्वीकारणार

Team Agrowon

Pune News : ‘नॅशनल सीड असोसिएशन ऑफ इंडिया’ने (एनएसएआय) पुण्यात एका हॉटेलमध्ये गुरुवारी (ता. २९) आयोजिलेल्या दोन दिवसीय ‘इंडियन सीड काँग्रेस २०२४’च्या उद्‌घाटन सोहळ्यात दूरदृष्यप्रणालीद्वारे उपमुख्यमंत्री बोलत होते.

राष्ट्रीय कृषी शास्त्रज्ञ मंडळाचे माजी अध्यक्ष सी. डी. मायी, चंद्रशेखर आझाद कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ए. के. सिंग, एनएसएआयचे अध्यक्ष प्रभाकर राव, उपाध्यक्ष दिनेशभाई पटेल, कोषाध्यक्ष वैभव काशिकर, निमंत्रक अजित मुळे, सरचिटणीस बी. बी. पटनायक, कार्यकारी संचालक आर. के. त्रिवेदी व्यासपीठावर होते.

शेतकऱ्यांना सुरक्षित करायचेय

श्री. फडणवीस म्हणाले, ‘‘बोगस बियाण्यांमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होते आहे. त्यातून उद्भवणाऱ्या आक्रोशाला सरकारला सामोरे जावे लागते. निकृष्ट बियाणे नियंत्रणासाठी कायदे आणण्याचा प्रयत्न सरकारने केला. मात्र, बियाणे उद्योगातून निवेदने आली. त्यामुळे यासंबंधीच्या विधेयकांना संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवण्यात आले आहे.

या उद्योगाला उगाच कायद्यात बांधण्याचा प्रयत्न सरकारचा नाही. परंतु, ही समस्या रोखण्यासाठी बियाणे उद्योगाने रोडमॅप तयार करावा. त्यात योग्य उपाय दिल्यास त्याआधारे आम्ही कायदे करण्यास तयार आहे. मात्र, कोणत्याही स्थितीत बियाण्यांबाबत आम्हाला शेतकऱ्यांना सुरक्षित करायचे आहे. त्यामुळे बियाणे परिषदेत मंथन व्हावे. त्याआधारे आमच्यापर्यंत काही उपाय घेऊन यावे.’’

कृषी विकासाचा मुख्य घटक बियाणे

‘‘भविष्यात जगाचे नेतृत्व भारत करणार आहे. त्यासाठी आत्मनिर्भर भारताची संकल्पना केंद्र शासनाने स्वीकारली आहे. देशाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाया कृषी क्षेत्रात आहे. त्यामुळेच आत्मनिर्भरतेच्या आधारे संशोधन व तंत्रज्ञानाच्या आधारे पुढे जाण्याचा प्रयत्न केला जात आहे.

अर्थात, दर्जेदार बियाणे हाच कृषी विकासाचा मूलभूत घटक आहे. त्यासाठी नावीन्यपूर्ण तंत्र व संशोधनाच्या आधारे वाटचाल करण्याचा बियाणे उद्योगाचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. नॅशनल सीड असोसिएशन ऑफ इंडियाने या क्षेत्राला चालना देणारी आयोजिलेली ‘सीडस् कॉंग्रेस’ मैलाचा दगड ठरेल,’’ असाही विश्वास श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.

जगाचे बियाणे केंद्र होण्याची क्षमता

एनएसएआयचे अध्यक्ष प्रभाकर राव म्हणाले, ‘‘हरितक्रांतीकडून अमृतकालाकडे जाणाऱ्या भारताच्या वाटचालीत बियाणे उद्योगाची भूमिका मोलाची राहील. कृषी क्षेत्रात देशाने केलेली प्रगती चकित करणारी असली तरी आव्हानांकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

आपला कृषिविकासाचा दर कमी आहे. तरीदेखील तंत्रज्ञानाच्या आधारे जगाचे बियाणे केंद्र (ग्लोबल सीडस् हब) होण्याची क्षमता भारताकडे आहे. मात्र, त्यासाठी नवसंधीचा शोध आणि आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी आपण ठेवायला हवी.’’

खासगी व सरकारी घटकांनी एकत्र यावे

‘‘उच्च उत्पादकतेद्वारे कृषी विकास आणि जगाच्या बियाणे बाजारपेठेत आघाडी अशा दोन्ही बाबी साध्य करायच्या असल्यास भारतीय बियाणे उद्योगातील खासगी व सरकारी घटकांना एकत्रित जावे लागेल.

प्रत्येक पिकाच्या मूल्य साखळींमधील घटकांसोबत बियाणे उद्योगाला काम करावे लागेल. जास्तीत जास्त एकत्र यावे लागेल. उदाहरणार्थ वस्त्रोद्योगाला सोबत घेत उच्च गुणवत्तेचा धागा असलेल्या नव्या कपाशी वाणांचा विकास करण्याचे ध्येय बियाणे उद्योगाने ठेवायला हवे,’’ असेही श्री. राव यांनी नमुद केले.

पर्यावरणाला केंद्रस्थानी ठेवावे

‘‘हरितक्रांतीचे मोठे प्रतिकूल परिणाम झाले. प्रत्येक बियाणे कंपनीला यापुढे केवळ बियाण्याच्या केवळ जनुकीय विकासाच्या अंगानेच नव्हे; तर जीवजंतू व पर्यावरण सुरक्षिततेच्या अंगानेदेखील बारकाईने लक्ष द्यावे लागेल.

शेतमजूर टंचाई ही सध्याची सर्वात मोठी समस्या आहे. त्यासाठी संगणकीय प्रणालीवर आधारित शेती (डिजिटल अॅग्रिकल्चर) व जनुकीय संपदान (जीन एडिटिंग) अशा दुहेरी तंत्राच्या आधारे बियाणे उद्योगाला पुढे जावे लागेल,’’ असे प्रतिपादन जनुकीय परावर्तित पिकांचे गाढे अभ्यासक डॉ. सी. डी. मायी यांनी या परिषदेत केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Upsa Irrigation Scheme : परभणी, मानवत तालुक्यांत उपसा सिंचन योजना प्रस्तावित

Bullet Train : बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुसाट

Crop Loan : पीककर्ज वाटपप्रकरणी दाखल गुन्हे मागे घ्या

Panchganga Sugar Factory : पंचगंगा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेला गालबोट, कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी

Electricity Bill Waive : कोल्हापुरातील पाणी संस्थांना वीजबिल माफीची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT