Adinath Chavan Agrowon
ॲग्रो विशेष

Adinath Chavan : संघर्षाला हवा प्रबोधनाचा आधार

Team Agrowon

Nashik News : प्रबोधन आणि संघर्ष ही कोणत्याही चळवळीची दोन चाके असतात. संघर्षाला जर प्रबोधनाचा आधार नसेल तर अशा चळवळी दीर्घकाळ टिकू शकत नाहीत. शरद जोशी यांनी हे ओळखले होते.

त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातील सामान्य शेतकऱ्यांमधून त्यांनी अभ्यासू, व्यासंगी कार्यकर्ते घडवले. शेतकरी संघटनेच्या यशाचे हेच गमक होते, असे प्रतिपादन ‘सकाळ- ॲग्रोवन’चे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण यांनी केले.

शेती अर्थ प्रबोधिनीद्वारा आयोजित ११ व्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनात पत्रकार ज्ञानेश उगले यांनी श्री. चव्हाण यांची प्रकट मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली.

बदलत्या आव्हानात्मक परिस्थितीत कृषी पत्रकारितेची भूमिका, शेती आणि सरकारची धोरणे, शेतीपुढील आव्हाने व त्यांचे साहित्यातील प्रतिबिंब, शेती संबंधित साहित्य व माध्यमांतील या आशयाचे स्थान अशा विषयांवर त्यांनी मांडणी केली.

श्री. चव्हाण म्हणाले, ‘‘उत्तम माणूस बनायचे असेल तर ज्ञानात गुंतवणूक महत्त्वाची ठरते. ज्ञानाची वाटच समृद्धीकडे घेऊन जाते. प्रत्येकाने व्यस्ततेतून वाचनासाठी वेळ काढल्यास मोठे फायदे अनुभवता येतात. वैविध्यपूर्ण वाचनातून माणूस घडत असतो. त्यातून विचारपद्धती विकसित होते, शब्दसंग्रह वाढतो. असा माणूस कोणत्याही विषयाची प्रभावीपणे मांडणी करू शकतो. तो कधीही बेताल बडबड करत नाही.’’

शेती साहित्य व शेतकरी चळवळीबद्दल बोलताना ते म्हणाले, ‘‘शेती क्षेत्रात महात्मा फुले यांच्यानंतर खरा उद्गार शरद जोशी हेच होते. फुले यांनी ‘शेतकऱ्यांचा आसूड’ सारखे वैचारिक वाङ्मय दिले. खऱ्या अर्थाने महात्मा फुले हे पहिले कृषी पत्रकार होते. त्यांच्या साहित्यातील प्रभावी शब्द, वाक्यरचना आजही डोळ्यात अंजन घालतात.

हेच काम शरद जोशींनी पुढे नेत शेती क्षेत्राच्या, शेतकऱ्याच्या दुरवस्थेची आकडेवारीसह मांडणी केली. या प्रबोधनातून अनेक कार्यकर्ते घडले, मोठी चळवळ उभी राहिली. आजही ग्रामीण भागातील साधा शेतकरी अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडणी करतो, बोलतो आकडेवारीचा संदर्भ देतो हे या चळवळीचे यश आहे.’’

अन्याय करणाऱ्यांना धडा शिकवा

शेती क्षेत्रासमोरील आव्हानांबाबत बोलताना ते म्हणाले, ‘‘शेतीमालावर निर्यातबंदीसारखी अनेक आव्हाने शेतकऱ्यांसमोर आहेत. यापुढील काळात ती आणखी वाढणार आहेत. कारण त्याला विरोध करण्यासाठी आवश्यक असा दबावगट शेतकरी उभा करू शकत नाहीत, हे राज्यकर्त्यांनी ओळखले आहे.

निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांच्या एकत्रित ताकदीचा प्रभाव दिसून येत नाही. विविध जातींचे, उद्योगांचे दबाव गट आहेत, तसा शेतकऱ्यांचा नाही. न्याय हवा असेल तर शेतकऱ्यांविरोधात काम करणाऱ्यांना मतदानातून धडा शिकवला पाहिजे. केवळ शेतकरी एक होत नसल्याने हे होत नाही.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT