Chh. Sambhajinagar News : जनता किंवा लोकप्रतिनिधी या दोन्हींनी अनास्था ठेवून चालणार नाही. केवळ चर्चा करून नाही तर प्रशासन, शासन व न्यायपालिका या तिन्ही आघाड्यांवर मराठवाडा पाणीप्रश्न व सिंचन विकास या विषयांवर सामूहिक लढा उभारावा लागेल, असा सूर रविवारी (ता.२) पार पडलेल्या ‘जलसंवाद २०२५’मध्ये उमटला आहे.
टीम ऑफ असोसिएशन, असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चरच्या (मसीआ) व मराठवाडा जलसमृद्धी प्रतिष्ठानच्या समन्वयातून या जलसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट, जलतज्ज्ञ डॉ. वाय. आर. जाधव, आमदार प्रशांत बंब, आमदार रमेश बोरणारे, आमदार कैलास पाटील, माजी मंत्री राजेश टोपे, आमदार अनुराधा चव्हाण, संजय लाखे पाटील ॲड. व्यंकट बेंद्रे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, ‘मसिआ’चे उपाध्यक्ष अर्जुन गायकवाड आदींची प्रामुख्याने उपस्थित होते.
‘मसिआ’चे श्री. गायकवाड यांनी स्वागत पर मनोगत व्यक्त केले. त्यानंतर मराठवाडा जलसमृद्धी प्रतिष्ठानचे सचिव रमाकांत पुलकुंडवार यांनी जलसंवाद २०२५ आयोजनामागील भूमिका विषद केली. पाण्याविषयीची अनास्था परवडणारी नाही. पाण्यामुळे संपत्ती आणि सत्ता निर्माण होते, हे समजून घ्यावे लागेल असे मत त्यांनी मांडले.
जलतज्ज्ञ जाधव यांनी इतिहासाचा उलगडा करताना जायकवाडीतील पाणी कशा पद्धतीने याआधीही कमी केले गेले. मेंढेगिरी समितीचा अहवाल अजून अमान्य का, अहवालात नेमक्या काय चुका, त्याविषयी एमएमआरडीएकडे दिलेला लढा, न्यायालयीन लढाई, झालेले न्यायदान याविषयी प्रकाश टाकला.
मराठवाडा जलसमृद्धी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. शंकरराव नागरे यांनी पडणारे पावसाचे पाणी, देशात राज्यात प्रति एकर उपलब्ध होणाऱ्या पाण्याच प्रमाण, मराठवाड्यातील पाण्याची तूट, गोदावरी नदी वगळता इतर कोणतीही नदी हमखास पाऊस होण्याच्या क्षेत्रातून वाहत नसल्याची बाब अधोरेखित केली.
जयसिंग हिरे यांनी समन्यायी पाणी वाटपाचा प्रश्न नेमका काय, नवीन अभ्यास गटाचा अहवाल काय, त्याचे मराठवाड्यातील पाणी उपलब्धतेवर होणारे परिणाम याविषयी मांडणी केली. महेंद्र वडगावकर यांनी मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याच्या न्यायालयीन लढाईवर प्रकाश टाकला. मुख्य अभियंता श्री. चव्हाण यांनी कोणत्याही वादाविना कोकण-मराठवाडा पाणी वळण योजना कशी पूर्णत्वास नेता येईल याची मांडणी केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सर्जेराव वाघ यांनी केले. जलसंवादाला मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर असता ठेवून असलेल्या विविध जिल्ह्यातील प्रतिनिधींची उपस्थिती होती. मराठवाड्यात पाण्यासारख्या महत्त्वाच्या विषयावर आयोजित या संवादाला अनेक लोकप्रतिनिधी अनुपस्थित राहिल्याबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.
सात टक्के पाणी कमी करणे म्हणजे मराठवाड्याच्या जखमेवर मीठच चोळण्यासारखे आहे. कायदा स्पष्ट असेल तर त्याचे उल्लंघन करण्याची हिंमत करतो कोण. मराठवाड्याच्या हितासाठी काढलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करायला आग्रह करावा लागेल.- राजेश टोपे, माजी मंत्री, जालना
कुणाच्या हक्काचं पाणी नको आमच्या हक्काचं हवं. पाणी प्रश्नात अडथळा आणणारे झारीतील शुक्राचार्य शोधावे लागतील. पाणी नाही तर उद्योग नाही. मराठवाडा ‘सुजलाम् सुफलाम्’ व्हावा हे प्रथम प्राधान्य.- संजय शिरसाट, पालकमंत्री, छत्रपती संभाजीनगर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.