Washim News: जिल्हा प्रशासन व कृषी विभागाच्या पुढाकाराने या खरीप हंगामात राबवण्यात आलेल्या ‘वत्सगुल्म स्मार्ट पेरणी स्पर्धा-खरीप २०२५’ या स्पर्धेत सुमारे ३२ हजारांवर शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. तर, एक लाख ३६ हजार २८९ एकरांत बीबीएफ, अमरपट्टा, टोकण यंत्राचा वापर अशा पद्धतीने पेरणी झाली. विशेष म्हणजे मंगरुळपीर, कारंजा या दोन तालुक्यांतील शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद देत सहभाग घेतला.
स्पर्धेत जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील ९,७८४ शेतकऱ्यांनी ४६,९४७ एकरांवर या नावीन्यपूर्ण पद्धतीने पेरणी केली. तर कारंजात ९,२८८ शेतकऱ्यांनी ४४,८८९ एकरांत, वाशीममध्ये ४,४६८ शेतकऱ्यांनी १४,४६९, रिसोड ३,७०९ शेतकऱ्यांनी १४,०६०.५ एकरांत, मालेगावमध्ये ३,१२४ शेतकऱ्यांनी ८,८११, मानोरा १,९६२ शेतकऱ्यांनी ७,११२ एकरांत मिळून एकूण ३२,३३५ शेतकऱ्यांनी एक लाख ३६ हजार २८९ एकरांत लागवड केल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह, उपविभागीय कृषी अधिकारी संतोष वाळके यांनी दिली.
जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्या मार्गदर्शनात कृषी विभागाने हा उपक्रम या खरीप हंगामात राबवला. सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी स्वतः आपल्या क्षेत्राची माहिती नोंदवली. आधुनिक व वैज्ञानिक दृष्टिकोनातून स्मार्ट पेरणी पद्धतींची लोकप्रियता वाढवण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा तयार करण्यात आली. या पद्धतींद्वारे जमिनीची सुपीकता, पाण्याचे योग्य व्यवस्थापन आणि उत्पादनात वाढ साधता येईल.
यात प्रामुख्याने रुंद वरंबा सरी पेरणी (BBF), सरी वरंब्यावर टोकण लागवड, अमरपट्टा पद्धत (मिश्र पिके-जसे की सोयाबीन + तूर), हस्तचलित टोकण यंत्राद्वारे पेरणी व मृत सरी काढणे अशा पद्धतींचा समावेश होता. स्पर्धेसाठी प्रशासनाने उपलब्ध केलेला क्यूआर कोड स्कॅन करून गुगल फॉर्म भरण्यात आले.
फॉर्म सादर केलेल्यांपैकी १८ शेतकऱ्यांची लकी ड्रॉद्वारे निवड केली जाणार आहे. निवडलेल्यांच्या शेतांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येईल आणि अचूक माहिती दिलेल्या शेतकऱ्यांना येत्या १५ ऑगस्ट रोजी पारितोषिक व सन्मानपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी इंडियन फार्मर्स फर्टिलायझर को-ऑपरेटिव्ह लि.ने (IFFCO) सहकार्य केले.
कृषी विभागाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) प्रकल्पातून बीबीएफ, बेडवर पेरणी यांसारख्या उपयुक्त पद्धतींचा पुरस्कार करण्यात येत आहे. अतिवृष्टी आणि पावसातील खंड या दोन्ही नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना वाचवणाऱ्या या तंत्रज्ञानामुळे हजारो एकर शेतीमध्ये पिकांना संरक्षण मिळणार आहे. यासाठी वाशीम जिल्ह्याचे पेरणी पद्धतींचे स्पर्धात्मक मॉडेल हे फारच क्रांतिकारी होऊ शकते.- विजय कोळेकर, मृदा विज्ञान तज्ज्ञ, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, मुंबई
वत्सगुल्म स्मार्ट पेरणी स्पर्धा वाशीम जिल्ह्यात जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस., जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह, उपविभागीय कृषी अधिकारी संतोष वाळके, ‘आत्मा’ प्रकल्प संचालक अनिसा महाबळे व इतरांच्या संकल्पनेतून राबवली जात आहे. जिल्ह्यात रुंद वरंबा व सरी पद्धत लागवड आणि अमरपट्टा या पद्धतीचा वापर सर्वांत जास्त मंगरूळपीरमध्ये केला आहे. या यांत्रिकीकरणाचा वापर, नवीन तंत्रज्ञान अंगीकारत शेतकरी पुढे जात आहे.- दिलीप फुके, शेतकरी तथा बीबीएफ पद्धतीचे प्रसारक, चांभई, ता. मंगरूळपीर, जि. वाशीम
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.