Akola News: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ६५ टक्के पदे रिक्त असल्याचा फटका दैनंदिन कामकाजाला बसतो आहे. शिक्षण, संशोधन आणि विस्तार सेवा या विद्यापीठाच्या तीनही मूलभूत क्षेत्रांवर प्रतिकूल परिणाम होत आहे. संपूर्ण कृषी शिक्षण व संशोधन प्रणालीसाठी हे धोक्याचे लक्षण मानले जात आहे. विद्यापीठांतर्गत मंजूर ३४४७ पदांपैकी तब्बल २१७३ पदे रिक्त आहेत.
या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र पूर्व व पश्चिम विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये विस्तारले आहे. या व्यापक भौगोलिक परिसरात कार्यरत विद्यापीठाला पुरेशा मनुष्यबळाअभावी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः शिक्षकवर्गातील ३५४ पदे रिक्त असून, त्यात सरळसेवेच्या २१९ आणि पदोन्नतीच्या १३५ जागांचा समावेश आहे. दर वर्षी हजारो विद्यार्थी या विद्यापीठावर शिक्षणासाठी अवलंबून असतात. मात्र शैक्षणिक व संशोधन पदांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक जागा रिक्त असल्याने अध्यापनावर थेट परिणाम होत आहे.
काही ठिकाणी प्रभारी प्राध्यापकांकडून त्यांचे नियमित कामकाज सांभाळून शैक्षणिक जबाबदारी निभावली जात आहे. शैक्षणिक गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून ही अत्यंत गंभीर बाब आहे. शेतीसंदर्भातील नवनवीन प्रयोग, तंत्रज्ञानाचा विकास व प्रसार, तसेच शेतकऱ्यांच्या समस्यांवर उपाययोजना करण्याचे कार्य करणारे तांत्रिक व सहायक कर्मचारीही पुरेशा संख्येत उपलब्ध नाहीत. त्यामुळे विद्यापीठाच्या संशोधन व विस्तार विभागावर प्रचंड ओझे वाढले असून, नवीन प्रकल्प पुढे नेण्यात अडथळे येत आहेत.
शासनाचे दुर्लक्ष
इतक्या मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असतानाही, शासन व राजभवन, शिक्षण परिषद स्तरावर भरती प्रक्रियेसंदर्भात कोणतीही ठोस हालचाल होताना दिसून येत नाही. वर्षानुवर्षे नोकरभरतीचे प्रस्ताव प्रलंबित असून त्यामुळे शिक्षक, अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. शैक्षणिक गुणवत्ता आणि संशोधनाच्या विश्वासार्हतेवर याचा गंभीर परिणाम होत आहे. राज्य शासनाने ही परिस्थिती गांभीर्याने न घेतल्यास कृषी विद्यापीठाचा पाया डळमळू शकतो.
म्हणूनच शिक्षण, संशोधन आणि विस्तार या त्रिसूत्री कार्यपद्धतीला मजबुती देण्यासाठी तातडीने रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवणे अत्यावश्यक झाले आहे. दुसरीकडे लोकप्रतिनिधी जाहीर कार्यक्रमांमधून कृषी विद्यापीठांच्या योगदानाविषयी सातत्याने प्रश्नचिन्हे उपस्थित करतात. यामुळे समाजात विद्यापीठांविषयी बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याचा धोकाही आहे.
विद्यापीठात सध्या ३५ टक्क्यांपर्यंतच मनुष्यबळ कार्यरत आहे. त्याचा साहजिकच संशोधन, प्रशिक्षण, शिक्षण, विस्तार अशा सर्वच कामांवर परिणाम होत आहे. उपलब्ध असलेल्या मनुष्यबळाचा वापर करून अधिकाधिक चांगले काम करून घेण्याचा प्रयत्न प्रशासन सातत्याने करीत आहोत, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
दृष्टिक्षेप
विद्यापीठात मंजूर ३४४७ पैकी २१७३ पदे रिक्त
शिक्षकवर्गात ३५४ पदांचा अनुशेष
अध्यापन, संशोधन व विस्तार कार्य ठप्प होण्याची भीती
शासनाची भरतीबाबत उदासीनता; तीव्र नाराजी
कृषी शिक्षणाची गुणवत्ता आणि विश्वासार्हता धोक्यात
शेतकऱ्यांच्या सोयीसाठी उदात्त हेतूने कृषी विद्यापीठ निर्माण करण्यात आलेले आहे. गोरगरीब, शेतकऱ्यांच्या मुलांना चांगले कृषी शिक्षण मिळावे, संशोधन शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जावे असा उदात्त हेतू यामागे होता. पण कुठेतरी मनुष्यबळाअभावी मार्गदर्शन, संशोधन, शिक्षणावर परिणाम होत आहे. त्यामुळे उद्देश साध्य होण्यास बाधा पोहोचते आहे. शासनाने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या कृषी विद्यापीठातील रिक्तपदे तत्काळ भरली पाहिजेत.अमित झनक, आमदार, रिसोड, जि. वाशीम
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.