
Parbhani News: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत विविध विद्याशाखांच्या अंतर्गत १६ पैकी १४ घटक (शासकीय) महाविद्यालयांत मंजूर शिक्षकवर्गीय ४१४ पैकी २५३ पदे रिक्त आहेत. २०२४ मध्ये सुरू झालेल्या नवीन ४ पैकी २ महाविद्यालयांसाठी पदांचा आकृतिबंध मंजूर असून, २ महाविद्यालयांसाठी अद्याप पदे मंजूर नाहीत.
सध्या २०२५-२६ शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. जुन्या महाविद्यालयांतील रिक्त पदे तसेच नवीन महाविद्यालयांसाठी पदभरती झालेली नाही. कंत्राटी शिक्षण सहयोगी पदाची भरती नाही. कार्यरत अपुऱ्या मनुष्यबळावर कामाचा अतिरिक्त बोजा वाढला आहे. त्यामुळे अध्यापन कार्य अडखळत सुरू आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ७ विद्याशाखांतर्गत घटक महाविद्यालयांची संख्या १२ होती. त्यात २०२४ पासून पदभरतीविना लिहावाडी (ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर, नांदेड, जिरेवाडी (ता. परळी वैजनाथ, जि. बीड) येथे कृषी महाविद्यालये तर जिरेवाडी (ता. परळी वैजनाथ) येथे कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय मिळून एकूण ४ महाविद्यालये सुरू झाल्याने घटक महाविद्यालयांची संख्या १६ झाली आहे.
जिरेवाडी (ता. परळी वैजनाथ) येथील कृषी महाविद्यालयासाठी ४५ आणि कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयासाठी १७ पदाचा आकृतिबंध मंजूर आहे. परंतु लिहावाडी (जि. छत्रपती संभाजीनगर) आणि नांदेड येथील महाविद्यालयांसाठी पदांचा आकृतिबंध मंजूर नाही. नवीन महाविद्यालयांना इमारती नाहीत. लिहावाडी येथील महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे तर जिरेवाडी येथील महाविद्यालय परळी वैजनाथ येथे सुरू आहे.
१६ पैकी १४ महाविद्यालयांसाठी शिक्षकवर्गीय ४१४ पदे मंजूर आहेत. त्यापैकी १६१ पदे कार्यरत असून २५३ पदे रिक्त आहेत. सहयोगी अधिष्ठातांची (प्राचार्य) पदे, विभागप्रमुख, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापकांची पदे मोठ्या संख्येने रिक्त आहेत. विद्यापीठस्तरावर कंत्राटी पद्धतीने भरायच्या शिक्षण सहयोगी ४५ जागांची भरती रखडली आहे.
कृषी विद्यापीठातील ७ विद्याशाखांतर्गत १६ घटक महाविद्यालयांतील पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता १ हजार १७० आहे. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांची ३७९ तर आचार्य पदवीची ७६ एवढी प्रवेश संख्या आहे. ‘वनामकृवि’साठी विविध संवर्गातील एकूण २ हजार ९७२ पदे मंजूर आहेत. परंतु अनेक वर्षांपासून बंद पदभरती आणि प्रत्येक महिन्याला होणाऱ्या सेवानिवृत्तीमुळे १ हजार ८९० (६३.५९ टक्के) पदे रिक्त झाली आहेत.
राज्य सरकारच्या यंदाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात ‘वनामकृवि’तील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यासाठी सुधारित आकृतिबंध तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले तरी अद्याप पद भरती प्रक्रिया सुरू झालेली नाही. रिक्त पदांमुळे शिक्षणाचा दर्जा तसेच गुणवत्तेवर परिणाम झाला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.