Cotton Seeds Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Seed : राज्यात कापसाची १.७० कोटी पाकिटे उपलब्ध

बाळासाहेब पाटील

Mumbai News : राज्यातील ४०.२० लाख हेक्टर कापूस पिकाखालील क्षेत्रासाठी आवश्यक असलेली १ कोटी ७० लाख पाकिट कपाशीची बियाणे उपलब्ध असल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. तर राज्यातील बोगस बियाण्यांचाही सुळसुळाट मोठ्या प्रमाणावर झाला आहे. राज्यात कापसाच्या बियाण्यांच्या तुटवडा असल्याने बोगस बियाणे बाजारात आल्याचेही बोलले जात आहे.

कृषी विभागाने मुबलक बियाणे उपलब्ध असल्याचा दावा केला असला तरी त्यात तथ्य नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अनेक कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या असून लिंकिंगचा प्रकारही समोर येत आहे. कृषी विभागाने राज्यात आतापर्यंत जवळपास २१० कोटी रुपये किमतीचा बोगस बियाण्यांचा साठा जप्त केला आहे. राज्यात कापसाचे बियाणे मुबलक असली तरी विशिष्ट वाणाचा आग्रह धरू नये असे आवाहनही कृषी विभागाने केले आहे.

राज्यात कापूस पिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र ४० लाख २० हजार हेक्टर आहे. कृषी विद्यापीठांच्या शिफारशीनुसार प्रतिहेक्टर ४.२ पाकिटे बियाण्यांची आवश्यकता असते. सध्या या क्षेत्राकरिता १ कोटी ७० लाख पाकिटांची आवश्यकता आहे. सर्व कंपन्यांचा आढावा घेतला असता सध्या १ कोटी ७५ लाख पाकिटे बियाणे उपलब्ध आहेत. राज्यात विशिष्ट प्रकारच्या आठ ते दहा वाणांच्या बियाण्यांना शेतकऱ्यांची मागणी आहे.

त्यामुळे तुटवडा जाणवत असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. केंद्र सरकारने खरीप २०२४ साठी कापूस बीजी २ चा दर ८६४ रुपये निश्चित केला आहे. कापूस बियाणे जादा दराने विक्री करणाऱ्या कृषी सेवा तसेच कापूस उत्पादक कंपन्यांवर कडक कारवाईचे निर्देश निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक विकास पाटील यांनी दिले आहेत. तरीही काही ठिकाणी लिंकिंग आणि चढ्या दराने बियाणे विक्री होत असल्याचा दावा शेतकरी करत आहेत.

राज्यात एचटीबीटी कापूस बियाण्यांसंदर्भात चंद्रपूर जिल्ह्यात चार ठिकाणी कारवाई करण्यात आली असून, ६६ लाख ८५ हजार ४५६८.३० किलो बियाणे साठा जप्त केला आहे. तर गडचिरोली जिल्ह्यात ५५.३२ किलो किमतीचे ३० क्विंटल बियाणे जप्त केले आहे. नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यांत तीन ठिकाणच्या कारवाईत १८०७ एचटीबीटी कापूस बियाण्यांची ३७ लाख ९६ हजार रुपयांची पाकिटे जप्त केली आहेत. अमरावती विभागातील यवतमाळ जिल्ह्यात तीन ठिकाणी ११३ बियाणे पाकिटे जप्त करण्यात आली असून, त्याचे मूल्य १ कोटी ५५ लाख रुपये आहेत.

एचटीबीटी कापूस बियाण्यांवर केलेली कारवाई

चंद्रपूर (चांदापूर हेटी) : ५ क्विंटल

गडचिरोली : ३० क्विंटल

नंदुरबार : १ हजार पाकिटे

आक्कलकुवा (नंदुरबार) : १५७ पाकिटे

चंद्रपूर (नवेगाव) : ८०.३० किलो

चंद्रपूर (पोंभुर्णा) : ३९.८८ क्विंटल

धुळे (शिंदखेडा) : ६५० पाकिटे

चंद्रपूर (जुनगाव) : १७ किलो

चंद्रपूर (गोंडपिंपरी) : १२.९० क्विंटल

राज्यात ६० कंपन्या बियाणे उत्पादन घेतात. त्यातील काही ठरावीक वाणांना शेतकऱ्यांची मोठी मागणी असते. त्यामुळे कंपन्यांना ती गरज पुरवणे शक्य नसते. दोन दोन वर्षे बियाण्यांची प्रक्रिया चालते. परिणामी, काही ठिकाणी तुटवडा आणि लिंकिंगचे प्रकार घडत आहेत. पण कृषी विभाग त्याविरोधात कडक भूमिका घेऊन कारवाई करत आहे.
- विकास पाटील, कृषी संचालक, निविष्ठा व गुणनियंत्रण विभाग

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT