Nagar News : यंदा उन्हाळ्यात झालेल्या जोरदार पाऊस, गारपिटीमुळे सीताफळाला बहार येऊन गेल्याने मृगातील बहारात फळधारणा कमी होत असल्याचे दिसून येत आहे. अनेक शेतकऱ्यांना तसा अनुभव येत आहे. शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहमीच्या तुलनेत साधारण तीस ते चाळीस टक्के फळे कमी येण्याचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याला तज्ज्ञांनीही दुजोरा दिला आहे.
राज्यातील नगर, पुणे, सोलापूर, नाशिक, बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, अकोला, सातारा जिल्ह्यांत फळबागाचे क्षेत्र बऱ्यापैकी आहे. गेल्या तीन-चार वर्षांत जोरदार पाऊस झाला, कृषी विभागाकडूनही फळबाग लागवड करण्यासाठी सातत्याने प्रोत्साहित केल्याने आंब्यासोबत फळबागांची लागवड वाढली आहे.
कोरडवाहू किंवा कमी पाण्याचे क्षेत्रातील पीक म्हणून सीताफळाकडे पाहिले जात आहे. ८० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर सीताफळाची लागवड होत आहे. यंदाही सीताफळ लागवडीला प्राधान्य असल्याचे दिसतेय. मात्र पाऊस नसल्याने यंदा सीताफळांसह फळबागा अडचणीत असल्याने फळबागा जगवण्यासाठी सरकारने फळबागा जगवण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पोपटराव पवार यांच्याकडे केली आहे.
राज्यात पुरंदर व काही अपवादाचा परिसर सोडला तर सर्वच ठिकाणचे शेतकरी सीताफळाचा मृग बहार धरतात. मृग बहारातील सीताफळे ऑक्टोबरमध्ये तोडणीला सुरू होतात. डिसेंबर-जानेवारीपर्यंत तोडणी झाल्यानंतर बागेचे पाणी तोडून खत घालणी, छाटणी केली जाते.
थेट मे किंवा जून महिन्यात पाणी सोडले जाते. यंदा मात्र मार्च महिन्यातच जोरदार व सतत पाऊस पडल्याने झाडांना पाणी मिळाले. त्यामुळे तेव्हाच बहार आला, त्याचा झाडांची ताकद वाया गेल्याने जूनमध्ये धरलेल्या मृग बहारात फळे कमी लागत असून त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता सीताफळ उत्पादक शेतकरी व्यक्त करत आहेत.
राज्यात पुणे जिल्ह्यातील पुरंदर भागात उन्हाळ्यातील व इतर भागातील अपवाद वगळता बाकी ठिकाणी सीताफळाचा जूनमधील मृगाचा बहार धरतात. यंदा उन्हाळ्यात अनेक भागांत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे बागेला पाणी मिळाल्याने बहार आला. त्याच बहारात झाडांतील ताकद वाया गेली. बागेची छाटणी करता आली नाही. त्याचा परिणाम जूनमधील बहारात दिसतो. उन्हाळ्यात बहार येऊन गेल्याने जूनच्या बहारात फळधारणा कमी होते.- डॉ. प्रदीप दळवे, प्रमुख शास्त्रज्ञ, सीताफळ संशोधन केंद्र, जाधववाडी, ता. पुरंदर जि. पुणे
यंदा उन्हाळ्यात पाऊस झाला. त्याचवेळी काही प्रमाणात बहार आला. तो बहार आम्ही धरत नाही. जूनमधील मृगबहार धरला, मात्र यंदा दरवर्षीच्या तुलनेत फळधारणा निम्म्याने कमी होत असल्याचे दिसून येत आहे. त्याचा आर्थिक फटका आम्हा शेतकऱ्यांना बसू शकतो.- नामदेव नरहरी रोहोकले, सीताफळ उत्पादक शेतकरी, भाळवणी, ता. पारनेर
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.